
फोंडा, २५ एप्रिल (वार्ता.) – ‘ज्यांना मराठी भाषा हवी, त्यांनी खुशाल महाराष्ट्रात जावे’, अशा आशयाची ‘पोस्ट’ सामाजिक माध्यमांत प्रसारित करून २ भाषिकांमध्ये तेढ निर्माण केल्याच्या प्रकरणी कोकणी कवी प्रकाश नाईक यांच्या विरोधात म्हार्दाेळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. डॉ. मधु गावडे घोडकिरेकर यांनी या प्रकरणी म्हार्दाेळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.
गोव्यात गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी राज्यभरात विविध ठिकाणी मेळावे आयोजित केले जात आहेत. या मेळाव्यांच्या पार्श्वभूमीवर कवी प्रकाश नाईक यांनी ‘फेसबूक’वर केलेली ‘पोस्ट’ वादग्रस्त ठरली आहे. तक्रारीविषयी माहिती सांगतांना डॉ. मधु गावडे घोडकिरेकर म्हणाले, ‘‘या पोस्टमुळे भाषिक गटांमध्ये तेढ निर्माण झाली आहे. यामुळे येथील शांतता भंग होऊ शकते. हा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाल्यास संबंधितास ३ वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.’’ या पार्श्वभूमीवर प्रकाश नाईक म्हणाले,‘‘मी कुठलेही चुकीचे विधान केलेले नाही. गोव्याची राजभाषा कोकणी आणि महाराष्ट्राची राजभाषा मराठी असल्याचे मी नमूद केले आहे.’’
काय आहे प्रकरण ?
‘ज्यांना मराठी हवी, त्यांनी खुशाल महाराष्ट्रात जावे. हे लोक गोव्यातील तरुणांची वाट लावण्यासाठी पुढे आले आहेत. त्यामुळे बहुजन नीज गोयकारांनी याला विरोध केला पाहिजे’, असे लिखाण प्रकाश नाईक यांनी ३१ मार्च या दिवशी प्रसारित केले होते. या प्रकरणाचे अन्वेषण म्हार्दाेळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक झाकी हुसैन करत आहेत.