जम्मू-काश्मीर राज्यातील पहलगाममधील भीषण आतंकवादी आक्रमणातून पाकिस्तान पुरस्कृत आतंकवादाचे पालटते तंत्र समोर आले आहे. गेल्या काही मासांमध्ये ‘टार्गेट किलिंग’चा (लक्ष्यित हत्यांचा) प्रवाह काश्मीरमध्ये दिसून येतच होता; पण धर्म विचारून हत्या करण्यातून आतंकवाद्यांना सर्वसामान्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करायची आहे. पाकपुरस्कृत आतंकवादी संघटना या धार्मिक आधारावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या ताज्या आक्रमणाच्या माध्यमातून इतर धर्मियांनी जम्मू-काश्मीरमध्ये येऊ नये, अशी चेतावणी आतंकवाद्यांना द्यावयाची आहे.

१. आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणामधील पालट
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील बैसरन खोर्यात झालेले आतंकवादी आक्रमण हे भीषण, नृशंस आणि तितकेच भेदक आहे. वर्ष २०१९ च्या पुलवामा आक्रमणानंतरचे हे सर्वांत मोठे आतंकवादी आक्रमण आहे. पुलवामामधील आक्रमण हे लष्करी सैनिकांवर झाले होते; पण पहलगाममधील आक्रमणामध्ये सर्वसामान्य नागरिकांना आणि विशेषतः पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. हा पालट महत्त्वाचा असून त्यातील गर्भितार्थ लक्षात घेणे आवश्यक आहे. पहलगाममध्ये यापूर्वीही आतंकवादी आक्रमणे झालेली आहेत. साधारण अडीच दशकांपूर्वी वर्ष २००० मध्ये अमरनाथ बेस कॅम्पवर झालेल्या आतंकवादी आक्रमणामध्ये ३० जणांचा मृत्यू झाला होता.
वर्ष २००१ मध्ये शेषनागमध्ये तीर्थाटनाला गेलेल्या भाविकांवर झालेल्या आतंकवादी आक्रमणामध्ये १३ जण मारले गेले होते. वर्ष २००२ मध्ये पहलगाममध्ये झालेल्या आक्रमणात ११ जणांचा मृत्यू झाला होता. वर्ष २०१७ मध्ये अमरनाथ यात्रा आटोपून घरी परतत असलेल्या भाविकांवर झालेल्या आक्रमणात ८ जणांचा मृत्यू झाला होता. तथापि या वेळच्या आक्रमणामध्ये पर्यटकांना नावे आणि धर्म कोणता हे विचारून गोळ्या घालण्यात आल्या. त्यामुळे या आक्रमणाला एक वेगळी किनार आहे.
२. पहलगाममधील आक्रमणाच्या मागचा प्रमुख तात्कालिक हेतू

वस्तूतः पहलगाममध्ये वापरण्यात आलेली पद्धत पाहिली असता अल कायदा, इसिस यांसारख्या आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटना अशा प्रकारची ‘मोडस ऑपरेंडी’ (कार्यप्रणाली) वापरतांना दिसतात. गेल्या काही वर्षांपासून जागतिक समुदायाला भारत एक गोष्ट सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करत आहे, ती म्हणजे पाकपुरस्कृत आतंकवादाच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रविरोधी कारवाया करणार्या जैश-ए-महंमद, लष्कर-ए-तोयबा यांसारख्या संघटना पाकव्याप्त काश्मीरमध्ये सक्रीय असून तेथून त्या भारतामध्ये आतंकवाद पसरवण्याचे काम करत आहेत. या सर्व संघटना धार्मिक आधारावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. या माध्यमातून ‘इतर धर्मियांनी जम्मू-काश्मीरमध्ये येऊ नये’, असे त्यांना सांगायचे आहे. सध्या अमरनाथ यात्रेच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक या भागातून जाणार आहेत. त्यांना चेतावणी देणे, त्यांच्या मनात दहशत निर्माण करणे, हा पहलगाममधील आक्रमणाच्या मागचा एक प्रमुख तात्कालिक हेतू आहे.
३. काश्मीरच्या प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्यासाठी आतंकवादी आक्रमणे केली जाणे
दुसरे असे की, या आक्रमणातून आतंकवाद्यांनी अलीकडील काळात चालू केलेल्या ‘टार्गेट किलिंग’च्या नव्या प्रवाहाला आणखी एक भेदक वळण दिले आहे. धर्म विचारून हत्या करण्यातून आतंकवाद्यांना सर्वसामान्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करायची आहे. मागील काळात युरोपमध्ये ‘इसिस’ या आतंकवादी संघटनेकडून आक्रमणे करण्यात आली होती. या आक्रमणांमध्येही सर्वसामान्यांनाच लक्ष्य करण्यात आले होते. असे करण्याने संबंध देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटतात, माध्यमांमधून प्रसिद्धी मिळते. पाकिस्तानचा हा नेहमीच प्रयत्न राहिला आहे की, जम्मू-काश्मीरमध्ये विशिष्ट वेळा साधून आतंकवादी कारवाया घडवून आणणे. यामुळे काश्मीरच्या प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचा त्यांचा हेतू यशस्वी होतो. गेल्या ३ दशकांचा इतिहास पाहिल्यास पाकिस्तानने नेहमीच भारताच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रसंगांच्या वेळी काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमणे किंवा शस्त्रसंधीचे उल्लंघन असे प्रकार केलेले आहेत.
गतवर्षी पंतप्रधानांचा शपथविधी सोहळा पार पडत असतांना शेजारी राष्ट्रांचे प्रमुख भारतात आलेले होते, त्या वेळी आतंकवादी आक्रमण झाले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रशिया दौर्याकडे जगाचे लक्ष लागून राहिलेले असतांना त्याआधी कठुआमध्ये आक्रमण घडवून आणले होते. वर्ष २००० मध्ये बिल क्लिंटन भारत भेटीवर आले होते आणि भारतीय संसदेत ते भाषण देत होते, त्या वेळीही अशाच प्रकारचे आक्रमण काश्मीरमध्ये झाले होते. यामागे एक सुनियोजित रणनीती आहे, ती म्हणजे पाकिस्तानला अशा प्रकारची आक्रमणे करून काश्मीरच्या प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करायचे आहे.
४. पहलगाममधील आक्रमणाच्या वेळेमागील महत्त्व
आताही पहलगाममधील आक्रमणाची वेळ पाहिली असता हे स्पष्टपणाने लक्षात येते. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष भारत भेटीवर आलेले होते. ट्रम्प प्रशासनाचा कार्यभार चालू झाल्यानंतर पहिल्यांदाच अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांचा विदेश दौरा पार पडला आणि यासाठी त्यांनी भारताची निवड केली. त्यामुळे हा दौरा केवळ भारताच्या दृष्टीनेच नव्हे, तर जगाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा होता. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाच्या दौर्यावर गेलेले होते आणि भारत अन् सौदी यांच्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षर्या होणार होत्या. अशा वेळी इस्लामी जगतामधील आणि पश्चिमी देशांमधील माध्यमे भारतकेंद्री बनलेले होते. ही वेळ साधून पहलगाममधील आक्रमण करण्यात आले, म्हणजे याला जगभरात प्रसिद्धी मिळेल.
पाकिस्तानला फटका कसा बसणार ?१. शेती क्षेत्रावर मोठा परिणाम : पाकिस्तानची ७० टक्क्यांहून अधिक शेती सिंधु नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. गहू, भात, ऊस यांसारख्या महत्त्वाच्या पिकांवर विपरित परिणाम होऊ शकतो. २. पाणी टंचाई/विद्युत्निर्मितीचे संकट : झेलम आणि सिंधु या नद्यांवर पाकिस्तानचे ‘हायड्रोपॉवर’ प्रकल्प आहेत. त्यामुळे भारताने पाणी सोडले नाही, तर टंचाईमुळे विद्युत्निर्मिती ठप्प पडू शकते. ३. पूर आणि दुष्काळ दोन्हीचा धोका : जर भारताने पाणी साठवून नंतर एकदम सोडल्यास अचानक पूर येऊ शकतो किंवा पाणी रोखल्याने दुष्काळ पडू शकतो. ४. आंतरिक असंतोष आणि अस्थिरता : पाणी, वीज नाही, अन्नधान्याच्या तुटवड्यामुळे पाकिस्तानच्या नागरिकांचा प्रक्षोभ होऊ शकतो. त्याचा फटका पाकिस्तानला सहन करावा लागू शकतो. त्यामुळे पाकिस्तानच्या सिंध, पंजाब, बलुचिस्तान या भागांमध्ये अशांतता वाढू शकते. ५. अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम : पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचे धोरण. शेती आणि वीज यांवर अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्यामुळे देशाचे सकल उत्पादन घटून बेरोजगारी महागाई वाढण्याची भीती ! – डॉ. शैलेंद्र देवळाणकर (२४.४.२०२५) |
५. भारतात अस्थिरता आणि अशांतता निर्माण करण्यामागील पाकचा हेतू
गेल्या काही वर्षांमध्ये जम्मू-काश्मीरमधील आक्रमणे वगळता उर्वरित भारतामध्ये एकही आतंकवादी आक्रमण झालेले नाही. सामाजिक वातावरण शांततेचे आहे. कोविड महामारीनंतरच्या काळात जागतिक पर्यटकांचा भारताकडील ओढा वाढत चालला आहे. या सर्व सकारात्मक प्रवाहांना रोखण्याचा उद्देशही अशा आक्रमणांमागे असतो. पाकिस्तान या माध्यमातून ‘भारतात अस्थिरता आणि अशांतता आहे’, असे दाखवण्याचा प्रयत्न करतो. गेल्या १० वर्षांमध्ये भारतात थेट विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. जगभरातील गुंतवणूकदारांसाठी भारत हा पसंतीचा देश ठरत आहे. याचे कारण भारत हा जगातील सर्वांत मोठी लोकशाही असणारा देश आहे. अशा परिस्थितीत अशांतता आणि अस्थिरता निर्माण करून ही गुंतवणूक न्यून कशी करता येईल, असा पाकिस्तानचा प्रयत्न असतो.
– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक, पुणे. (२४.४.२०२५)