‘जनसुरक्षा विधेयक संघर्ष समिती’चे सातारा येथे धरणे आंदोलन !

विधेयकातील प्रावधाने संदिग्ध असल्याचा आरोप

सातारा, २५ एप्रिल (वार्ता.) – महाराष्ट्र शासनाने विधानसभेमध्ये संमत केलेल्या विशेष जनसुरक्षा विधेयकाला ‘जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती’ने हरकत घेतली आहे. समितीच्या वतीने सातारा येथे लाक्षणिक धरणे आंदोलन करत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे.

निवेदनामध्ये म्हटले आहे, विधेयकातील प्रावधाने पहाता त्याचा आणि नक्षलवादी संघटनांचा बिमोड याचा काहीही संबंध नाही. या विधेयकामध्ये शहरी नक्षलवाद अथवा नक्षलवादी हा शब्दही अंतर्भूत नाही. विधेयकामागे केवळ अनधिकृत कृत्य आणि ते करणार्‍या अनधिकृत संघटना एवढेच अंतर्भूत केलेले आहे.

विधेयकामध्ये अनधिकृत संघटना, व्यक्ती, व्यक्तींचा समूह, कोणतेही विशिष्ट नाव असो वा नसो, कायद्यानुसार नोंदणीकृत असो वा नसो, लिखित संविधानानुसार संचलित असो वा नसो, अशा संदिग्ध व्याख्या आहेत. मुळात या कायद्याची आवश्यकताच नाही. या आंदोलनामध्ये विविध संघटना, कामगार संघटना, तसेच महाविकास आघाडीतील काही घटक पक्षांनी सहभाग घेतला.