पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मिळकतीपेक्षा महसुली व्यय अधिक थकबाकीमुळे तोट्यात वाढ

प्रतिकात्मक छायाचित्र

पिंपरी (पुणे) – नदीपात्रातील अशुद्ध जलउपसा केल्यानंतर ते पाणी शुद्धीकरणासाठी व्यय केले जाते. अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया करून ते शुद्धीकरणासाठी वार्षिक २३० कोटी रुपये व्यय होतो. ते शुद्ध पाणी नागरिकांना दिल्यानंतर पाणीपट्टी म्हणून ८० कोटी रुपये मिळतात. म्हणजे प्रतिवर्षी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला १५० कोटी रुपयांचा वार्षिक तोटा सहन करावा लागत आहे, अशी माहिती एका वृत्त संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत बंधारा आणि इंद्रायणी नदीवरील निघोजे बंधार्‍यातून अशुद्ध पाणीउपसा केला जातो. त्यावर प्रक्रिया करून शुद्ध पाणीपुरवठा नागरिकांना केला जातो. त्यासाठी देखभाल-दुरुस्तीसह, वीजदेयके, अधिकारी-कर्मचारी यांचे वेतन, रासायनिक घटक, जलसंपदा विभागाचे शुल्क असा अनुमाने २३० कोटी रुपये वार्षिक व्यय केला जातो. त्यातून उत्पन्न ८० कोटी रुपये येते. त्यातही पाणीपट्टी भरणा नागरिकांकडून वेळेत केला जात नाही. थकबाकीदारांची संख्या वाढून पाणीपुरवठा विभागावर आर्थिक बोजा वाढत आहे. एकूण पाणीजोड ग्राहक संख्या १ लाख ८० सहस्र ३९५, तसेच ५ सहस्र रुपयांपेक्षा अधिक थकबाकीदार ग्राहक ६६ सहस्र २२६, तर एकूण पाणीपट्टी थकबाकीदार ६७ कोटी १९ सहस्र इतकी आहे.

संपादकीय भूमिका

प्रतिवर्ष १५० कोटी रुपयांचा तोटाहा आहे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कारभार ! एवढ्या मोठ्या प्रमाणात थकबाकी का ठेवली जाते ? यावर कुणाचा अंकुश कसा काय नाही ?