जम्मू-काश्मीर येथील आक्रमणाच्या निषेधार्थ अमरावती येथे कडकडीत बंद !

भाजप आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने !

आक्रमणाच्या निषेधार्थ अमरावती येथे कडकडीत बंद

अमरावती – जम्मू-काश्मीर येथील पहलगाममधील आतंकवादी आक्रमणाच्या निषेधार्थ २५ एप्रिल या दिवशी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला नागरिक, व्यापारी, उद्योजक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठेसह सर्वच ठिकाणी दुकाने बंद होती. विश्व हिंदु परिषद, बजरंग दल आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी येथील राजकमल चौक येथे निदर्शने करून पाकिस्तानचा निषेध केला. या आतंकवादी आक्रमणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी विश्व हिंदु परिषद, बजरंग दल आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी बंदचे आवाहन केले होते. राजकल चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भाजप आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने दुचाकीवरून मोर्चा काढण्यात आला. सकाळी १० पासून बाजारपेठेत शुकशुकाट होता. राजकमल चौक येथे विविध पक्ष आणि संघटना यांचे पदाधिकारी, हिंदुत्वनिष्ठ, कार्यकर्ते, धर्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी अनेकांनी स्वतःच्या भावना व्यक्त केल्या.

‘आतंकवादी आक्रमणाच्या घटनेचा निषेध करणारे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. पहलगाम भागात पर्यटकांवर आक्रमण करून आतंकवाद्यांनी निरपराध जिवांचा बळी घेतला आहे. हे आक्रमण निंदनीय आणि भ्याड असून केंद्र सरकारने आतंकवाद्यांच्या विरोधात ठोस पावले उचलावीत’, असे आवाहन निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. या वेळी आतंकवादी आक्रमणात ठार झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वहाण्यात आली. सामूहिक हनुमान चालिसा पठणही करण्यात आले. ‘पाकिस्तानमध्ये घुसण्याची नव्हे, तर युद्ध करून पाकिस्तानला नकाशावरून काढून टाकण्याची वेळ आली आहे’, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.