‘सज्जन माणसे अल्पायु आणि दुर्बल असणे, याउलट दुर्जन माणसे दीर्घायु आणि सबल असणे’, हा अलीकडच्या काळात भारताला मिळालेला शाप आहे. छत्रपतींसारखा पुण्यपुरुष ५० व्या वर्षी आजारी पडून निजधामी गेला, तर औरंगजेबासारखे पाप्याचे पितर ९२ वर्षे भूमीला भार ठरले. या विसंगतीला काय म्हणायचे ? छत्रपती शिवाजी महाराज अजून १० वर्षे जगले असते, तर त्यांनी औरंगजेबाला नक्की ठार मारले असते. सेतु माधवराव पगडी म्हणतात, ‘समर्थांचे (समर्थ रामदासस्वामी यांचे सगळे शिष्य दीर्घायुषी होते. स्वतः समर्थ ७५ वर्षे जगले, भीमस्वामी ९९ वर्षे, अक्काबाई ८५ वर्षे, कल्याणस्वामी ८० वर्षे.’ समर्थांनी साधकाला व्यायाम करायला शिकवले. देहबुद्धी टाकून देणे, याचा अर्थ देहाची हेळसांड करणे नव्हे.
‘हे जग दुबळ्या लोकांसाठी नाही’, असे स्वामी विवेकानंद म्हणत. एक संस्कृत सुभाषितकार म्हणतो, ‘हत्ती अथवा वाघ बळी दिला जात नाही; कारण ते सामर्थ्यशाली असतात. बोकड दुबळा असल्यामुळे त्याला बळी दिले जाते. समर्थांनी गावागावांत हनुमंताची मंदिरे उभी केली ती शक्तीच्या उपासनेसाठी.’
एकदा समर्थशिष्य उद्धव याला माहुलीच्या मुसलमान ठाणेदाराने देवपूजा करतांना पाहून तुरुंगात टाकले. तो ३ दिवस तुरुंगात उपाशीपोटी होता. ही वार्ता कळताच समर्थ आपल्या ४०-५० बलदंड शिष्यांना घेऊन माहुली गावी आले. त्यांनी त्या मुसलमान ठाणेदाराला हंटरने फोडून काढले आणि ते उद्धवाला म्हणाले, ‘नुसता जप आणि ध्यान करू नकोस. जरा सूर्यनमस्कार घालत जा.’ जीवनाचे नियोजन करायचे असल्यास शक्तीचा संचय अपरिहार्य आहे.
(साभार : ग्रंथ ‘समर्थ रामदासांचे व्यवस्थापन’ , सप्टेंबर २००७)