
मुंबई – राज्यातील महानगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायत या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा राज्यशासनाने घेतला. प्रत्येक नागरी स्थानिक संस्थांच्या कार्यक्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या जवळ प्राण्यांसाठी स्मशानभूमीची निर्मिती केली जाणार आहे.
याविषयी २५ एप्रिल या दिवशी नगरविकास विभागाने शासन आदेश काढला आहे. सध्याचे परिवहनमंत्री आणि शिवसेनेचे तत्कालीन आमदार प्रताप सरनाईक यांनी २५ जुलै २०२३ या दिवशी विधानसभेत कुत्रे, मांजरे, गाय, बैल आदी प्राण्यांसाठी स्मशानभूमीची व्यवस्था करावी, असे औचित्याचे सूत्र उपस्थित केले होते. यावर कार्यवाही करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्यावर त्यांचे मृतदेह खाडी, तलाव, पाण्याचे डबके, मैदान, रस्ते यांवर आदी ठिकाणी फेकले जातात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. त्यामुळे भविष्यात प्राण्यांच्या मृतदेहावर स्मशानभूमीत अंत्यविधी करावा. पाळीव प्राण्यांचे मृतदेह अन्यत्र फेकण्यात येऊ नयेत, असे आवाहन शासनाच्या नगरविकास विभागाकडून करण्यात आले आहे.