
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संगणकावर अल्प आकाराच्या धारिका पडताळून अधिक आकाराच्या धारिका नंतर पडताळण्यामागील दृष्टीकोन

‘परात्पर गुरु डॉ. आठवले संगणकावर ग्रंथांच्या धारिका पडताळतात. तेव्हा त्या धारिका प्रथम आकारानुसार, म्हणजे अल्प (कमी) ‘केबी’च्या प्रथम, उदा. ९ ‘केबी’ची धारिका प्रथम आणि त्यानंतर १०, ११, १४ ‘केबी’ अशा क्रमाने पडताळतात. अल्प आकारामानाच्या धारिका प्रथम तपासल्याने अल्प वेळेत अधिक संख्येने धारिका पडताळून होतात. त्यामुळे अधिक आकारमान असलेल्या धारिका वाचण्यासाठी अधिक वेळ उपलब्ध होतो. याचा आणखी एक लाभ असा होतो, अधिक संख्येने धारिकांवर पुढील प्रक्रिया करण्यास आरंभ होतो आणि पर्यायाने फलनिष्पत्ती वाढते. असे असले, तरी अगदी तातडीने एखादी धारिका द्यायची असेल, तर सेवेच्या आवश्यकतेनुसार ते अधिक प्राधान्याची आणि आकारमानाची धारिका प्रथम पडताळून देतात. (केबी, म्हणजे किलोबाइट्स – संगणकीय धारिकांचे आकारमान मोजण्याचे परिमाण)
२. परात्पर गुरु डॉ. आठवले ग्रंथांसाठी लिखाण निवडतांना १ – २ ओळींचे लिखाण असेल, तर ते स्वतःच पडताळून अंतिम करत असल्याने अन्य साधकांचा वेळ वाचणे
परात्पर गुरु डॉ. आठवले ग्रंथांसाठी लिखाणही निवडतात. लिखाण निवडतांना आवश्यक तेवढे अर्थबोध करणारे लिखाणच निवडतात. त्यामुळे सनातनच्या ग्रंथांमध्ये सूत्रबद्ध आणि उद्बोधक लिखाणच घेतले जाते. असे लिखाण निवडतांना त्यामध्ये १ – २ ओळींची वाक्ये असतील, तर ते त्यांच्यासमवेत सेवा करणार्या साधकालाच ती वाक्ये टंकलेखनासाठी देतात आणि स्वतःच ती पडताळून अंतिम करतात. त्यामुळे टंकलेखन, मुद्रितशोधन आणि संकलन करणार्या अन्य साधकांचा वेळ वाचून तो त्यांना अन्य धारिकांसाठी वापरता येतो.
३. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले व्यस्त आहेत’, असे समजून साधक दाराबाहेरच वाट पहात उभे राहिल्यास त्यांनी साधकांना वाट न पहाता लगेच येऊन शंका विचारण्यास सांगणे
पूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले संगणकावर धारिका पडताळत असतांना त्यांच्याकडे शंका विचारायला आलेले साधक ‘ते व्यस्त आहेत’, असे पाहून कधी दाराच्या बाहेरच वाट पहात उभे रहात. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ते साधक आल्याचे त्यांच्या शेजारी असलेल्या दरवाजाच्या काचेत दिसे. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांना लगेच बोलवत आणि त्यांना सांगत ‘वाट पहायला नको. लगेच येऊन विचारा.’
४. गुरूंप्रमाणेच साधकांचीही सेवा करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले
परात्पर गुरु डॉ. आठवले सेवा झाल्यावर खोलीत जातांना त्यांच्या मागे असलेल्या संगणकावर सेवा करणारा साधक जर आधी उठून गेला असेल आणि त्याच्या आसंदीवर घातलेले कापड चुरगळलेले असेल, तर परात्पर गुरु डॉक्टर स्वत: ते कापड नीट करत. परात्पर गुरु डॉ. आठवले शिष्यावस्थेत असतांना प.पू. भक्तराज महाराज त्यांच्या आसनावरून उठून बाहेर गेल्यास ते येण्यापूर्वी ते आसन व्यवस्थित करून ठेवत असत. म्हणजे ते जशी त्यांच्या गुरूंची सेवा करत, तशीच ते ‘साधकांचीही सेवा करतात’, असे यातून लक्षात येते.
५. ‘आध्यात्मिक स्तरावरील त्रासामुळे साधकाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चैतन्य सहन होणार नाही’, हे लक्षात घेऊन त्यांनी साधकाला काही वर्षे त्यांच्या समवेत सेवा करण्यास न बोलावणे
प्रारंभी मला आध्यात्मिक स्तरावर पुष्कळ त्रास व्हायचा. तशातच एक दिवस परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सेवेतील एका साधकाने मला सांगितले, ‘‘उद्यापासून तुला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेत बसून ते धारिकांमध्ये सांगत असलेल्या सुधारणा करण्याची सेवा करायची आहे.’ त्यानंतर संध्याकाळी त्याने मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा निरोप सांगितला, ‘धैवतला आता बसवायला नको. त्याला पुष्कळ त्रास होईल.’
६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकाला त्यांच्या समवेत सेवा करण्यास बोलावल्यावर त्यांचे चैतन्य सहन न झाल्याने साधक थोडेच दिवस सेवा करू शकणे; मात्र त्याला त्यातून वर्षभर सेवा केल्याचा आनंद मिळणे
काही काळानंतर मी दुसरी एक सेवा करत होतो. तेव्हा मला काही दिवस परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत सेवेसाठी बसण्याची संधी मिळाली. त्यानंतर काही दिवसांनी अचानक मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेत धारिका पडताळण्याची सेवा मिळाली. मला त्रास होऊ नये; म्हणून ते मला पूर्वी सेवेसाठी बोलावत नव्हते. पुढेही त्यांच्या समवेत सेवा करतांना मला आध्यात्मिक त्रास असल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चैतन्य सहन होत नव्हते. त्यामुळे मी वर्षातून १ – २ महिनेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेत सेवा करायला बसू शकायचो. परात्पर गुरु डॉ. आठवले मला बर्याच सेवा सांगायचे; परंतु त्रास होत असल्याने मी त्या पूर्ण करू शकत नव्हतो. सेवा पूर्ण केली, तर तिच्यात बर्याच चुका झालेल्या असायच्या. आध्यात्मिक त्रासामुळे मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सहवासाचा आनंद घेता येत नव्हता; मात्र त्या करुणाकर माऊलीने मला कधीही अंतर दिले नाही. वर्षातून १ – २ मास परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेत घडणारी सेवा, म्हणजे माझ्यासाठी वसंतऋतूच असायचा. तेवढ्या काळात मला वर्षभर सेवा केल्यानंतर मिळणारा आनंद मिळायचा.
७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मनात शंका येताच विचारलेली शंका नेहमी योग्यच असल्याची साधकाला जाणीव होणे
‘परात्पर गुरु डॉ. आठवले जेव्हा एखादा प्रश्न विचारतात, तेव्हा त्यांना आलेली शंका योग्यच असते’, याचा मी वेळोवेळी अनुभव घेतला. एखाद्या सेवेतील एखादे सूत्र पूर्ण झाले नसेल, तर त्या वेळी ते नेमकी शंका विचारतात. लिखाणासंदर्भात जिथे त्यांच्या मनात शंका येईल, तिथे ते आवर्जून शंका विचारतात. ते कधीच ‘केले असेल त्याने’, असा विचार करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या समवेत सेवा करणार्या साधकालाही परिपूर्ण सेवा करण्याची सवय लागते.
७ अ. परात्पर गुरु डॉक्टरांनी सगळ्या धारिका वाचून झाल्यावर ‘आणखी एखादी धारिका आली आहे का ?’, असे विचारणे आणि एक महत्त्वाची धारिका साधकाने त्यांना दाखवलेली नसणे : सद्गुरु अप्पाकाकांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मोठ्या भावांनी) देहत्याग केला. तेव्हा अनेक साधकांनी त्यांच्याविषयीचे लिखाण पाठवले. काही संतांनीही लिखाण पाठवले होते. सर्व धारिका वाचून झाल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला विचारले, ‘आणखी कुणाचे लिखाण आले आहे का ?’ मी त्यांना ‘नाही’ म्हटले. तेव्हा त्यांनी मला संचिका उघडून दाखवण्यास सांगितली. तेव्हा तेथे एक धारिका होती आणि तिच्यात महत्त्वाचे लिखाण होते. ती माझी मोठी चूक होती.
७ आ. एखाद्या शब्दाविषयी शंका आल्यावर त्याविषयी २ साधकांना विचारून संपूर्ण खात्री करणे : ग्रंथांचे लिखाण वाचतांना एखाद्या शब्दाबद्दल त्यांना शंका आली, तर ते विचारायचे. मला विचारल्यावर आणखी एका साधकाला विचारायचे. ‘चूक होऊ नये आणि देवाने दिलेल्या विचारानुसार वागावे’, याची ते पूर्ण दक्षता घ्यायचे.
८. स्वतः निष्णात आधुनिक वैद्य असूनही परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अन्य वैद्यांनी सांगितलेले औषधोपचार नियमितपणे करणे आणि त्यांनी सांगितलेले सर्व नियम पाळणे
८ अ. महत्त्वाची सेवा असतांना थंडी वाजून ताप आल्यावर वैद्यांनी विश्रांती घेण्यास सांगितल्याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विश्रांती घेणे : एक महत्त्वाची सेवा करायची असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांना थंडी वाजून ताप येऊ लागला होता. त्या वेळी मी त्यांना विश्रांती घेता का ?’, असे विचारले; मात्र त्यांनी तशाही स्थितीत सेवा करणे चालू ठेवले होते. थोड्या वेळाने एका वैद्य साधकांनी येऊन त्यांना तपासले आणि औषधे घेण्यास सांगितली. त्यासाठी ते खोलीत गेले. नंतर त्या वैद्य साधकांनी त्यांना विश्रांती घेण्यास सांगितले. ते वैद्य साधक बाहेर गेल्यावर मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना एक शंका विचारण्यासाठी त्यांच्या खोलीत गेलो. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘आता वैद्यांनी विश्रांती घेण्यास सांगितली आहे. वैद्यांनी सांगितले, तसे आपण वागले पाहिजे. त्यामुळे मी आता विश्रांती घेतो. तसा निरोप तू संबंधित साधकांना दे.’’
८ आ. अनेक वर्षे रुग्णाईत स्थितीत असूनही परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी औषधोपचार नियमितपणे करणे : ते गेली बरीच वर्षे सतत रुग्णाईत स्थितीत आहेत. त्यांना त्यासाठी पुष्कळ औषधोपचार करावे लागतात. त्याविषयी किंचितही किंतु न बाळगता ज्या ज्या उपचारपद्धतींनुसार त्यांना औषधे, व्यायाम इत्यादी सांगितलेले असतात, ते नियमितपणे ते उपचार पूर्ण करतात. कधीही औषध घेतले नाही, असे ते करत नाहीत. त्यातून ‘क्रियमाण चुकू नये’, याची ते काळजी घेत असतात’, हे लक्षात येते.
– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.१०.२०२४)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |