मध्यंतरी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात प्रसारातील युवा साधकांचे शिबिर झाले. त्या वेळी युवा साधकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. या सत्संगात सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) हेही उपस्थित होते. सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा काही भाग आपण २५ एप्रिल २०२५ या दिवशी पाहिला. आज पुढील भाग येथे दिला आहे.
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा-https://sanatanprabhat.org/marathi/906616.html

३. प्रत्यक्ष साधना
३ इ. लहान वयात एका संतांना साधना आणि सनातन संस्थेच्या ग्रंथांचे महत्त्व सांगणारी कु. सिद्धी जाधव !
कु. सिद्धी जाधव : मी माझ्या मामांच्या घरी गेले होते. त्या वेळी तेथे मुंबईचे एक महाराज आले होते. त्यांना त्यांच्या वयाच्या ११ व्या वर्षीच दत्तगुरु प्रसन्न झाले होते. ते तुळजापूरच्या श्री भवानीदेवीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. मी त्या महाराजांचे दर्शन घेण्यासाठी गेले. तेव्हा मी त्यांना सनातन-निर्मित ग्रंथांविषयी सांगितले.
त्यांना सनातन पंचांगाचे महत्त्वही सांगितले. तेव्हा त्यांनी स्वत:हून २५ ग्रंथांची मागणी केली.
परात्पर गुरु डॉ.आठवले : छान !
कु. सिद्धी जाधव : ते महाराज म्हणाले, ‘‘माझ्या दरबारात (भक्तांच्या विविध समस्यांच्या निवारणासाठी आयोजित केलेला सत्संग) जे भक्तगण येतात, त्यांना मी हे ग्रंथ देईन आणि त्यांना ग्रंथांचे महत्त्वही सांगीन.’’ मी त्यांना ‘दत्त’ हा ग्रंथ दाखवला आणि माहितीही सांगितली. तेव्हा त्यांना पुष्कळ चांगले वाटले. ते म्हणाले, ‘‘मी माझ्या भक्तांनाही या ग्रंथाचे महत्त्व सांगीन.’’
माझ्या आजीने त्यांना सांगितले, ‘सिद्धी गोव्यातील सनातनच्या आश्रमात शिबिरासाठी जाणार आहे.’ तेव्हा ते म्हणाले, ‘मलासुद्धा आश्रम पहायचा आहे.’
परात्पर गुरु डॉ. आठवले : घरी जातांना त्यांच्यासाठी आश्रमातून काहीतरी प्रसाद घेऊन जा !
कु. सिद्धी जाधव : हो. जेव्हा ते देवीच्या दर्शनासाठी जाण्यास निघाले, तेव्हा त्यांनी मला पहाटेच उठवले आणि सांगितले, ‘तू रामनाथी आश्रमात जाणार आहेस, तर तुमच्या गुरुदेवांना माझा नमस्कार सांग.’
परात्पर गुरु डॉ. आठवले : माझाही त्यांना नमस्कार सांग.
परात्पर गुरु डॉ. आठवले : लहान असूनही तू संतांना सनातनविषयी सर्व एकटीने सांगितलेस ! शाब्बास !
कु. सिद्धी जाधव : मी जे करत आहे, ते आपल्या कृपेमुळे आणि पू. दीपालीताई (सनातन संस्थेच्या ११२ व्या संत पू. (कु.) दीपाली मतकर) यांचे मार्गदर्शन लाभल्यामुळे करत आहे. त्या मला व्यष्टी साधना आणि समष्टी साधना यांविषयी पुष्कळ चांगले मार्गदर्शन करतात.
परात्पर गुरु डॉ. आठवले : तुला पू. दीपाली यांच्यासारखे व्हायचे आहे ना ! आता ही (कु. सिद्धी) बोलत असतांना कुणाला सुगंध आला का ? ज्यांना सुगंध येत नाही, त्यांनी स्वतःची साधना वाढवायला पाहिजे. तो सूक्ष्म गंध असतो. तो आला, तर ‘आपलीही प्रगती झाली आहे’, असे समजू शकतो.
कु. सिद्धी जाधव : सर्व आपल्याच कृपेने होत आहे परम पूज्य !
३ ई. हनुमानाला प्रार्थना केल्यामुळे युवा साधक ‘मल्लखांब’ चढू शकणे आणि उत्तम प्रकारे मल्लखांबाचा व्यायाम करू शकणे
श्री. चेतन राजहंस : हा श्री. आर्य प्रवीण नाईक आहे. त्याची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के आहे आणि तो पुण्याहून आला आहे. त्याने सनातन-निर्मित बरेच ग्रंथ वाचले आहेत.
परात्पर गुरु डॉ. आठवले : एवढ्या लहान वयात ग्रंथ वाचले आहेत !
श्री. चेतन राजहंस : त्याला मल्लखांबही येतो. (‘मल्लखांब’ हा कमी वेळेत अधिक व्यायाम होण्यासाठी उपयुक्त असलेला महाराष्ट्रातील एक पारंपरिक व्यायाम प्रकार आहे. यामध्ये लाकडी स्तंभाच्या साहाय्याने योगासने केले जातात.)
परात्पर गुरु डॉ. आठवले : अरे वा ! दुसर्यांनाही शिकवतोस का ?
श्री. आर्य प्रवीण नाईक (वर्ष २०२४ ची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, पुणे, महाराष्ट्र) : नाही, परम पूज्य ! ६ वर्षे झाली. अजून मी स्वतःच शिकत आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले : तुला दुसर्या शहरांत आणि जिल्ह्यांत जाऊन मल्लखांब शिकवायचा आहे. तिसर्या महायुद्धाच्या आधी साधकांना हे यायला पाहिजे ना !
कु. आर्य प्रवीण नाईक : हो. मल्लखांबाविषयी मला एक अनुभूती आली. मल्लखांबाची स्थापना महाराष्ट्रातील वणी जिल्ह्यातील सप्तश्रृंगीदेवीच्या समोर झाली होती आणि ती आमची कुलदेवीही आहे. तेव्हा माझ्या मनात असा विचार आला की, कुलदेवीनेच मला या खेळाशी परिचय करून दिला आहे. तिनेच या खेळाद्वारे माझ्या साधनेचे नियोजन केले. त्या वेळी माझ्याकडून पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.
परात्पर गुरु डॉ. आठवले : मल्लखांबापासून वर ईश्वरापर्यंत जायचे आहे.
कु. आर्य प्रवीण नाईक : हो ! तेव्हा आरंभी असे होत होते की, मी प्रार्थना न करताच खांबावर चढत असे. त्यामुळे मला त्वचेवर पुष्कळ वेदना होत असत. नंतर मला माझ्या वडिलांनी सांगितले, ‘हनुमानाला प्रार्थना करून खांबावर चढत जा.’ त्यानंतर मी प्रार्थना करू लागलो आणि मला मल्लखांबाचे विविध प्रकारचे व्यायाम उत्तमरित्या करता येऊ लागले. मला पुष्कळ आनंदही मिळू लागला.
४. भावजागृतीविषयीची सूत्रे
४ अ. साधना केल्यावर भाव निर्माण होणार असून आणि भावापर्यंत जाण्यासाठी ‘सेवा’ हा एक साधनामार्ग आहे !
कु. गिरिजा शेंडे : आमच्या घरी सनातन संस्थेच्या सद्गुरु (सुश्री) स्वाती खाडये आल्या होत्या. आमच्या घरात बाहेरच्या खोलीत कोल्हापूरच्या महालक्ष्मीदेवीचे एक चित्र आहे. ते त्यांनी पाहिले आणि म्हणाल्या, ‘हे चित्र पुष्कळ सजीव झाले आहे आणि त्यामध्ये सात्त्विकता आहे.’’
देवीच्या साडीच्या निर्यांच्या रंगामध्ये प्रतिदिन पालट होतात किंवा त्या चित्रामध्ये प्रतिदिन काही तरी पालट होतो. माझे आजोबा आधुनिक पशूवैद्य भूपाल शेंडे (वर्ष २०२४ ची आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ८६ वर्षे) यांचा पुष्कळ भाव आहे. ते पूजासुद्धा पुष्कळ भावपूर्ण रीतीने करतात. ते अत्यंत मन लावून प्रत्येक कृती करतात. त्यांचा जेवढा भाव आहे, तेवढा भाव माझ्यात नाही. ‘तसा भाव माझ्यात केव्हा येणार ?’ असे मला पुष्कळ वाटते.
परात्पर गुरु डॉ. आठवले : साधना करता करताच भाव निर्माण होत असतो. भाव निर्माण झाला, तर साधना कोण करू शकेल ? ते भावावस्थेत ईश्वराशी जोडले जातात. चांगले आहे की, तुझ्यामध्ये भाव नाही. तुला पुष्कळ सेवा करायची आहे ना ?
कु. गिरीजा शेंडे : हो. मला पुष्कळ सेवा करायची आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले : सेवा करता करता साधक भावाच्या स्थितीपर्यंत पोचतोच. भावापर्यंत जाण्याचा तो एक साधनामार्ग आहे. तू वयाच्या ३० – ४० व्या वर्षीच भावाची स्थिती अनुभवशील. काळजी करू नकोस.
(क्रमश:)
लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/907554.html