नवी देहली – पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी ४ मोठे निर्णय घेतले आहेत. यांतील सिंधू जल करार स्थगित करणे, हा सर्वांत मोठा निर्णय आहे. ‘जोपर्यंत पाकिस्तान आतंकवादाला पाठिंबा देत राहील, तोपर्यंत भारत हा करार लागू करणार नाही’, असे भारताने म्हटले आहे. आता प्रश्न असा आहे की, सिंधू जल करार रहित करणे इतके सोपे आहे का ? भारत एका रात्रीतच ३ नद्यांचे पाणी थांबवू शकतो का ? या ३ नद्यांचे पाणी रोखण्यासाठी भारताला किती वेळ लागेल? हे समजून घ्यावे लागेल.
३ नद्यांचे पाणी एका रात्रीत थांबवता येणार नाही !
सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर भारत आता पाकिस्तानला झेलम, चिनाब आणि सिंधू या नद्यांचे पाणी वापरण्याची अनुमती देणार नाही; मात्र हे पाणी पाकला जाण्यापासून रोखण्यासाठी सध्या भारताकडे पायाभूत सुविधा नाहीत. जरी भारताने धरणे बांधून किंवा पाणी साठवून असे केले, तर जम्मू-काश्मीर आणि पंजाब या राज्यांमध्ये भीषण पूर येऊ शकतो.
पाणी थांबवण्यासाठी किती वेळ लागेल ?
सध्याची परिस्थिती पहाता भारताने ३ नद्यांवर ४ प्रकल्पांची योजना आखली आहे. यांपैकी २ कार्यरत आहेत आणि इतर दोघांची सिद्धता चालू आहे. भारताने चिनाब नदीच्या पाकिस्तान भागात बागलिहार धरण आणि रॅटले प्रकल्प, चिनाबची दुसरी उपनदी असलेल्या मारुसुदरवर पाकल दुल प्रकल्प, तर झेलमची उपनदी असलेल्या नीलमवर किशनगंगा प्रकल्प चालू करण्यात आला आहे. यांपैकी केवळ बागलिहार धरण आणि किशनगंगा प्रकल्प कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत जर भारताला पाकिस्तानचा भाग असलेल्या ३ नद्यांचे पाणी थांबवण्याला बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. या ३ नद्यांमधून मिळणारे लाखो क्युसेक (पाणी मोजण्याचा घटक) पाणी वापरण्यासाठी भारताला पायाभूत सुविधा सिद्धता कराव्या लागतील. पाकिस्तानचे तज्ञही तेच म्हणत आहेत. पाकिस्तानी नेत्यांचे म्हणणे आहे की, भारत सिंधू जल कराराअंतर्गत मिळणारे पाणी एका रात्रीत थांबवू शकत नाही, त्यामुळे त्यांच्याकडे भारताच्या या निर्णयाविरुद्ध कायदेशीर लढाई लढण्यासाठी पुरेसा वेळ आहे.
पाकची शेतभूमी कोरडी पडेल !
पाकिस्तानच्या सिंध आणि पंजाब या प्रांतांतील ९० टक्के शेतीयोग्य भूमी त्यांच्या पाण्याच्या गरजांसाठी सिंधू पाणी करारांतर्गत पुरवल्या जाणार्या पाण्यावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत जर भारताने चिनाब, झेलम आणि सिंधू या नद्यांचे पाणी रोखले, तर पाकिस्तानमध्ये अराजकता निर्माण होऊ शकते. पाणी थांबवल्यामुळे पाकिस्तानची शेतीयोग्य भूमी केवळ कोरडी पडेल असे नाही, तर पिण्याचे पाणी आणि वीज प्रकल्प यांनाही मोठा फटका बसेल. भारताच्या या पावलामुळे पाकिस्तानला आर्थिक संकटाचा फटका सहन करावा लागणार आहे.