पाकिस्तानमधील प्राध्यापक इश्तियाक अहमद यांचा घरचा अहेर !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणानंतर पाकिस्तानला उघडे पाडण्याचे काम पाकिस्तानचेच प्राध्यापक इश्तियाक अहमद यांनी केले आहे. भारताच्या फाळणीसह विविध सूत्रांवर अनेक पुस्तके लिहिणारे प्रा. अहमद यांनी पाकिस्तानचे सैन्यदलप्रमुख जनरल असीम मुनीर यांना पहलगाम येथील आक्रमणाला उत्तरदायी ठरवले आहे.
‘आम्ही (मुसलमान) हिंदूंपेक्षा वेगळे आहोत’ हे मुनीर यांचे विधान अत्यंत चिथावणीखोर आहे. त्यांच्या विधानानंतर काही दिवसांनीच आतंकवाद्यांनी निष्पाप लोकांची हत्या केली. पाकची खरी सत्ता सैन्यदलप्रमुखांकडे आहे’, असे प्रा. अहमद यांनी म्हटले आहे.
प्रा. इश्तियाक म्हणाले की,
१. जनरल मुनीर यांनी पुन्हा एकदा द्विराष्ट्र सिद्धांताचा पुरस्कार केला आहे. अंतर्गत गोंधळापासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी मुनीर यांनी हे विधान केले आहे.
२. माझ्यासारखे अनेक लोक पाकिस्तानचे भारताशी संबंध सुधारण्यासाठी काम करत आहेत, जेणेकरून व्यापार चालू होईल आणि पाकिस्तानची परिस्थिती सुधारू शकेल.
३. आपण भारताविरुद्ध ४ युद्धे गमावली आहेत आणि एक इंचही भारतीय भूमी हस्तगत करू शकलो नाही; उलट आपण आपल्याच देशाचे (बांगलादेशाचे) विभाजन केले.
४. पाकिस्तानची जगात पुन्हा अपकीर्ती होईल आणि त्याला ‘अराजकता पसरवणारा देश’ म्हटले जाईल. तहव्वुर राणालाही भारतात परत आणण्यात आले आहे आणि त्याला अशा गोष्टी उघड करण्यास भाग पाडले जाईल, ज्यामुळे पाकिस्तानसाठी मोठ्या समस्या निर्माण होतील.
५. बलुचिस्ताननंतर आता सिंधमधील लोकही बंडखोरी करत आहेत. ईशान्य सीमावर्ती प्रदेश आधीच आतंकवादाच्या आगीत जळत आहे; म्हणूनच जनरल मुनीर यांनी पाकिस्तानातील लोकांचे लक्ष या गोष्टींपासून विचलित करण्यासाठी द्विराष्ट्र सिद्धांताचे पुनरूज्जीवन करण्याचा प्रयत्न केला आहे.
६. पाकिस्तानचे परराष्ट्र खातेही मूर्ख आहे. तेथे कुठलीही व्यक्ती सक्षम नाही.
चीनमध्ये इस्लामचा नाश होत असतांना मुनीर गप्प आहेत !प्रा. अहमद यांनी म्हटले की, पाकिस्तानला शेजारील देश भारताशी संबंध ठेवायचे नाहीत; पण चीनशी आपले काय संबंध आहेत ? तो आमच्या काकासारखा दिसतो का ? चीन नास्तिक असून तेथून इस्लामचा नाश होत आहे. मुनीर चीनच्या संदर्भात गप्प असून त्यांनी पाकिस्तानला पुन्हा अडचणीत आणले आहे. |
संपादकीय भूमिका
|