
१. सत्ययुग ते कलियुगापर्यंत समष्टी प्रारब्ध आणि समष्टी क्रियमाण यांचे प्रमाण
२. समष्टी प्रारब्धभोग आणि समष्टी क्रियमाण यांनुसार देवाने प्राणी किंवा मनुष्य यांचे रूप धारण करणे

‘देवता अवतार घेतांना त्यांच्यात कार्यानुरूप प्रकट किंवा अप्रकट शक्ती कार्यरत असते, उदा. श्रीकृष्णाचे कार्य पूर्ण जीवन युद्ध करणे असल्याने त्यांच्यात प्रकट शक्ती आणि अप्रकट शक्ती दोन्ही १०० टक्के एवढ्या प्रमाणात होती. याच प्रकारे समष्टी प्रारब्ध आणि समष्टी क्रियमाण यांनुसार अवतारांनी कोणत्या योनीत जन्म घ्यायचे, हे ठरते. योनी हे प्रारब्ध आणि क्रियमाण यांचे दर्शक असते. दगड, वृक्ष, प्राणी इत्यादी ‘भोग योनी’ असतात. या योनीत क्रियमाण कर्म करण्याची शक्ती नसून केवळ प्रारब्धभोग भोगता येतात, याउलट मनुष्य योनी ही ‘क्रियमाण शक्ती’चे प्रतीक आहे.
ज्या वेळी समष्टीची क्रियमाण शक्ती, म्हणजे ‘स्वत: साधना करून समष्टीच्या सात्त्विकतेत वृद्धी करून धर्मराज्य स्थापित करणे’ अधिक असते, त्या वेळी समष्टीच्या आवाहनावर त्यांचे तत्कालिक आणि मंद स्वरूपातील समष्टी प्रारब्ध अल्प करण्यासाठी देव प्राणीरूपात अवतार घेतो. सत्ययुगात समष्टी प्रारब्ध अत्यल्प असून समष्टी क्रियमाण अधिक होते. यामुळे समष्टीच्या आवाहनावर तत्कालीन समष्टी प्रारब्ध अल्प करण्यासाठी देवाने मत्स्य, कूर्म आणि वराह यांसारखे अवतार घेतले. याउलट त्रेता आणि द्वापर या युगांमध्ये समष्टीची क्रियमाण कर्म करण्याची शक्ती तुलनेत पुष्कळ अल्प झाली. यामुळे समष्टी प्रारब्ध अल्प करणे याला दुय्यम प्राधान्य देऊन समष्टीच्या क्रियाशक्तीमध्ये वाढ करण्यासाठी देवाने मनुष्य रूपात, म्हणजे श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या रूपात अवतार धारण केले.
(त्रेता आणि द्वापर या युगांच्या आधी मानव साधना करायचा; म्हणून त्याला साधना शिकवण्यार्या अवताराची आवश्यकता नव्हती, केवळ रक्षणासाठी अवताराची आवश्यकता होती. त्रेता, द्वापर आणि कलि या युगांत शिकवण आणि रक्षण दोन्ही आवश्यक असल्याने देवाने मनुष्य रूपात अवतार घेतला. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले )
३. समष्टीची क्रियमाण शक्ती अल्प होत गेल्याने देवाने प्राणी, अर्धमनुष्य, बालरूप आणि पूर्ण मनुष्य या क्रमाने अवतार रूप धारण करणे
३ अ. समष्टीची क्रियमाण शक्ती ९५ टक्क्यांहून अधिक असल्याने केवळ समष्टी प्रारब्ध अल्प करण्यासाठी देवाने प्राणी योनीत अवतार घेणे : सत्ययुगाच्या आरंभी समष्टीची क्रियमाण शक्ती ९५ टक्क्यांहून अधिक होती. ज्या वेळी समष्टीची क्रियमाण शक्ती ९५ टक्क्यांहून अधिक असते, त्या वेळी ५ टक्के एवढ्या प्रमाणात असलेले प्रारब्ध ठराविक काळासाठीच कार्यरत असते, यामुळे त्या वेळी कार्यरत असलेले समष्टी प्रारब्ध अल्प करण्यासाठी देवाने प्राण्यांच्या रूपात म्हणजे मत्स्य आणि कूर्म असे रूप धारण केले. मत्स्य अवताराचे कार्य पृथ्वी लोकातील काळाशी संबंधित असल्याने समष्टी प्रारब्धभोग भोगून अत्यल्प वेळेत प्राणत्याग करणार्या मत्स्य योनीत देवाने अवतार घेतला. याउलट कूर्म अवताराचे कार्य समुद्रमंथनात साहाय्य करणे, म्हणजे स्वर्गलोकातील काळाशी संबंधित असल्याने दीर्घायुषी कूर्म प्राण्याचे रूप देवाने घेतले. या दोन्ही अवतारांच्या कार्यात समष्टी प्रारब्धभोग नष्ट करण्यासाठी हे अवतार असल्याने ते पूर्ण प्राणी रूपातच होते.
३ आ. समष्टीची क्रियमाण शक्ती ९० टक्के झाल्याने समष्टीच्या क्रियमाणात वृद्धी करणे आणि समष्टी प्रारब्ध अल्प करणे, यांसाठी देवाने अर्धमनुष्य रूपातील वराह अवतार घेणे : कालांतराने समष्टीची क्रियमाण शक्ती ९० टक्के झाल्यावर समष्टीच्या क्रियमाणात वृद्धी करणे आणि समष्टी प्रारब्ध अल्प करणे, या दोन्ही कार्यांसाठी अर्धमनुष्य रूपातील, म्हणजे ‘मुख वराहाचे, तर देह मनुष्याचा’ या रूपात देवाने अवतार घेतला. या अवतार रूपाचा उद्देश ‘क्रियमाण शक्तीद्वारे हिरण्याक्ष असुराशी युद्ध करणे’, असा असल्याने अर्धमनुष्य योनीत देवाने हा अवतार घेतला.
३ इ. समष्टीची क्रियमाण शक्ती ८० टक्के झाल्याने बालरूपात, तर ७० टक्के झाल्यावर पूर्ण आयुष्य जगणारे अवतार देवाने घेणे : मनुष्य योनीतील बालरूप अल्प क्रियमाणाचे, तर वयस्कर रूप पूर्ण क्रियमाणाचे प्रतीक असते. सत्ययुगाच्या शेवटी समष्टीची क्रियमाण शक्ती ८० टक्के झाली, त्या वेळी समष्टीच्या क्रियमाणात वृद्धी करणे आणि समष्टी प्रारब्ध अल्प करणे, यांसाठी देवाने बालवयातील रूप म्हणजे ‘वामन’ अवतार घेतला. या काळापर्यंत समष्टी प्रारब्ध केवळ २० टक्के एवढ्याच प्रमाणात असल्याने अवतारांचे कार्य जीवनकाल इतकेच मर्यादित असायचे. कालांतराने समष्टीची क्रियमाण शक्ती ७० टक्के झाली. ज्या वेळी समष्टीची क्रियमाण शक्ती ७० टक्के होते, त्या वेळी ३० टक्के प्रमाणातील प्रारब्ध सगुण स्तरावर दीर्घकाळ कार्यरत रहाते. या प्रकारचे दीर्घकाळ कार्यरत रहाणारे समष्टी प्रारब्ध अल्प करण्यासाठी बाल, तरुण, युवा, प्रौढ आणि वयस्कर अशा सर्व अवस्थेत कार्यरत असणारा ‘परशुराम’ अवतार देवाने घेतला. पुढे त्रेता आणि द्वापर या युगांमध्ये समष्टीची क्रियमाणशक्ती अधिक अल्प होऊन प्रारब्ध दीर्घकाळ कार्यरत रहात असल्याने पूर्ण जन्म असलेले ‘श्रीराम’ आणि ‘श्रीकृष्ण’ असे अवतार देवाने घेतले.
यांतून स्पष्ट होते की, समष्टीची क्रियमाणशक्ती जशी अल्प होत गेली, त्या प्रमाणात समष्टीच्या क्रियमाणात वृद्धी करणे आणि समष्टी प्रारब्ध अल्प करणे यांसाठी देवाने अनुक्रमे प्राणी, अर्धमनुष्य, बालरूप आणि पूर्ण मनुष्य या क्रमाने अवतार रूप धारण केले आहे.’
– श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.१.२०२२)
‘श्री विष्णूंनी प्राणी रूपांतील अवतार धारण करण्यामागील कार्यकारणभाव’ या संदर्भात मकरसंक्रांतीच्या दिवशी मिळालेले ईश्वरी ज्ञान, म्हणजे देवाने दिलेला तीळगुळ जाणवणे‘९.१.२०२२ पासून माझ्या आध्यात्मिक त्रासांत वाढ झाल्याने मी ज्ञान मिळवण्याची सेवा न करता नामजपादी उपाय करत होतो. अन्य वेळी आध्यात्मिक त्रासांत वाढ झाल्याने मला आपोआप ज्ञान मिळत नाही; पण १५.१.२०२२ या दिवशी नामजप करतांना काही प्रयत्न न करता मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विचारलेल्या ‘सत्ययुगात श्री विष्णूंनी मत्स्य, कूर्म आणि वराह या प्राणी रूपांतील अवतार धारण करण्यामागील कार्यकारणभाव’ या संदर्भात ईश्वरी ज्ञान मिळाले. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘आज मकरसंक्रांत आहे, त्यामुळे या ज्ञानाच्या माध्यमातून देवाने चैतन्याने भारित तीळगुळ दिला आहे.’ – श्री. निषाद देशमुख (१७.१.२०२२) |
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |