काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणाची बातमी पुण्यात समजली, तेव्हा मी एका बैठकीत होतो. आजूबाजूला बरीच माणसे होती. काम संपवून मी बाहेर पडलो आणि तशाच अस्वस्थ मनस्थितीत घरी आलो. येतांना डोळ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी मस्त निवांत आणि आनंदाने मजा करणारे ‘भारतीय नागरिक’ दिसत होते. कुठे कुणी गटागटाने सिगारेट्सचे झुरके घेत उभे होते, कुठे कुणी खाऊगल्लीत मस्त आस्वाद घेत होते, कुठे एखाद्या हॉटेल बाहेर लोक वाट पहात उभे होते, मॉल खचाखच भरून वाहत होते. काश्मीरमध्ये काहीतरी विपरित घडवून आणले गेले आहे आणि ‘हिंदूंना वेगळे काढून मारण्यात आले आहे’, हे लोकांच्या खिजगणतीतही नव्हते.
‘जन्माला आलो हेच कर्तृत्व’, अशा अनेकांच्या वाढदिवसाची सिद्धता केकच्या दुकानांच्या बाहेर चालू होती. २३ एप्रिल या दिवशी रात्री १२ वाजता ७-८ ठिकाणी वाढदिवसाचे फटाके वाजलेच ! आमच्या बाजूच्या वस्तीत कुठल्याशा कार्यक्रमाचा ‘डॉल्बी’ ध्वनीक्षेपकांचा आवाज चालू होता. काश्मीरविषयी दुःख व्यक्त करायला सवड आहे कुणाला ? ‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत’, हे शब्द शालेय वर्षे संपली की, लोक विसरून जातात. नंतर ‘भारत कधी कधी माझा देश आहे’, अशी त्यांची धारणा होते आणि आणखी काही वर्षांनी ‘भारत माझ्या लाभापुरताच माझा देश आहे’, अशी मनस्थिती होते. हेच सत्य आहे.
१. जल्लोष करणारे भारतीय नागरिक अशा दुःखद प्रसंगी एकत्र का येत नाहीत ?
हिंदु सणांना अवाढव्य ‘डॉल्बी’ आणि फ्लेक्स लावणारे आता निषेधाचे फलक लावणार का? निषेध आंदोलन करणार का ? श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करणार का ? या प्रश्नाचे उत्तर कोण देणार ? पहलगाममध्ये अगदी वेचून काढून २८ हिंदु पर्यटकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली, याच्या निषेधार्थ या डॉल्बीजीवी लोकांनी काय केले ? क्रिकेट मॅच जिंकल्यावर रस्त्यांवर एकत्र येऊन जल्लोष करणारे भारतीय नागरिक अशा दुःखद प्रसंगी एकत्र का येत नाहीत ? गाड्यांच्या क्रमांकाच्या पट्टीवर ‘हिंदू’ असे केशरी अक्षरांत लिहून घेणारे आता पहलगाममधील हिंदूंच्या संहाराविषयी काय भूमिका घेणार ?
‘काश्मीरमध्ये आता काय घडले, ते तुम्हाला माहिती आहे का ?’, यावर कुणी पत्रकार किंवा वृत्तवाहिन्यांचे पत्रकार पुण्यातील मॉल्समध्ये मुलाखती घेत फिरला का ? त्याने मजा करणार्या तरुणांना विचारले का ? एका तरी आंदोलक संघटनेला ‘आता तुम्ही याचा निषेध का केला नाही ?’, असे विचारले का ? ‘आयपीएल्’चे क्रिकेट संघ काळ्या पट्ट्या लावून खेळणार का ? कालपासून एक तरी माध्यम प्रतिनिधी स्वतःच्या दंडाला काळी फित लावून वृत्तांकन करतांना दिसला का ?
२. दंगली आणि ‘रिल्स’ करणारे, ‘स्टँड अप कॉमेडियन’ अशा वेळी कुठे असतात ?
एकाही दुकानाबाहेरची विद्युत् रोषणाई बंद करण्यात आली नाही. कुठल्याही घराची मंगल कार्यासाठी केलेली रोषणाई बंद करण्यात आली नाही. उलट मोठमोठ्याने डॉल्बी लावून लोक नाचत होते. एखाद्या महापुरुषाविषयी काही घडले की, देशभर दंगली उसळतात. त्याप्रसंगी जे हातात दगड घेतात, बसेस फोडतात, वाहने पेटवून देतात, ते आज हिंदूंच्या अशा प्रकारे कत्तली झाल्यावर व्यक्त का होत नाहीत ?, हा खरा प्रश्न आहे. सामान्य माणसांच्या भावना जितक्या त्यांच्या आराध्य महापुरुषांशी जोडलेल्या असतात, तशाच त्या राष्ट्रभावना आणि देशातील प्रत्येक व्यक्तीच्या हिताशी जोडलेल्या असतात का ?याचे उत्तर आजतागायत कुणी शोधून काढले का ?
कुणी कुठे एखादे वाक्य आक्षेपार्ह बोलले की, त्यावर त्याच्या छायाचित्राला जोडे मारण्यापासून त्यावर लघुशंका करेपर्यंत आंदोलक निरनिराळी कृत्ये करतात. इथे तर भारताच्या २८ हिंदु नागरिकांनी केवळ हिंदु असल्यामुळे जीव गमावला आहे. आता कुणाचा आणि कसा निषेध करणार ? आक्रमणाच्या दिवशी एकाही मराठी कार्यक्रमाच्या आधी श्रद्धांजली आणि निषेध यांविषयीची तळपट्टी वा ‘स्लाईड’ दाखवण्यात आली नाही. पुण्यातील चौकाचौकात ‘डिजिटल’ विज्ञापनांचे फलक लावले आहेत, त्यावर निषेधाच्या ‘स्लाईड’ दाखवण्यात आल्या नाहीत. भर गर्दीच्या चौकात हातात कुठले पाचकळ फलक हातात घेऊन ‘रिल्स’ (छोटी चित्रफीत) बनवणार्यांनी निषेधाचा फलक हातात घेऊन ‘रिल्स’ केली नाही. एकाही ‘स्टँड अप कॉमेडियन’ने ‘मी या कृत्याचा निषेध करतो’, असा व्हिडिओ केला नाही.
३. ‘मला काय त्याचे ?’, ही वृत्ती कधी उपटणार ?
आपण भारतीय नागरिक अशा घटना मनाला लावून घेतच नाही; कारण त्यात स्वतःचे व्यक्तीगत अशी काहीच हानी झालेली नसते. ‘ज्यांची हानी झाली आहे, ते बघून घेतील. मला काय त्याचे ?’, ही अंगात मुरलेली वृत्ती आपण कधी आणि कशी उपटून काढणार ? हा प्रश्न आहे. अशा घटना घडल्यानंतर समाज म्हणून आपण काय करतो, हे आतातरी देशाचा घटक म्हणून स्वतःच्या आतील आवाजाला आपण विचारणार आहोत का ? किती शाळांमधून सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांनी मैदानात एकत्र उभे राहून मृत हिंदूंना श्रद्धांजली अर्पण केली ? किती कुटुंबांमधून पालकांनी आपल्या मुलांशी या घटनेविषयी बसून सविस्तर चर्चा केली ? किती शिकवणीच्या वर्गांनी श्रद्धांजली आणि निषेधासाठी १ मिनिट वेळ दिला ? किती स्पर्धा परीक्षा केंद्र आणि अभ्यासिका यांमधून सनदी अधिकारी होण्यासाठी अभ्यास करणार्या मुलामुलींनी घटनेच्या दिवशी अन् दुसर्या दिवशी या घटनेवर निषेधात्मक भूमिका व्यक्त केली ? आहे का याचे उत्तर कुणाकडे ? हे सगळे म्हणतील, ‘ते आमचे कामच नाही आणि असा काही निषेध करायला आम्ही बांधील नाही. आम्ही कशावर व्यक्त व्हायचे अन् कशावर नाही, हे तुम्ही आम्हाला शिकवू नका.’
४. रामायणावर अभिव्यक्तीस्वातंत्र्य दाखवणारे विद्यार्थी पहलगामच्या घटनेवर आधारित नाटक करणार का ?
मला प्रश्न पडला आहे की, आता विद्यापिठातील ललित कला केंद्राच्या वार्षिक परीक्षा चालू होतील. त्यासाठीची प्रात्यक्षिक परीक्षासुद्धा होईलच. काही काळापूर्वी रामायणावर अभिव्यक्तीस्वातंत्र्य दाखवणारे विद्यार्थी पहलगामच्या घटनेवर आधारित नाटक करणार का ? ‘पुरुषोत्तम’ किंवा ‘फिरोदिया’ करंडकमध्ये पहलगाम घटनेवर आधारित एकतरी संहिता दिसणार का ? मराठी नाट्य किंवा चित्रपट सृष्टीमध्ये या घटनेवर एकतरी वास्तववादी सत्य कथानक पडद्यावर येणार का ? आहे का याचे उत्तर ?
५. कुटुंबातून राष्ट्रीय चारित्र्य घडवण्याचे संस्कार महत्त्वाचे !
मातृभूमीला माता मानणार्या कुटुंबांमधून ‘आम्हा काय त्याचे’, ही वृत्ती आधी खोडून काढली पाहिजे. घराघरांतून मुलांना ‘आपण असल्या भानगडीत पडायचे नसते. तू तुझा अभ्यास कर’, असले डोस देणे आधी बंद केले पाहिजे. ‘हा आपल्या देशाचा प्रश्न आहे आणि तो अत्यंत गंभीर आहे’, हे देशातील प्रत्येक कुटुंबाने मान्य केले पाहिजे. कुटुंबातून राष्ट्रीय चारित्र्य घडवण्याचे संस्कार जोवर प्राधान्यक्रमाने होणार नाहीत, तोवर ‘मला काय त्याचे’, ही भारतियांची वृत्तीच शत्रूचे बळ वाढवणारी ठरणार आहे. संपूर्ण देश केवळ समाजमाध्यमांवर नाही, तर प्रत्यक्ष सक्रीय रूपात एकत्र उभा राहिला, तरच जगाला योग्य संदेश जाणार आहे.
नागरिक म्हणून आमचे चारित्र्य जितके प्रखर राष्ट्राभिमानी असायला हवे तितके आहे का ? समाजमाध्यमांवर लिहिण्याव्यतिरिक्त आमची स्वतःची भारतीय नागरिक म्हणून काही भूमिका आहे का ? निरपराध व्यक्तींना केवळ धर्मांधतेमुळे मुद्दाम मारण्यात आले, याचे सूतक देशातील प्रत्येक हिंदू पाळणार का ? या प्रश्नांची खरी आणि प्रामाणिक उत्तरे मिळू शकणार नाहीत; कारण ‘मला काय त्याचे’, ही वृत्ती आमच्या रोमारोमांत भिनली आहे. (२२.४.२०२५)
– मयुरेश उमाकांत डंके, मानसतज्ञ, आस्था काऊन्सिलिंग सेंटर, पुणे.