देशाचा खरा इतिहास मांडण्यासाठी अविश्रांत परिश्रम घेणारे बेंगळुरू (कर्नाटक) येथील ‘पद्मभूषण’ डॉ. प्रा. एस्.एल्. भैरप्पा (वय ९३ वर्षे) !

बेंगळुरू (कर्नाटक) येथील डॉ. प्रा. एस्.एल्. भैरप्पा यांचा जन्म २० जुलै १९३१ या दिवशी हासन जिल्ह्यातील चन्नरायपट्टण तालुक्यातील संतशिवर नावाच्या गावात झाला. लहानपणीच ‘बुबोनिक प्लेग’मुळे त्यांनी त्यांची आई आणि भाऊ यांना गमावले. शिक्षणासाठी पैसे मिळवण्यासाठी त्यांनी लहान-मोठी कामे केली आणि भिक्षाही मागितली. त्यांच्या बालपणी त्यांच्यावर लेखक गोरूरु रामस्वामी अय्यंगार यांचा प्रभाव होता.

श्री. भैरप्पा हे १३ वर्षांचे असतांना त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला होता. श्री. भैरप्पा यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण चन्नरायपट्टण तालुक्यात पूर्ण केले आणि त्यानंतर ते मैसुरूला गेले, जिथे त्यांनी त्यांचे पुढील शिक्षण पूर्ण केले. श्री. भैरप्पा हे शालेय शिक्षण घेत असतांना अचानक शाळेतून बाहेर पडले आणि त्यांच्या चुलत भावाच्या सल्ल्यानुसार त्याच्यासोबत वर्षभर फिरले. त्यांनी मुंबईला ‘रेल्वे पोर्टर’ (कुली) म्हणून काम केले. मुंबईत त्यांची साधूंच्या एका गटाशी भेट झाली आणि आध्यात्मिक शांती मिळवण्यासाठी ते त्यांच्यात सामील झाले. ‘भारतीय संस्कृती आणि परंपरा यांविषयी प्रेम, ऐतिहासिक अन् सामाजिक विषयांमध्ये आवड, सत्य आणि वास्तविकता यांचा शोध, साहित्यिक दृष्टीकोन अन् प्रवासाचा अनुभव’ या सर्व कारणांमुळे डॉ. एस्.एल्. भैरप्पा यांना इतिहास संशोधन करण्याची, तसेच त्या आधारावर प्रभावी कादंबर्‍यांची रचना करण्याची प्रेरणा मिळाली.

डॉ. भैरप्पा यांनी ‘तत्त्वज्ञान’ विषयात ‘एम्.ए.’ (पदव्युत्तर कला शाखा) आणि ‘सौंदर्यशास्त्रात’ पीएच्. डी. (विद्यावाचस्पती) मिळवली आहे. डॉ. एस्.एल्. भैरप्पा हे ‘तत्त्वज्ञाना’चे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. सध्या ते ‘राष्ट्रीय प्राध्यापक’ म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांनी ‘एन्.सी.ई.आर्.टी.’मध्ये (‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’मध्ये) ३ दशकांहून अधिक काळ ‘तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक’ म्हणून काम केले आहे. त्यांच्या अनेक कादंबर्‍यांवर हिंदी, कन्नड, तेलुगु या भाषांमध्ये नाटके, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका प्रसिद्ध झाल्या आहेत. आज त्यांच्याविषयीची माहिती जाणून घेऊया.

डॉ. प्रा. एस्.एल्. भैरप्पा

विशेष सदर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्‍या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक

१. सर्वाधिक विक्री होणारे कादंबरीकार

डॉ. एस्.एल्. भैरप्पा हे एक उत्कृष्ट साहित्यिक आहेत. ते कन्नड भाषेत लिहितात आणि गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ ते ‘सर्वाधिक कांदबर्‍यांची विक्री होणारे कादंबरीकार’ आहेत. त्यांच्या अनेक कादंबर्‍यांचे देशातील विविध भाषांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाषांतर झाले आहे. ते गेल्या दशकात मराठीतील सर्वाधिक कांदबर्‍यांची विक्री होणारे कादंबरीकारही आहेत आणि हिंदीतील सर्वाधिक कादंबरी विक्री होणार्‍या पहिल्या ५ लेखकांपैकी एक आहेत. ते एक जागरूक साहित्यिक आहेत, जे त्यांच्या कादंबर्‍यांमध्ये मूलभूत मानवी भावना व्यक्त करतात. भारतीय तात्त्विक आणि सांस्कृतिक परंपरा यांच्या सखोल ज्ञानाव्यतिरिक्त डॉ. प्रा. भैरप्पा यांना त्यांच्या बालपणापासून ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही वातावरणातील सखोल वैयक्तिक अनुभव आहेत. परिणामी त्यांच्या पात्रांची मुळे भारतीय भूमीत खोलवर रुजलेली आहेत. त्यांच्या कादंबर्‍यांवर अनेक चर्चासत्रे झाली आहेत आणि होत आहेत. त्यांच्या कार्यावर आधारित साहित्य समीक्षांचे खंडही प्रकाशित झाले आहेत.

सत्य इतिहास मांडण्यास आग्रही असणारे डॉ. भैरप्पा यांना ‘राष्ट्रीय अभ्यासक्रम पुनरावृत्ती समिती’तून वगळले !

डॉ. प्रा. एस्.एल्. भैरप्पा

‘राष्ट्रीय अभ्यासक्रम पुनरावृत्ती समिती’चे अध्यक्ष पार्थसारथी (पार्थसारथी हे इंदिरा गांधींचे धोरण सल्लागार आणि त्यांचे विश्वासू होते, तसेच ते जवाहरलाल नेहरू कुटुंबाच्याही जवळचे होते.) यांना विचारले, ‘वाराणसीच्या मशिदीकडे एकटक पहाणार्‍या नंदीकडे पाहून कोणता निष्कर्ष काढला जाऊ शकतो ? भविष्यात या विषयावर विद्यार्थ्यांनी शिक्षकांना प्रश्न विचारला, तर शिक्षक काय उत्तर देतील ?’ पार्थसारथी यांच्याकडे या प्रश्नांची उत्तरे नव्हती.

हे ही वाचा –

इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने विद्यार्थ्यांपासून खरा इतिहास लपवला !

Dr. S L Bhyrappa on Distorting Indian History

पार्थसारथी यांनी मला त्यांच्या दालनात नेले आणि सांगितले, ‘तुम्ही कर्नाटकाचे आहात आणि मी तमिळनाडूचा आहे. आपण भावासारखे वागले पाहिजे. आपण भांडायला नको.’ पार्थसारथी यांचे म्हणणे ऐकून मी बाहेर पडलो. १५ दिवसांनी झालेल्या पुढच्या बैठकीत मी पुन्हा तेच प्रश्न विचारले. पार्थसारथी यांनी रागाने तेथेच बैठक संपवली. काही दिवसांनंतर ‘राष्ट्रीय अभ्यासक्रम पुनरावृत्ती समिती’ची पुनर्रचना करण्यात आल्याची सरकारी अधिसूचना प्रकाशित झाली. त्यामध्ये माझे नाव गायब झाले होते. माझ्याऐवजी एका साम्यवादी विचारसरणीच्या इतिहासकाराची नियुक्ती करण्यात आली होती. या समितीने इतिहास आणि सामाजिक अभ्यास यांची पुस्तके पालटून विद्यार्थ्यांपासून खरा इतिहास लपवला. सर्व धडे साम्यवादी विचारसरणीला अनुकूल होते. अभ्यासक्रमात बाहेरील आक्रमकांना ‘नायक’ म्हणून दाखवण्यात आले होते. याउलट भारताचा खरा खजिना, इतिहास आणि ज्ञान यांना त्या पुस्तकांमध्ये स्थान नव्हते.’’

– डॉ. एस्.एल्. भैरप्पा

२. डॉ. एस्.एल्. भैरप्पा यांच्या पुस्तकांचा पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश

डॉ. एस्.एल्. भैरप्पा यांची पुस्तके कर्नाटक राज्यातील विद्यापिठांच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट झाली आहेत, तसेच अनुमाने २० ‘पीएच्.डी’ प्रबंधांचा विषय ठरली आहेत. त्यांनी २४ कादंबर्‍या, साहित्यिक टीकेचे ४ खंड आणि सौंदर्यशास्त्र, सामाजिक समस्या अन् संस्कृती यांवर पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या ६ कादंबर्‍यांचे इंग्रजीत भाषांतर झाले आहे.

३. डॉ. एस्.एल्. भैरप्पा यांना मिळालेले विविध पुरस्कार

डॉ. प्रा. एस्.एल्. भैरप्पा यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार देतांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अ. भारत सरकारकडून ‘पद्मश्री’ आणि ‘पद्मभूषण’ या महत्त्वाच्या पुरस्काराने सन्मानित

आ. वर्ष २०१६ मध्ये ‘आसाम साहित्य सभे’चा ‘मामोनी रायसोम गोस्वामी राष्ट्रीय साहित्य पुरस्कार’

इ. मैसुरू विद्यापिठाकडून वर्ष २०१६ मध्ये ‘मानद डॉक्टरेट’

ई. भारत सरकारकडून वर्ष २०१५ मध्ये ‘साहित्य अकादमी शिष्यवृत्ती’

उ. दीनानाथ मेमोरियल फाऊंडेशन, मुंबईकडून वर्ष २०१२ मध्ये ‘वागविलासिनी पुरस्कार’

ऊ. कोलकाता येथे वर्ष २००७ मध्ये ‘हेडगेवार पुरस्कार’

ए. आंध्रप्रदेशमधील एन्.टी.आर्. पुरस्कार (वर्ष २००७)

४. संशोधन आणि शिष्यवृत्ती

अ. राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक, भारत सरकार

आ. चीन सरकारच्या निमंत्रणावरून चीनला भेट देणार्‍या भारतीय साहित्य प्रतिनिधी मंडळाच्या ५ सदस्यांपैकी एक

इ. अमेरिकेतील भारतीय स्थलांतरितांच्या सांस्कृतिक समस्यांचा अभ्यास करण्यासाठी ‘फोर्ड फाऊंडेशन पुरस्कार’

ई. वर्ष १९७७ मध्ये लंडन विद्यापिठाच्या ‘स्कूल ऑफ एज्युकेशन’मध्ये ‘ब्रिटीश कौन्सिल फेलोशिप’चा कार्यकाळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डॉ. एस्.एल्. भैरप्पा यांच्या भेटीत झालेला संवाद

डॉ. प्रा. एस्.एल्. भैरप्पा (उजवीकडे) यांच्याशी संवाद साधतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी

डॉ. एस्.एल्. भैरप्पा यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हात जोडून काही पावले पुढे चालतात आणि त्यांना आदराने म्हणतात, ‘‘नमस्कार भैरप्पाजी, आपण कसे आहात ?’’ त्यावर भैरप्पाजी ‘मी कर्नाटकचा एस्.एल्. भैरप्पा कन्नड कादंबरीकार’, (नमस्काराच्या हावभावासह आणि शिष्टाचार पाळत), असे उत्तर देतात ! ‘‘सर, तुम्हाला कोण ओळखत नाही ?’’, असे सांगत मोदी लगेच डॉ. भैरप्पा यांचा हात हातात घेत उत्तर देतात. मोदी विचारतात, ‘‘तुम्ही आता कोणते पुस्तक लिहीत आहात ?’’ डॉ. भैरप्पा संकोच करत उत्तर देतात, ‘‘खरे तर नवीन पुस्तक नाही.’’ यावर मोदी पुन्हा म्हणतात, ‘‘कृपया कादंबरी लिहिणे थांबवू नका सर. भारतातील तुमच्या वाचकांना तुमची पुस्तके आणि बुद्धीमत्ता हवी आहे.’’ यावर डॉ. भैरप्पा हसतात.

५. जगभर प्रवास

डॉ. भैरप्पा हे भारतीय शास्त्रीय आणि पाश्चिमात्य संगीताचे उत्सुक श्रोते आहेत आणि कलेचे अभ्यासक आहेत. प्रवास करणे, हा त्यांचा बालपणापासूनचा छंद राहिला आहे. त्यांनी हिमनद्या, अमेझॉनची जंगले, आफ्रिकेतील वाळवंट, युरोप आणि अमेरिकेतील गजबजलेल्या शहरे अशा विविध ठिकाणांसह जगभर प्रवास केला आहे. त्यांनी आल्प्स, रॉकीज, अँडीज आणि फुजियामा येथे पदभ्रमण केले आहे. असे असले, तरी हिमालयात भ्रमण करण्ो, हा त्यांचा सर्वांत मोठा छंद आहे.

६. डॉ. एस्.एल्. भैरप्पा यांची इंग्रजीतील शैक्षणिक प्रकाशने

‘Values in Modern Indian Educational Thought’, 1968 (आधुनिक भारतीय शैक्षणिक विचारातील मूल्ये, १९६८) (नवी देहली: राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद); ‘Truth & Beauty: A Study in Correlations, 1964 (सत्य आणि सौंदर्य : परस्परसंबंधांचा अभ्यास, १९६४) (बडोदा : एम्.एस्. युनिव्हर्सिटी प्रेस); ‘इंडियन फिलॉसॉफिकल क्वार्टरली’, ‘दर्शना इंटरनॅशनल’, ‘जर्नल ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ बडोदा’ यांसारख्या विविध नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेले संशोधनपर २० लेख

डॉ. एस्.एल्. भैरप्पा यांचे महत्त्वपूर्ण विचार

१. कुठलाही इतिहास हा घोषणा, आदर्श किंवा सुधारणा चळवळींशी बांधलेला नाही. तो खर्‍या घटना जशा घडल्या तसाच पाहिला पाहिजे. हे साधण्यासाठी आपण वर्तमानकाळातील खोट्या कल्पनांपासून स्वतःचे आपले मन मुक्त केले पाहिजे.

२. पुरस्कारांना व्यक्तीमुळे महत्त्व येते; व्यक्ती पुरस्कारामुळे महान होत नाही. माझ्या कामांची चिरस्थायित्व हाच माझ्यासाठी खरा पुरस्कार आहे.

३. डॉ. एस्.एल्. भैरप्पा लिखित ‘आवरण’ या पुस्तकातील काही वाक्ये :

अ. सत्य लपवण्याच्या कृतीला ‘आवरण’ म्हणतात आणि असत्य प्रक्षेपित करण्याला ‘विक्षेप’ म्हणतात. जेव्हा हे एखाद्या व्यक्तीच्या स्तरावर घडते, तेव्हा त्याला ‘अविद्या’ म्हणतात आणि जेव्हा ते एखाद्या समूह किंवा जगाच्या स्तरावर घडते, तेव्हा त्याला ‘माया’ म्हणतात.

आ. इतिहास वाचण्याचा उद्देश कुणालाही तुच्छ लेखणे किंवा कलंकित करणे, हा नाही आणि तसा तो नसावा. फार फार तर इतिहासाच्या अभ्यासाने आपल्याला आपल्या पूर्वजांच्या योग्य आणि अयोग्य गोष्टी प्रामाणिकपणे, निष्पक्षपणे समजून घेण्यास साहाय्य करावे अन् त्या धड्यांचा उपयोग आपले वर्तमान आणि भविष्य घडवण्यासाठी करावा.

इ. इतिहासाचे ध्येय, म्हणजे मानवतेला प्रगतीकडे नेणार्‍या वाटचालीस सक्षम करणे होय.

७. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय इतर उपक्रमांमध्ये सहभाग

अ. आंतरराष्ट्रीय परिषद, उदाइन विद्यापीठ, इटली (वर्ष २००७)

आ. अध्यक्ष, असोसिएशन ऑफ कन्नडगास मिटींग, दुबई (वर्ष २००७)

इ. असोसिएशन ऑफ कन्नड कूटा अमेरिका, वॉशिंग्टन डी. सी., अमेरिका (वर्ष २००६)

ई. उद्घाटनपर भाषण, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, गोवा. (वर्ष १९९४)

उ. पूर्व-पश्चिम लेखकांची बैठक, ब्लेड, स्लोव्हेनिया (वर्ष १९९१)

. भारताचे प्रतिनिधी, ‘युनेस्को’चे नैतिक शिक्षणावरील चर्चासत्र, टोकियो, जपान (वर्ष १९७५)

ए. भारतात झालेल्या २५ हून अधिक साहित्य परिषदांचे अध्यक्ष आणि अध्यक्षीय पुरस्कार.