
मुंबई – पूर्व अनुमतीविना कार्यालय सोडल्यास कर्मचार्यांचे थेट निलंबन करण्यात येईल, असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. ‘जनसेवेत कसूर करणार्या अधिकार्यांची गय करणार नाही. त्यांच्यावर निलंबनासह अन्य शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात येईल’, असेही ते म्हणाले.
महसूल विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांतील तहसीलदार ते निवडश्रेणीतील अप्पर जिल्हाधिकारी, नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक, तसेच जमाबंदी आयुक्त आणि संचालक (भूमी अभिलेख) यांच्या अधिनस्थ काही अधिकारी वारंवार विनाअनुमती मुख्यालयात गैरहजर रहात असल्याचे आढळून आले. यासंदर्भात मंत्री बावनकुळे यांच्याकडे आलेल्या तक्रारींची पडताळणी केल्यावर त्यात तथ्य आढळल्याने तातडीने हे कारवाईचे आदेश दिले आहेत.