संपादकीय : आतंकवाद ते धर्मविजय !

पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणात २८ निष्पाप हिंदूंची निर्घृण हत्या करण्यात आली. अर्थात् ‘निष्पाप हिंदू आणि त्यांची हत्या’ हे समीकरण भारतासाठी नवीन नाही. अशा हत्या प्रतिदिन होतच असतात; पण धर्म विचारून हत्या केली, ही घटना ‘निधर्मी’ म्हणवल्या जाणार्‍या भारतासाठी क्लेशदायक आहे. प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिक घटनेने हळहळला आहे आणि अमेरिका, रशिया यांसारख्या देशांनीही या आक्रमणाविषयी निषेध व्यक्त केला आहे. या मानवताविरोधी पाकला इतकी वर्षे संधी दिली, संवाद साधला, शांततेचा हात पुढे केला; पण प्रत्येक वेळी समोरून आला तो केवळ वारच ! आणखी किती काळ संयम दाखवायचा ? त्या दुबळ्या संयमाचा अपलाभ शत्रू घेत असेल, तर संयम आणि शांती यांच्या पलीकडे युद्ध असते, हे शत्रूने लक्षात ठेवावे. अशांची यंत्रणा कायमस्वरूपी उखडून टाकायला हवी, म्हणजे थोडक्यात काय, तर ते सर्वस्वी उद्ध्वस्त व्हायला हवेत. ‘कुणी आपल्या एका गालावर मारले की, आपण दुसरा गाल पुढे करायचा’, ही मानसिकता केव्हाच काळाच्या ओघात नष्ट झाली आहे. त्यामुळे ‘भारतातून शांतीची कबुतरे येतील’, या भ्रमात पाकने राहू नये. प्रत्येक वेळी हिंदूंना लक्ष्य करणार्‍यांना असा दणका द्यायला हवा की, त्यांना लपायलाही कुठे जागा उरणार नाही. एकूणच या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा मंत्रीमंडळ समितीने धाडसी आणि पाकिस्तानला वठणीवर आणणारे ५ निर्णय घेतले आहेत. यातून पाकला त्याचा विनाश जवळ आल्याचे दिसेल. पहिला आणि सर्वांत मोठा निर्णय घेतला आहे, तो म्हणजे सिंधु पाणी करार स्थगित करणे. सहिष्णु भारत गेल्या ६० वर्षांपासून पाकिस्तानला स्वतःच्या वाटणीचे पाणी देत होता; पण आता हे पाणी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने पाकमधील ८० टक्के शेतीची हानी होण्याची शक्यता आहे. भारताच्या पाण्यावर अवलंबून असणारी तेथील धरणे आणि वीजप्रकल्प तर कोलमडतीलच ! अटारी सीमा बंद करण्याचा दुसरा निर्णय घेतला आहे. यामुळे भारत-पाक यांच्यातील व्यापार ठप्प होईल आणि यामुळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकची आर्थिक गणिते बिघडतील. तिसरा निर्णय म्हणजे पाक नागरिकांसाठी असणारी ‘सार्क व्हिसा’ योजना रहित करणे. कौटुंबिक कारणांसाठी भारतात येणार्‍या पाकड्यांना अनुमती मिळणार नाही. जे पाकिस्तानी नागरिक भारतात रहात आहेत, त्यांना ४८ घंट्यांच्या आत भारत सोडण्याची चेतावणी देण्यात आली आहे. देहली येथील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील संरक्षण, लष्कर, हवाईदल आणि नौदल सल्लागारांना ७ दिवसांच्या आत भारत सोडण्याचा आदेश हा चौथा निर्णय आहे. पाचवा निर्णय, म्हणजे भारताने इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातील सर्व सल्लागारांना परत बोलावले आहे.

थोडक्यात काय, तर आता सैन्य किंवा राजकीय पार्श्वभूमीवर दोन्ही देशांत संवाद किंवा चर्चा कदापि होणार नाही. (अर्थात् यापूर्वी ती बंद होतीच.) हे ५ निर्णय सरकारने तितक्याच कठोरतेने कार्यान्वित करावेत आणि या निर्णयांची कार्यवाही करणे काही कालावधीनंतर थांबवू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आतंकवाद्यांना त्यांच्या कल्पनेपलीकडील शिक्षा मिळेल’, असे विधान केले आहे. त्यामुळे लवकरच या आतंकवाद्यांना पकडले जाईल आणि त्यांच्यावर कारवाई होईल, असा विश्वास वाटतो. पहलगामची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेणेही सध्या अत्यावश्यक आहे.

पाकिस्तानातील हिंदु क्रिकेटपटू दानिश कानेरियाने म्हटले, ‘‘जर पाकिस्तान आतंकवाद्यांना शरण येत आहे, आतंकवादाला प्रोत्साहन देत आहे, तर त्याला असे करतांना लाज वाटायला हवी. जर खरेच यात पाकचा सहभाग नसेल, तर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या आक्रमणाचा निषेध का केला नाही ?’’ पाकिस्तानमधील हिंदु क्रिकेटपटूने अतिशय निर्भयतेने मत मांडले, हे स्तुत्य आहे.

आतंकवाद

भारतीय सैन्याच्या गणवेशाचा असाही वापर !

ज्या आतंकवाद्यांनी आक्रमण केले, ते भारतीय सैन्याचा गणवेश घालून आले होते. त्यामुळे कुणाला पुसटशीही शंका आली नाही. आतंकवादी गेल्यावर नागरिकांच्या सुरक्षेसाठी भारतीय सैन्य आले, तर त्यांचा वेश पाहून नागरिकांना पुन्हा आतंकवादी आल्याचे वाटले. त्यांनी भयभीत होऊन ‘आम्हाला सोडून द्या’, अशी विनवणी केली. प्रत्यक्षात ते भारतीय सैनिक होते. हा प्रसंग भारतियांसाठी क्लेशदायी आहे. भारतीय सैन्य हे भारतियांची अस्मिता आहे. प्रत्येक भारतीय सैनिकावर, त्यांच्या पराक्रमावर भारतियांना गर्व आहे. भारतीय सैन्याचा गणवेश घालून भारतियांना मारणे, ही आतंकवाद्यांनी भारतीय सैन्याची प्रतिमा मलीन आणि अपकीर्त करण्यासाठी रचलेले षड्यंत्र होते. ‘वास्तविक आतंकवाद्यांपर्यंत भारतीय सैन्याचा वेश पोचतोच कसा ? आणि तो त्यांच्यापर्यंत कुणी पोचवला ? यामध्ये स्थानिक धर्मांध नागरिकांचा सहभाग किती आहे ? अन् त्यांच्या मागे कुठली राजकीय शक्ती आहे का ?’, याचाही शोध मुळापर्यंत जाऊन घेणे क्रमप्राप्त आहे, अन्यथा सैन्याच्या वेशात आणखी किती आतंकवादी भारतात शिरून हैदोस घालतील, हे कळणारच नाही. त्यामुळे पाकपुरस्कृत आतंकवाद्यांनी दिलेल्या या शहाला काटशह दिलाच पाहिजे. त्यासाठी सरकारने भारतीय सैनिकांचे हात मोकळे सोडावेत. त्यानंतर काही दिवसांत पाकिस्तान इतिहासजमा होईल !

धर्माचाच विजय होणार !

धर्म आणि अधर्म यांच्यात येणारी एक संकल्पना, म्हणजे निधर्मी होय ! भारत जरी निधर्मी असला, तरी या निधर्मीपणाचे दुष्परिणाम तो प्रतिदिन भोगत आहे. धर्माला न मानणारे; पण निधर्मीवादाचा पुरस्कार करणारे लोक भारतात आहेत. भारताचा शत्रू नागरिकांना धर्माच्या आधारावर मृत्यूच्या दारात ढकलत असतांना आणखी किती काळ तुम्ही धर्माला नाकारणार आहात ? आतातरी धार्मिक व्हायचे कि निधर्मी रहायचे ?, हे ठरवायला हवे. पहलगाम आक्रमणाचा मुख्य सूत्रधार सैफुल्लाह खालिद याने २ फेब्रुवारी २०२५ या दिवशी भारताविरुद्ध दिलेल्या प्रक्षोभक भाषणात म्हटले, ‘२ फेब्रुवारी २०२६ पर्यंत आम्ही काश्मीर कह्यात घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू. येत्या काळात आम्ही तीव्रतेने आक्रमणे करू.’ अशी धमकी देऊनही पहलगामच्या आक्रमणात नागरिकांचा मृत्यू झाला, हे खेदजनक आहे. हिंदूंनी आता निर्णायक लढा जिंकण्यासाठी सिद्ध रहाणे आवश्यक आहे. आतंकवाद्यांच्या हातून मरण पत्करण्यापेक्षा धर्मासाठी एक व्हा. धर्म-अधर्माच्या अनेक युद्धांमध्ये विजय नेहमी धर्माचाच होतो. त्यामुळे राजकीय हेवेदावे, राजकारण, सत्ता, पैसा, पद, प्रतिष्ठा बाजूला ठेवून धर्मविजय संपादन करण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे. परिणामकारक हिंदूसंघटनामुळेच जिहाद्यांवर वचक बसेल, हे निश्चित !

भारतियांच्या मनातील भारतीय सैन्याची प्रतिमा मलीन करण्याचा आतंकवाद्यांचा प्रयत्न सरकारने हाणून पाडणे आवश्यक !