‘शासकीय व्यवस्था’ म्हटली की, सर्वसामान्य नागरिक तिच्याकडे नकारात्मकतेने पहातात; कारण सध्याची परिस्थिती तशीच आहे. मूलभूत सुविधा देण्यासाठीही अनेक प्रशासकीय व्यवस्था अयशस्वी ठरत आहेत. कित्येक ठिकाणी पिण्याचे पाणी दूषित येते; इतके की पाण्याचा रंग कधी हिरवा, पिवळा, तपकिरी असा असतो. पावसाळ्यामध्ये रस्ते तुडुंब पाण्याने भरल्याने खड्डे ओळखू येत नाहीत. खड्ड्यांमुळे अनेकांचे अपघात होतात. याची मुख्य कारणे म्हणजे नियोजनाचा अभाव, इच्छाशक्तीचा अभाव आणि भ्रष्टाचार ही असतात. अशातच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे एक आशावादी महापालिका म्हणून पहाता येईल. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या नेतृत्वाखाली पालिका तिचा चेहरा मोहरा पालटण्यासाठी प्रयत्न करतांना दिसत आहे. शेखर सिंह हे ‘संरचनात्मक अभियांत्रिकी’ क्षेत्रातील पदवीधर आहेत. त्यांच्या शिक्षणाचा वापर ते त्यांच्या प्रशासकीय सेवेत करतांना दिसून येत आहेत.
पादचार्यांसाठी स्वतंत्र ‘पेव्हिंग ब्लॉक’चा रस्ता, रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावणे, त्याला आकर्षक असे कुंपण करणे, दुतर्फा आकर्षक अशी विद्युत् रोषणाई, चौकांचे सुशोभीकरण करणे, भारतातील सर्वांत मोठी अतिक्रमणविरोधी कारवाई म्हणजे ‘कुदळवाडी’ येथील अतिक्रमणे हटवणे, तसेच स्वच्छता अभियानाचे सूक्ष्म नियोजन करणे, कचर्यापासून विद्युत्निर्मितीचा प्रकल्प अशा प्रकारच्या विविध योजना एकाच वेळी राबवणारी ही महानगरपालिका आहे. ‘सकाळी फिरायला येणार्या सर्व नागरिकांना काय काय सुविधा देता येतील ?’ यासाठी स्वतः २ घंटे ‘दुर्गा टेकडी’ येथे लोकांची विचारपूस करणे, त्यांच्यासमवेत समन्वय करणे इतके आदर्श काम पालिका आयुक्त करत आहेत. सर्वत्रच्या महानगरपालिकांनी यातून आदर्श घ्यावा.
आज महापालिका म्हटले की, ‘भ्रष्टाचाराचे आगर’ असेच काहीसे चित्र झाले आहे. कुठलीही महापालिका त्याला अपवाद असेल, असे वाटत नाही. कुठे अल्प किंवा कुठे अधिक; परंतु भ्रष्टाचार कुठे चुकलेला नाही. एवढे करूनही चांगली कामे करणार्या महापालिकांची संख्याही अल्प आहे. त्यातही कुणी अशा प्रकारे चांगली कामे करतांना आढळले, तर नागरिकांनाही उत्साह येतो.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील वाहतूक, पाणी, रस्ते, अवैध बांधकामे, घुसखोर यांचे प्रश्नही अशाच प्रकारे तत्परतेने हाताळून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा आहे. नागरिकांनीही सकारात्मक कामे करत असलेल्या महापालिकेला त्यांच्या सूचना कळवून सहभाग नोंदवला, तर शहराच्या प्रगतीत त्यांचा हातभार लागेल.
– श्री. जयेश बोरसे, पुणे