रत्नदुर्गावर पुन्हा भगवा फडकणार !

रत्नागिरी गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानचा पुढाकार

गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानकडून निवेदन

रत्नागिरी – शहराजवळील रत्नदुर्गावरील भगवा ध्वज आणि माहिती फलकाची काही महिन्यांपूर्वी अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, रत्नागिरी जिल्हा यांच्या वतीने त्याच ठिकाणी भगवा ध्वज आणि माहिती फलक पुन्हा स्थापन करण्यात येणार आहे.

गेल्या वर्षभरापूर्वी रत्नदुर्गावर असणार्‍या टेहळण्या बुरुजावर गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने ग्रामस्थांच्या साहाय्याने ४० फूट उंच भगवा ध्वज फडकवण्यात आला होता. ही गोष्ट गडकिल्लेप्रेमींना अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी वाटली होती; परंतु काही अज्ञात समाजकंटकांकडून हा ध्वज वारंवार काढण्यात येत आहे. त्याचसमवेत जानेवारी २०२५ मध्ये रत्नदुर्गावर प्रतिष्ठानकडून माहिती आणि सूचना फलक बसवले होते. त्यापैकी महादरवाजा परिसरातील एका फलकाची तोडफोडही अज्ञातांकडून करण्यात अली. या घटनेची तक्रार रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली असून ‘सीसीटीव्ही फुटेज’मध्ये संबंधित व्यक्ती स्पष्टपणे दिसत असून, अद्याप पोलीस प्रशासनाकडून योग्यती कोणतीही कारवाई झालेली नाही.


या पार्श्वभूमीवर गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने पुन्हा एकदा टेहळण्या बुरुजावर भगवा ध्वज फडकवण्यात येणार असून, महादरवाजाजवळ फलकही लावण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे येत्या काही दिवसांतच नियोजन केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे उपस्थित रहाण्याची शक्यता आहे. या संदर्भातील निवेदन गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानकडून भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्याकडे देण्यात आले.

या वेळी गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानचे रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष दीपेश विठ्ठल वारंग, महिला अध्यक्ष मानसी चव्हाण, संपर्कप्रमुख पालवी रसाळ, खुशी गोताड, सलोनी सर्वे, सूरज खोचाडे, सचिन कळंबटे, प्रितम मांडवकर, प्रितम सुर्वे हे दुर्गरक्षक आणि सेवक अन् सेविका उपस्थित होत्या.