काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करून आतंकवाद्यांविरोधात कठोर कारवाई करा !

राजापूर येथील हिंदु संघटनांची निवेदनाद्वारे मागणी

निवासी नायब तहसीलदार सौ. दीपाली पंडित यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

राजापूर, २४ एप्रिल (वार्ता.) – २२ एप्रिलला जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे आतंकवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर त्यांचा धर्म विचारून त्यांची वेचून निर्दयपणे हत्या केली. या आक्रमणात २८ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण घायाळ झाले आहेत. याला उत्तर म्हणून काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करून आतंकवाद्यांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी येथील हिंदु संघटनांनी केली आहे. पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री यांच्यासाठीचे हे निवेदन येथील निवासी नायब तहसीलदार सौ. दीपाली पंडित यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.

या वेळी हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, सनातन संस्था, शिवस्मृती मंडळ, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, व्यापारी आणि अन्य संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये डॉ. शेखर पाध्ये, सौ. शिल्पा मराठे, सौ. श्रुती ताम्हणकर, शीतल पटेल, माधवी हर्डिकर, सर्वश्री मोहन घुमे, एकनाथ मोंडे, महेश मयेकर, विनोद गादीकर, सुभाष पवार, विवेक गुरव, रवींद्र नागरेकर, नागेश शेट्ये, किरण तुळसावडेकर, संदेश टिळेकर आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

काश्मीरमधील घटना केवळ हिंसाचाराची नसून ती हिंदुविरोधी आणि भारताच्या  विरोधात कटाचा एक भाग आहे, या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि कठोर कारवाई करून आतंकवाद्यांचा बीमोड करावा. त्याचप्रमाणे पाकिस्तानचे या आक्रमणाला साहाय्य मिळत असल्याचे पुरावे सापडल्यास पाकिस्तानमधील आतंकवादी आणि अन्य तळांवर इस्रायलप्रमाणे थेट सैनिकी कारवाई करावी. राष्ट्राच्या सुरक्षेसाठी देशाची अखंडता आणि हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्न आता केंद्रस्थानी ठेवून शासनाने निर्णायक भूमिका घ्यावी.

बंगालमध्येही राष्ट्रपती राजवट लागू करा !

या वेळी बंगालमध्ये आणि वक्फ कायद्याच्या आडून हिंदूंचा झालेला नरसंहार लक्षात घेऊन तेथेही राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.