युवा साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचा लाभलेला अनमोल सत्संग आणि या सत्संगात प.पू. गुरुदेवांनी केलेले मार्गदर्शन !

मध्यंतरी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात प्रसारातील युवा साधकांचे शिबिर झाले. त्या वेळी युवा साधकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. या सत्संगात सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) हेही उपस्थित होते. सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा काही भाग आपण २४ एप्रिल २०२५ या दिवशी पाहिला. आज पुढील भाग येथे दिला आहे. 

या लेखातील मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/906305.html

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

२. साधनेसाठी आवश्यक गुण

२ आ. साधकांनी मनात निर्माण होणारे प्रश्न त्या त्या वेळीच विचारून घेतल्यास त्यांचे मन रिकामे राहून त्यांना शिकता येईल ! 

कु. गिरीजा शेंडे (कोल्हापूर, महाराष्ट्र) : गुरुदेव, मी आश्रमात येणार होते. तेव्हा माझ्या मनात पुष्कळ प्रश्न होते. आश्रमात हा सत्संग झाला, तर माझ्या सर्व शंकांचे निरसन झाले. आता माझ्या मनात कोणतेच प्रश्न राहिले नाहीत.

परात्पर गुरु डॉ. आठवले : मनात प्रश्न येतो, तेव्हाच तेथील साधकांना विचारत नाहीस का ?

कु. गिरीजा शेंडे : मला आता सत्संगातच त्यांची उत्तरे मिळाली. अन्यथा मी श्रीकृष्णाच्या अनुसंधानात रहाते.

श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था.

परात्पर गुरु डॉ. आठवले : मनातील प्रश्न त्या त्या वेळी विचारून घ्यायचे. मनात काही ठेवायचे नाही. मनात काही ठेवले, तर मनाचा १ टक्का, २ टक्के आणि ५ टक्के भाग प्रश्नांनीच भरून जातो. मन रिकामे असेल, तरच उत्तर मनात जाणार ना ! मन नेहमी रिकामे असले पाहिजे, तरच शिकता येते.

२ इ. मनमोकळेपणाने बोलणे आणि सेवेतील चुका तत्परतेने सांगितल्यामुळे साधनेत लाभ होणे 

२ ई. प्रत्येक प्रसंगातून शिकण्याचा प्रयत्न करणे आणि स्वतःची प्रशंसा ऐकतांना कर्तेपणा गुरुदेवांच्या चरणी अर्पण करणे 

श्री. चेतन राजहंस : कु. सिद्धी जाधव ही सोलापूरहून आली आहे. ती पाककलेत निपुण आहे आणि रांगोळ्या चांगल्या काढते. 

कु. सिद्धी जाधव (सोलापूर, महाराष्ट्र) : गुरुदेव, मी जी काही आहे, ती आपल्या कृपेनेच आहे. पू. जाधवकाकू (सनातन संस्थेच्या ७४ व्या संत पू. (सौ.) संगीता जाधव), या मला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. त्या मला ‘मी कुठे कुठे चुकते ?’, हे सांगतात आणि मी जे चांगले करते, तो गुण वाढवण्यासाठी प्रयत्न करायला सांगतात. श्री. विष्णु जाधवकाका (सनातन संस्थेचे साधक श्री. विष्णुपंत जाधव) हे माझे काका आहेत. ते आमच्या घरी येतात. तेव्हा प्रत्येक वेळी मी त्यांना एखादा पदार्थ बनवून देते. त्यांच्या ठिकाणी दुसरा एखादा साधक असता, तर त्याने ‘पदार्थ चांगला झाला आहे’, असे मला सांगितले असते; परंतु काका मला ‘तो पदार्थ आणखी चांगला होण्यासाठी मी काय करायला पाहिजे ? त्यात काय न्यून आहे’, हे सांगून सुधारणा करण्यास शिकवतात. त्यामुळे मला चांगले वाटते. पुढच्या वेळी ‘मी आणखी कसे करायला पाहिजे ?’ याची मला योग्य दिशा मिळते.

परात्पर गुरु डॉ. आठवले : ‘मी आणखी काय शिकू ?’, असे तुला वाटते, हे महत्त्वाचे आहे. त्यांनी काैतुकाने म्हटले, ‘चांगले आहे’, तर ते तुला आवडत नाही, तर ‘मी आणखी यातून काय शिकू ?’, असा तुझा विचार असतो. हे फारच छान आहे.

कु. सिद्धी जाधव : मला कुणी चांगले म्हटले, कुणी माझी प्रशंसा केली, तर मला वाटते की, माझा अहं वाढेल. त्यामुळे कुणी माझी प्रशंसा केली, तर ती मला आवडत नाही. साधक म्हणतात, ‘तू कर्तेपणा स्वतःकडे का घेतेस ? गुरुदेवांवर सोडून द्यायचे.’ तेव्हा मी कालपासून तसे प्रयत्न केले. कोणत्याही साधकाने माझी प्रशंसा केली, तर मी ते सगळे गुरुदेवांना अर्पण करते.

२ उ. शिबिरातील महत्त्वाची सूत्रे लिहून ती कृतीत आणण्याचा प्रयत्न करायला हवा !

श्री. चेतन राजहंस : हे श्री. साहिल बोबडे. हे वर्धा येथून आले आहेत. जिल्ह्यात संगणकीय सेवा करतात.

श्री. साहिल बोबडे (वर्धा, महाराष्ट्र) : गुरुदेव, येथे आल्यानंतर मला शिबिरात आलेल्या युवा साधकांचे अनुभव ऐकतांना आतून पुष्कळ आनंद होत आहे. सूत्रे ऐकतांना मला एवढा आनंद होत आहे, तर त्यांना किती आनंद होत असेल ! असा आनंद अन्य कुणालाच मिळत नाही. मला या सर्वांकडून पुष्कळ शिकायला मिळाले. शिबिरात पुष्कळ महत्त्वाची सूत्रे झाली. ती कृतीत आणण्यासाठी मला काही अवधी लागेल. मी ती सूत्रे माझ्या वहीत लिहून ठेवली आहेत. मला ‘ती सूत्रे सतत वाचत रहावीत’, असे वाटते.

२ ऊ. ईश्वराला सर्वच येत असल्याने त्याच्याशी एकरूप होण्यासाठी साधकांनी अधिकाधिक गोष्टी शिकून घ्याव्यात !  

कु. गिरिजा शेंडे : मी आश्रमात आल्यानंतर मला सर्वांकडून पुष्कळ शिकायला मिळाले. आता मी प्रथमोपचार सेवेचे वर्ग घेत आहे. मी प्रामुख्याने ही एकच सेवा शिकण्याकडे लक्ष देत होते. मला प्रथमोपचार वर्ग घेण्याची आवड असल्याने ‘तेवढीच सेवा करावी’, असे मला वाटते. त्यामुळे मी इतर सेवांना विशेष महत्त्व देत नव्हते; परंतु आता ‘अन्य सेवाही तितक्याच महत्त्वाच्या असल्याने त्यासुद्धा शिकायच्या आहेत’, याची मला जाणीव झाली आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : सर्व सेवा शिकणे का महत्त्वाचे आहे ? कारण ईश्वराला सर्वच येते ! ईश्वराशी एकरूप व्हायचे असेल, तर आपल्यालासुद्धा सर्व यायला पाहिजे. आता जी प्रथमोपचार सेवा करता येत आहे, ती आपत्काळात कुणाला किती उपयुक्त ठरेल ? ‘आपत्काळात कशाची आवश्यकता आहे ? कोणत्या प्रसंगी काय करावे लागेल ?’ हे कुणालाच ठाऊक नाही. त्यामुळे आपण अधिकाधिक गोष्टी जेवढ्या शिकून घेऊ, तेवढे अधिक चांगले आहे.

३. प्रत्यक्ष साधना

३ अ. नामजप झाला नाही, तर मनाला खंत वाटली पाहिजे, तरच आपली साधना होईल ! 

श्री. चेतन राजहंस : श्री. सिद्धेश बराले हे कोल्हापूरहून आले आहेत. ते वर्ष २०२१ मध्ये हरिद्वार कुंभमेळ्याच्या सेवेसाठी आले होते.

श्री. सिद्धेश बराले (कोल्हापूर, महाराष्ट्र) : मला दोन घंटे नामजप करायला सांगितला आहे; पण हा नामजप माझ्याकडून केला जात नाही आणि त्यामुळे माझी चिडचिड होते. आज माझा नामजप झाला नाही, तसेच माझ्याकडून स्वयंसूचनांची सत्रेही झाली नाहीत.

परात्पर गुरु डॉ. आठवले : जेव्हा आठवण येईल, तेव्हा नामजप करायचा. नामजप केला नाही, तर आनंद कसा मिळणार ? आणि साधना तरी होईल का ?

श्री. सिद्धेश बराले : आता मी ‘नामजप कसा होईल ?’ यासाठी प्रयत्न करीन.

३ आ. ‘अभ्यास करावा कि सेवेला जावे’, असा मनाचा संघर्ष होत असतांना नामजप करावा ! 

श्री. चेतन राजहंस : ही पुण्याची कु. विदिशा जोशी आहे. ही ‘भरतनाट्यम्’ ही नृत्यकला शिकली आहे. तिला चित्रकलेचीही आवड आहे.

कु. विदिशा जोशी (पुणे, महाराष्ट्र) : माझ्या मनाची पुष्कळ वेळा द्विधा अवस्था असते. आमच्या घरात केवळ माझी आईच साधना करते.

परात्पर गुरु डॉ. आठवले : कलियुगात घरोघरी आईच साधना करते.

कु. विदिशा जोशी : माझ्या वडिलांना वाटते की, मी अधिकाधिक शिकावे; परंतु मला साधनाही करायची आहे. जेव्हा एखादी सेवा येते, त्याच वेळी शिकवणी वर्ग असतो. त्या वेळी माझ्या मनाची द्विधा अवस्था होते. त्या वेळी शिकवणी वर्गात (क्लासमध्ये) माझे मन लागत नाही आणि मनात साधनेचेच विचार येत रहातात.

परात्पर गुरु डॉ. आठवले : अशा वेळी आपण नामजप करायचा.                       (क्रमश:)