|

कानपूर (उत्तरप्रदेश) – आतंकवाद्यांनी माझ्या पतीला माझ्यासमोर गोळ्या घातल्या. योगीजी, आम्हाला कठोर सूड हवा आहे. तुम्ही याचा सूड उगवा, अशी मागणी पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणात मृत झालेले येथील शुभम द्विवेदी यांच्या पत्नी इशान्या यांनी उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुढे अंत्यसंस्काराच्या वेळी केली. यावर मुख्यमंत्री योगी म्हणाले की, ‘हे आक्रमण शवपेटीवरील शेवटचा खिळा असेल.’

शुभम यांचे वडील संजय द्विवेदी म्हणाले की, नालायक आतंकवाद्यांनी भारत सरकारला आव्हान दिले आणि ते निघून गेले. सरकारने आता कठोर कारवाई करावी.
कलमा म्हणण्यास सांगून माझ्या पतीला ठार मारले ! – ईशान्या
ईशान्या यांनी या वेळी साश्रू नयनांनी प्रत्यक्ष घटना सांगितली. त्या म्हणाल्या की, शुभम आणि मी मॅगी खाणार होतो. इतक्यात मागून एक माणूस आला. त्याने बंदूक बाजूला ठेवली आणि शुभमला विचारले, ‘तू हिंदु आहेस कि मुसलमान ? जर तुम्ही मुसलमान असाल, तर प्रथम कलमाचे पठण करा.’ मी त्याला हसून विचारले ‘काय झाले भाऊ ?’ मग त्याने मलाही विचारले, ‘तू हिंदु आहेस कि मुसलमान ?’ मी म्हणाले, ‘मी हिंदु आहे.’ यानंतर त्याने माझ्या पतीवर गोळी झाडली. प्रथम शुभमला मारले, नंतर इतर लोकांनाही गोळ्या घातल्या.