पाककडून भारतासमवेतच्या व्यापारावर बंदी

  • भारतासाठी पाकचे हवाई क्षेत्रही केले बंद

  • भारतियांना पाकिस्तान सोडण्याचा आदेश

  • शिमला करार रहित होणार

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारताने पाकच्या विरोधात ५ महत्त्वाचे निर्णय घेतल्यानंतर पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखाली २४ एप्रिलला झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या बैठकीमध्ये भारताच्या विरोधात काही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये भारतासमवेतच्या व्यापारावर बंदी, वाघा सीमा बंद करणे, भारतीय विमानांसाठी पाकिस्तानी हवाई क्षेत्राचा वापर करण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतियांना पाक सोडण्याचा आदेश, तसेच ‘पाकिस्तान भारतासमवेतचे सर्व द्विपक्षीय करार स्थगित करण्याचा अधिकार वापरेल, ज्यामध्ये शिमला कराराचा समावेश आहे’, असेही पाकने म्हटले आहे.

पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने प्रसारित केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

सिंधु जल करार रहित करणे, हा युद्धाचा प्रकार !

सिंधु जल करार रहित करण्याच्या भारताचे पाऊल पाकिस्तानला पूर्णपणे अमान्य आहे. हा करार एक बंधनकारक आंतरराष्ट्रीय करार आहे, ज्यामध्ये एकतर्फी निलंबनाची कोणतीही तरतूद नाही. पाणी हे पाकिस्तानचे एक महत्त्वाचे राष्ट्रीय हित आहे, ते त्यांच्या २४ कोटी लोकांची जीवनरेखा असून त्याची उपलब्धता कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित ठेवली जाईल. सिंधु जल करारानुसार पाकिस्तानच्या पाण्याचा प्रवाह अडथळा आणण्याचा किंवा वळवण्याचा आणि खालच्या काठावरील क्षेत्रातील त्याच्या अधिकारांचे उल्लंघन करण्याचा कोणताही प्रयत्न, हा युद्धाचा प्रकार मानला जाईल आणि राष्ट्रीय शक्तीच्या संपूर्ण व्याप्तीमध्ये त्याला पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर दिले जाईल.

शीख वगळता इतर भारतीय नागरिकांचे व्हिसा रहित

पाकिस्तानने सार्क व्हिसा सूट योजनेअंतर्गत भारतीय नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा निलंबित केले आहेत आणि शीख धार्मिक यात्रेकरू वगळता ते तात्काळ प्रभावाने रहित केले आहेत. सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांना ४८ घंट्यांच्या आत तेथून निघून जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सल्लागारांच्या साहाय्यक कर्मचार्‍यांनाही भारतात परतण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भारतीय उच्चायुक्तालयातील कर्मचार्‍यांची संख्या अल्प करण्यात आली आहे.