Pakistan Reaction On Pahalgam : (म्हणे) ‘पाकिस्तान भारताला सडतोड प्रत्युत्तर देईल !’ – पाकचे उपपंतप्रधान इशाक डार

पाकचे उपपंतप्रधान इशाक डार यांची पोकळ चेतावणी

पाकचे उपपंतप्रधान इशाक डार

इस्लामाबाद (पाकिस्तान) – अशा प्रकारच्या आतंकवादी घटनांवर संताप व्यक्त करणे योग्य नाही. भारताने आतंकवादी आक्रमणाचा कोणताही पुरावा दिलेला नाही. भारत त्याच्या समस्यांसाठी नेहमी पाकिस्तानला उत्तरदायी धरतो. भारताची ही राजकीय चाल आहे, त्यापेक्षा काही नाही. त्यास पाकिस्तानही सडतोड प्रत्युत्तर देईल, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणानंतर भारताकडून पाकवर आक्रमण होण्याच्या शक्यतेवरून व्यक्त केली.

पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित म्हणाले की, काही दिवसांनी बालाकोटमध्ये मोठा ‘एअर स्ट्राइक’ होईल. ही गोष्ट येथेच थांबणार नाही. भारत पाकिस्तानविरुद्ध काही ना काही कारवाई करेलच.

नवाज शरीफ आपात्कालीन बैठकीसाठी पाकिस्तानात येणार

सत्ताधारी ‘पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज’चे (पीएम्एल्-एन्’चे) अध्यक्ष नवाज शरीफ यांनी लंडनहून पाकिस्तानात परतण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी नवाज शरीफ यांना २५ एप्रिलच्या आपात्कालीन बैठकीसाठी बोलावले आहे.

संपादकीय भूमिका

पाकने कितीही उसने अवसान आणून अशा प्रकारची विधाने केली, तरी भारताकडून आता त्याला धडा शिकवला जाणार आहे, हे ठरले आहे !