न्याय्य जीवनाचे सार जगासमोर प्रदर्शित करणारा ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ यशस्वी होईल ! – हिंदुत्वनिष्ठ नेते के. अन्नमलाई, तमिळनाडू

तमिळनाडूतील हिंदुत्वनिष्ठ नेते के. अन्नमलाई यांचे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना पत्र !

डावीकडून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि के. अन्नमलाई

चेन्नई – २५ वर्षांहून अधिक काळ अध्यात्मप्रसारासाठी स्वतःला समर्पित करून  देश-विदेशातील सहस्रो साधकांसाठी आध्यात्मिक मार्गदर्शनाचा दीपस्तंभ ठरलेली सनातन संस्था आणि तिचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना तमिळनाडूतील हिंदुत्वनिष्ठ नेते तथा माजी पोलीस अधिकारी के. अन्नमलाई यांनी शुभेच्छा दिल्या. १७ मे ते १९ मे २०२५ या कालावधीत गोव्यात होणार्‍या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण दिल्यानंतर त्यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना पत्र लिहून त्यांच्या भावना व्यक्त केले. या महोत्सवाचे निमंत्रण दिल्याविषयी त्यांनी सनातन संस्था आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे आभार मानले. तथापि काही पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे या महोत्सवाला उपस्थित राहू शकणार नसल्याचेही त्यांनी नम्रपणे सांगितले.

के. अन्नमलाई यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना लिहिलेले पत्र

या पत्रात के. अन्नमलाई यांनी सत्य, अहिंसा, करुणा आणि अखंडता या धर्माच्या तत्त्वांना अधोरेखित करून ‘न्याय्य जीवनाचे सार जगाला दाखवणारा हा महोत्सव यशस्वी  होईल’, असा विश्वास व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, ‘‘आपल्या पवित्र सनातन धर्माने प्रदान केलेल्या आध्यात्मिक ज्ञानाचा प्रचार-प्रसार करणे, धर्माचरणाला प्रोत्साहन देणे आणि अध्यात्म सर्वांसाठी सुलभ आणि समजण्यायोग्य बनवून वैज्ञानिक दृष्टीकोनातून ईश्वरप्राप्तीसाठी साधकांना मार्गदर्शन करणे, हे सनातन संस्थेचे प्रयत्न अत्यंत प्रशंसनीय आहेत. विनामूल्य वैद्यकीय शिबिरे, आपत्कालीन साहाय्य, मंदिर स्वच्छता मोहिमा, मुलांसाठीचे शैक्षणिक उपक्रम अशा विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सहस्रो वंचित आणि गरजू लोकांना साहाय्य करण्याचे सनातन संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे.’’