छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा आबालवृद्धांपर्यंत पोचवून त्यांच्यात राष्ट्रभक्ती जागृत करण्यात यशस्वी झालेला चित्रपट : ‘छावा’ !

‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवणारा ‘छावा’ हा चित्रपट प्रसारित झाला आणि देशभर राष्ट्रभक्तीची लाट उसळली. आपल्या राष्ट्रपुरुषांच्या शौर्यगाथा आबालवृद्धांपर्यंत पोचवून त्यांच्यात राष्ट्रभक्ती जागृत करण्याचे कार्य चित्रपटाच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे होऊ शकते आणि यात ‘छावा’ हा चित्रपट यशस्वी झाला आहे. चित्रपटाच्या संबंधित सर्व व्यक्तींचे कौतुक आणि अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. 

– सौ. शुभांगी शेळके, एम्.ए. (नाट्यशास्त्र), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. 

‘छावा’ चित्रपटाचे भित्तीपत्रक

 

१. चित्रपटातील प्रसंगांची अप्रतिम निवड आणि मांडणी 

‘छत्रपती संभाजी महाराज यांनी वाघाचा जबडा फाडणे, त्यांनी आपले मोजके सरदार आणि मावळे यांना घेऊन मोगलांच्या विरोधात गनिमी काव्याने केलेल्या लढाया, औरंगजेबाने दख्खनच्या भूमीवर पाय ठेवताच चालू केलेला क्रूर नरसंहार अन् गोरगरीब रयतेवर केलेले पाशवी अत्याचार, छत्रपती संभाजी महाराज यांची हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची तीव्र तळमळ, आपला धर्म अन् मायभूमी यांवरील दृढ निष्ठा आणि प्राणांची आहुती देणे’, अशा सर्वच प्रसंगांची निवड अन् मांडणी अप्रतिमपणे केलेली आहे.

सौ. शुभांगी शेळके

२. चित्रपटातील संवाद 

या चित्रपटातील संवाद प्रेक्षकांच्या काळजाला स्पर्श केल्याविना रहात नाहीत आणि म्हणूनच ती निव्वळ डायलॉगबाजी (संवादचातुर्य) वाटत नाही.

अ. ‘आपण केवळ छत्रपती संभाजी महाराज यांची पत्नी नाही, तर मराठा साम्राज्याची राणी आहोत’, याचे भान महाराणी येसूबाईंच्या सकारात्मक संवादांतून दिसते.

आ. ‘हम उस संभा को नौ साल से ढूंढ रहे हैं, पर वह किस गली से गुजरता हैं, यह भी अब तक हम नही जान पाए ।’, अशा औरंगजेबाच्या संभाषणांमधून मराठ्यांचे बुद्धीचातुर्य आणि शिवरायांचा गनिमी कावा यांचे महत्त्व लक्षात येते.

इ. छत्रपती संभाजी महाराजांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज ‘रणधुरंधर सिंह’ होते आणि सिंहाच्या बछड्याला ‘छावा’ म्हणतात’, हे अंतिम वाक्य हृदयाला भिडते.

ई. आपल्या मृत्यूनंतरही औरंगजेबाची जीवघेणी तडफड वाढवून स्वतः जिंकणारे छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल औरंगजेबाने उद्गारलेल्या ‘मला त्या शिवाजीचा हेवा वाटतो; कारण मला संभाजीसारखा पुत्र असता, तर मी सार्‍या जगावर राज्य केले असते’, या शेवटच्या वाक्यातून त्याने नकळतपणे मान्य केलेली छत्रपती शिवाजी महाराज अन् छत्रपती संभाजी महाराज यांची थोरवी लक्षात येते.

३. चरित्रचित्रण आणि अभिनय 

अ. चरित्रचित्रणाच्या दृष्टीने कलाकारांची निवड उत्तम केलेली आहे. मुख्य भूमिकेत विकी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी केलेली सिद्धता आणि घेतलेले परिश्रम यांचे सार्थक झालेले दिसते. ते छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेशी पूर्णपणे समरस झालेले दिसतात.

आ. ‘आरंभापासून ते शेवटपर्यंत विकी कौशल यांचा जणू ‘परकायाप्रवेश’ (नाट्यशास्त्रानुसार) झालेला आहे’, असे मला वाटते. एका ठिकाणी असे सांगितले आहे की, विकी कौशल यांना शेवटच्या दृश्यात औरंगजेबाच्या तंबूसमोर दोन्ही हात आणि पाय साखळदंडांनी बांधून उभे केले होते. या चित्रीकरणाच्या वेळी दिवसभर अशा स्थितीत त्यांना बांधून उभे केल्यामुळे रात्री चित्रीकरण संपल्यावर त्यांचे दोन्ही हात पुष्कळ आखडले होते. त्यांचे हात आणि खांदा यांमध्ये एवढ्या वेदना चालू झाल्या होत्या की, डॉक्टरांनी त्यांना दीड मास संपूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली होती. त्यामुळे चित्रीकरण दीड मास बंद ठेवावे लागले होते. यातून असे लक्षात येते की, विकी कौशल त्या वेळी आपल्या भूमिकेशी इतके एकरूप झाले असावेत की, ईश्वराने त्यांना काही अंशी का होईना, ‘छत्रपती संभाजी महाराजांनी सतत ४० दिवस किती वेदना सहन केल्या ?’, याची जाणीव करून दिली असावी; कारण विकी कौशल आपल्या बर्‍याच मुलाखतीमध्ये म्हणतात, ‘‘आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचे अस्तित्व जाणवायचे.’’

इ. महाराणी येसूबाईंची भूमिका रश्मिका मंदाना यांनी चांगली केली आहे. त्या महाराणी येसूबाई म्हणून शोभतात.

ई. राजमाता सोयराबाईंची भूमिका कसलेली अभिनेत्री दिव्या दत्ता यांनी उत्तम वठवली आहे.

उ. हंबीरराव मोहिते यांची स्वराज्यनिष्ठा आषुतोश राणा यांनी अत्यंत सुरस वठवली आहे.

ऊ. प्रदीपसिंह रावत यांनी येसाजी कंक यांचा शिवरायांचा अनुभवी आणि एकनिष्ठ सरदार म्हणून दायित्वाची भूमिका वठवली आहे.

ए. ‘कवी कलश’ या पात्राला विनीतकुमार सिंग यांनी जिवंत केले आहे. त्यांचे सर्व संवाद मार्मिक आहेत. त्यांनी एकाच वेळी कवी आणि योद्धा या दोन्ही छटा कौशल्याने अन् जीव ओतून रंगवल्या आहेत.

ऐ. धराऊआईच्या भूमिकेत नीलकांती पाटेकर यांनी चोख कामगिरी बजावली आहे.

ओ. अक्षय खन्ना यांनी या चित्रपटातील खलनायक असलेल्या औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. त्यांनी औरंगजेबाची दहशत आणि क्रूरता दाखविली आहे. ‘छत्रपती संभाजी महाराजांना कसेही करून पकडायचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरचा सूड उगवायचा’, या विचाराने औरंगजेबाच्या मनाला ग्रासून टाकले आहे’, हे दाखवण्यात कुठेतरी उणीव भासली’, असे मला वाटते. अक्षय खन्ना यांच्या अभिनयातून ‘छत्रपती संभाजी महाराजांना पकडून त्यांचे हालहाल करून मारूनही औरंगजेबाच्या जिवाची तडफड शमत नाही’, हे तितक्या प्रभावीपणे जाणवले नाही.

औ. औरंगजेबाशी इमानदार रहाणारी त्याची मुलगी जिनतुन्निसाच्या भूमिकेत डायना पेन्टी या अभिनेत्रीनेही चांगले काम केले आहे. औरंगजेबाचा मुलगा अकबर याची भूमिका नेल भूपालम् यांनी केली आहे. त्यांनी औरंगजेबाच्या रक्तातील बेईमानी चांगली दाखवली आहे.

या संपूर्ण चित्रपटात सर्वच कलाकारांनी घेतलेले कष्ट दिसून येतात. त्या सर्वांचे अभिनंदन !

४. कलाकारांची वेशभूषा 

महाराणी येसूबाईंच्या नऊवारी साड्या काळाचे भान राखून निवडलेल्या आहेत. त्यांचे दागिने इत्यादींची निवडही ठीक वाटते. विशेष म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या गळ्यातील आई भवानीची कवड्यांची माळ पुष्कळ काही सांगून जाते; परंतु एके ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांनी राखाडी रंगाची वस्त्रे परिधान केली आहेत. ते थोडे इंग्रजी रंग वापरून हॉलिवूडच्या ॲक्शनपटांची नक्कल केल्यासारखे वाटते. त्यांच्या जिरेटोपाची नक्षीही वेगळी वाटली. काही ठिकाणी ‘ते शिरस्त्राण न घालताच लढाई करत आहेत’, असेही दिसते. त्यांच्या घोड्याच्या पायातले चांदीचे कडे विशेष वाटले.

५. चित्रपटातील देखावे (सेट्स) 

या शौर्यगाथेची मूळ ठिकाणे गडकिल्ले आहेत. त्यामुळे अधिकचा दिखाऊपणा न करता; पण आवश्यकतेनुसार मराठ्यांच्या राज्याचे वैभव दाखवणारा छत्रपती संभाजी महाराजांचा दरबार किंवा किल्ल्यातील कक्ष सिद्ध केले आहेत. औरंगजेबाचा शामियाना आणि मोगली तंबूही स्थळ-काळाचे भान राखून सिद्ध केलेले दिसतात. त्यामुळे देखाव्यांच्या संदर्भात चित्रपट कुठेही अवास्तव वाटत नाही.

६. संगीत-संयोजन 

‘या चित्रपटाचे संगीत-संयोजन फसले आहे’, असे म्हटले, तर ती अतिशयोक्ती होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लोककलांना केवळ राजाश्रय मिळाला, असे नाही, तर त्यांचा अत्यंत खुबीने राजकारणातही वापर केला गेला. या पार्श्वभूमीवर ए.आर्. रहमान यांचे हॉलिवूड पद्धतीचे संगीत विसंगत वाटते. पोवाडा इत्यादी लोककलांचा जागोजागी उपयोग केला असता, तर प्रेक्षकांचे क्षात्रतेज जागृत होऊन हा चित्रपट निश्चितपणे अजून उठावदार झाला असता. त्याच समवेत गीतांचे बोलही सामान्य हिंदी प्रेमपट किंवा ॲक्शन फिल्म्स यांसारखे वाटतात. ‘इथे लोकसंगीतावर प्रभुत्व असलेल्या अजय-अतुल यांच्यासारख्या संगीतकारांचा विचार करता आला असता’, असे वाटले.

७. अन्य वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे  

अ. ‘तीन घंट्यांच्या चित्रपटात काय मांडावे ?’, हे दिग्दर्शकाचे मोठे दायित्व असते. ‘बर्‍याच गोष्टी जाता जाता आणि प्रतीकात्मक पद्धतीने मांडणे’, हे लक्ष्मण उतेकर यांचे कौशल्य दिसून येते, उदा. जेव्हा क्रूरकर्मा औरंगजेब दख्खनच्या भूमीवर आपली बलाढ्य सेना आणि लवाजमा यांसह पाऊल ठेवतो, तेव्हा गरीब मेढ्यांच्या कळपाला भेदरलेल्या अवस्थेत सैरावैरा पळतांना दाखवले आहे. त्या गरीब मेंढ्या, म्हणजे गरीब रयतेचे प्रतीक आहे.

आ. जेव्हा छत्रपती संभाजी महाराज इंग्रजी अधिकार्‍याशी इंग्रजीत बोलतात, तेव्हा त्यांचे अन्य भाषेवरील प्रभुत्व दिसून येते; परंतु ‘वयाच्या चौदाव्या वर्षीच त्यांनी संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवले होते आणि त्यांनी ‘बुधभूषणम्, नखशिखांत, नायिकाभेद आणि सातशतक’, या ग्रंथांची रचना केली होती’, हा महत्त्वपूर्ण उल्लेख करायला हवा होता; कारण यातून त्यांची अतुलनीय बुद्धीमत्ता अन् ब्राह्मतेज अधोरेखित झाले असते.

इ. छत्रपती संभाजी महाराजांवर औरंगजेबाने सलग ४० दिवस अनन्वित पाशवी अत्याचार केले. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेतील हा हृदय हेलावून टाकणारा भाग अतिशय तारतम्याने चित्रित केला आहे. ‘प्रत्यक्षात त्यांच्यावर झालेले सर्व अत्याचार दाखवणे’, हे छत्रपती संभाजी महाराजांचे भक्त असलेले लक्ष्मण उतेकर यांना अयोग्य वाटले आणि ते एका अर्थी योग्यच आहे; कारण आपल्या सर्वांच्या मनात छत्रपती संभाजी महाराजांविषयी प्रचंड आदरभाव आहे. याविषयी बारकाईने चित्रीकरण करणे टाळत असतांनाच पार्श्वभूमीला निवेदनस्वरूपात त्यांच्या छळाचे वर्णन करता आले असते. चित्रपटाने हिंदु राष्ट्राची ठिणगी पेटवलेली आहेच; पण या संदर्भातले विवरण याच ठिणगीला वणव्याचे रूप देऊ शकले असते.

एक मोगल बादशाह देहलीचे तख्त सोडून केवळ एका राजाला पकडण्याच्या ध्यासापोटी दख्खनला येतो आणि इथेच निराशेने मरून जातो. यातच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची थोरवी लक्षात येते. एकंदर ‘छावा’ हा चित्रपट करण्याचा ध्यास घेऊन तो पूर्ण केला’, याबद्दल दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचे जेवढे अभिनंदन करावे, तेवढे अल्पच आहे. ‘हा चित्रपट भारतातील प्रत्येक नागरिकाने पहावा आणि त्यातून शिकावे’, असे मला वाटते.’

(५.३.२०२५)