मध्यंतरी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात प्रसारातील युवा साधकांचे शिबिर झाले. त्या वेळी युवा साधकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. या सत्संगात सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) हेही उपस्थित होते. सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन पुढे दिले आहे.

१. साधनेसंबंधी महत्त्वपूर्ण सूत्रे
१ अ. ‘आध्यात्मिक उन्नतीसाठी कोणता साधनामार्ग उपयुक्त आहे ?’ हे मनाने न ठरवता उन्नतांना विचारून साधना करा !
श्री. चेतन राजहंस (राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था) : कु. सहर्षा मुदकुडे ही पुण्याहून आली आहे. ती चित्रकलेत निपुण आहे.
कु. सहर्षा मुदकुडे (पुणे, महाराष्ट्र) : दोन वर्षांपूर्वी मी आपल्या (परात्पर गुरु डॉक्टरांच्या) ‘छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथावरील छायाचित्र पाहून तसेच चित्र काढले होते. त्या वेळी मी ‘आपणच माझ्याकडून हे चित्र काढून घेत आहात’, असा भाव ठेवला होता. तेव्हा माझ्यामध्ये अधिक प्रमाणात भाव नव्हता, तसेच माझ्याकडून अधिक प्रयत्नही होत नव्हते; परंतु ‘मी चित्रकलेच्या माध्यमातूनच साधना करावी’, असे काहीसे विचार माझ्या मनात येतात.
परात्पर गुरु डॉ. आठवले : येथे हे लक्षात घ्यायला हवे की, ‘मी या मार्गाने साधना करीन’, असे म्हणणे म्हणजे एखाद्या रुग्णाने ‘हे औषध घेतले, तर माझा रोग बरा होईल’, असा विचार करणे होय ! रुग्ण मनानेच कधी औषध घेतो का ? तो आधुनिक वैद्यांना (डॉक्टरांना) विचारूनच औषध घेतो. त्याचप्रमाणे ‘आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी कोणता साधनामार्ग उपयुक्त आहे’, हे उन्नतांना विचारून घ्यायचे असते.

१ आ. ‘मला ही सेवा मिळाली पाहिजे’, ही स्वेच्छा असून आध्यात्मिक उन्नतीसाठी पूरक अशी सेवा भगवंत आपल्याला देतो !
कु. ऋग्वेद जोशी (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) : गुरुदेव, मी काही मासांपूर्वी एक सेवा शिकून घेतली होती. ती सेवा शिकल्यानंतर माझ्या मनात अनेक वेळा ‘उत्तरदायी साधकांनी मला तीच सेवा द्यायला पाहिजे’, असे विचार येत होते. त्या वेळी मी त्यांना पुनःपुन्हा ‘मला ती सेवा द्या’, असा संदेश पाठवत होतो. त्यामुळे ‘मला ती सेवा मिळायला पाहिजे’, अशी माझी अपेक्षा वाढू लागली. अशी अपेक्षा ठेवल्यामुळे मला नंतर निराशा येऊ लागली.
परात्पर गुरु डॉ. आठवले : ‘मला ही सेवा मिळाली पाहिजे’, ही स्वेच्छा झाली. भगवंत तीच सेवा देतो, ज्या सेवेच्या माध्यमातून आपली आध्यात्मिक प्रगती अधिक होणार आहे. साधकाने आपल्या मनाप्रमाणे कोणतीही सेवा करायची नाही. ‘मला सेवा करायची आहे’, एवढेच म्हणायचे. ‘मला हे येते, ते येते’, एवढेच उत्तरदायी साधकांना सांगायचे. त्यानंतर ते जी सेवा सांगतील, तीच सेवा आपण करायची आहे.
कु. ऋग्वेद जोशी : त्या वेळी मी ‘सेवेतून शीघ्र आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी काय करावे ?’ हा सनातनचा लघुग्रंथ थोडासा वाचला होता. तो वाचत असतांना ‘तो पूर्ण ग्रंथ माझ्यासाठीच आहे’, अशी मला जाणीव झाली. त्यामध्ये जे दृष्टीकोन दिले आहेत, ते सगळे माझ्यासाठीच आहेत. ते वाचल्यानंतर माझे अपेक्षेचे विचार न्यून होऊ लागले. त्या लघुग्रंथात लिहिले आहे, ‘आपल्याला जी सेवा मिळते, ती आपल्या जन्मापूर्वीच ‘आपण कोणती सेवा कोण करणार ?’ हे गुरु आणि ईश्वर निश्चित करत असतात.’ हा दृष्टीकोन वाचल्यानंतर माझ्या मनातील अपेक्षांचे विचार पुष्कळ न्यून झाले.
१ इ. कोणत्याही प्रश्नाचा विचार मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर करण्यापेक्षा आध्यात्मिक स्तरावर करणे सर्वांत चांगले असून हे साधना केल्यानंतर साध्य होते !
कु. सहर्षा मुदकुडे : आम्हाला पू. सौरभदादा (सनातन संस्थेचे ३२ वे संत पू. सौरभ जोशी) यांच्या खोलीत त्यांच्या दर्शनाला जायचे होते. तेथे जाण्यापूर्वी मला माझ्या आज्ञाचक्रावर थोडासा दाब जाणवत होता. नंतर त्यांच्या खोलीत गेल्यानंतर मला अल्पावधीतच पुष्कळ चांगले वाटू लागले.
परात्पर गुरु डॉ. आठवले : ही क्षमता महत्त्वाची असते. ही क्षमता केवळ साधनेमुळेच येते. जीवनातील कोणताही प्रश्न किंवा विचार असो, तो मानसिक स्तरावर करण्यापेक्षा बुद्धीच्या स्तरावर करणे अधिक चांगले आणि बुद्धीच्या स्तरावर करण्यापेक्षा आध्यात्मिक स्तरावर करणे सर्वांत चांगले असते. हे साधना केल्यानंतर साध्य होते.
२. साधनेसाठी आवश्यक गुण
२ अ. तळमळीमुळे युवा साधकाला साधनेचे प्रयत्न न झाल्यामुळे खंत वाटणे आणि अंतर्मनात विराजमान असलेल्या भगवान श्रीकृष्णाला त्याने याच जन्मात जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सुटण्याचे वचन देणे
श्री. चेतन राजहंस : श्री. प्रणव अरवतकर पुण्याहून आले आहेत. ते आयुर्वेद महाविद्यालयात अंतिम वर्षाचे शिक्षण घेत आहेत आणि ते पंचकर्म करण्यात कुशल आहेत.
श्री. प्रणव अरवतकर (पुणे, महाराष्ट्र) : गुरुदेव, माझे साधनेचे प्रयत्न अल्प होत होते. मागील एक मासातसुद्धा अल्पच प्रयत्न झाले होते. त्यामुळे मला काहीतरी निश्चय करायचा होता. तेव्हा अंतर्मनात विराजमान असलेल्या भगवान श्रीकृष्णाला मी वचन दिले की, ‘मला याच जन्मात जन्म-मृत्यूच्या चक्रातून सुटायचे आहे.’
परात्पर गुरु डॉ. आठवले : किती जणांना असे वाटते ? तेही एवढ्या लहान वयात ? बाकी युवक कसा विचार करतात ? ‘मला विवाह करायचा आहे. नोकरी करायची आहे आणि पैसा कमवायचा आहे.’ हा विचार बाकीच्यांपेक्षा अगदी वेगळा आहे ना !
(क्रमश:)
या लेखातील पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/906616.html