सध्या सामाजिक माध्यमांमध्ये ‘घिबली’ या ‘एआय् ट्रेंड’ची (कृत्रिम बुद्धीमत्तेशी संबंधित कला) चर्चा आणि त्याचा वापर जोरदार चालू आहे. समाजासह रहाण्यासाठी नवीन काही आले की, ‘आपला त्यात सहभाग असायलाच हवा’, त्या ‘ॲप’चा वापर करून त्याचे ‘शेअरिंग’ (प्रसारित करणे) सहकारी, मित्र परिवार यांच्याशी करणे हे ‘अती महत्त्वाचे’ झाले आहे. तसे नाही केले, तर व्यक्ती स्वत:ला समाजाच्या मागे समजू लागते. जणू मूलभूत सुविधांएवढे अशा प्रकारच्या ‘ट्रेंड’मध्ये सहभागी होणे क्रमप्राप्त झाले आहे.
‘घिबली’ हा जपानी ॲनिमेशन फिल्म स्टुडिओ आहे. या माध्यमातून ‘ॲनिमेटेड’ चित्रपटांची निर्मिती केली जाते. लहान मुलांसाठी निर्माण होणारे विविध ‘कार्टुन्स’ हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. अशाच प्रकारे गंमत म्हणून व्यक्ती स्वत:चे छायाचित्र ‘घिबली’च्या माध्यमातून रेखांकित करून एका वेगळ्या कल्पनेच्या छायाचित्रात रूपांतरित करू शकते. मोठ्या प्रमाणात चालू असलेल्या या ‘ट्रेंड’चा ‘आनंद’ (?) अनेक जण घेत आहेत.
खरे तर याला आनंद म्हणणे अयोग्य होईल; कारण आनंद, म्हणजे क्षणिक भावना नसून सुख किंवा दु:ख यांतील कोणत्याही परिस्थितीत स्थिर असणारी आणि चिरस्थायी टिकणारी आध्यात्मिक अवस्था आहे. ज्यामुळे व्यक्ती सतत उत्साही अन् सकारात्मक रहाते. वरील गोष्टीतून केवळ क्षणिक सुख मिळते. काही ‘लाईक्स’ (आवडले) आणि ‘कमेंट्स’ (अभिप्राय) मिळतात. काल्पनिक किंवा आभासी प्रतिमा निर्माण करण्यासाठी व्यक्तीला मूळ वैयक्तिक छायाचित्र संबंधित प्रणालीसह ‘शेअर’ करावे लागते. असे करून आपण स्वत:साठीच धोका निर्माण करत आहोत. आज ‘सायबर गुन्हे’ मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अशात अशा प्रकारच्या प्रणालीला फसणे म्हणजे स्वत:च्या चेहर्याची ओळख एका अनोळखी व्यक्तीला किंवा संपूर्ण अज्ञात प्रणालीला स्वहस्ते देण्यासारखे आहे. छायाचित्र ‘एडिटिंग’मध्ये जग एवढे पुढे गेले आहे की, कुठल्याही चेहर्याचा वापर अगदी सहज कुठेही करता येतो, पार्श्वभूमी पालटता येते, त्यात काहीही पालट करता येतो. त्यामुळे अशा क्षणिक सुखासाठी भविष्य धोक्यात घालायचे का ? याचा विचार आधी करायला हवा.
दिवसेंदिवस तंत्रज्ञान प्रगत होत असल्यामुळे त्यात नवनवीन गोष्टी प्रतिदिन येतात. सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून त्या भ्रमणभाषद्वारे आपल्यासमोर सातत्याने येतात; परंतु त्या हाताळण्यापूर्वी शंभर वेळा विचार करायला हवा. नंतर प्रशासन किंवा सुरक्षायंत्रणा यांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे याचे गांभीर्य लक्षात घेता प्रत्येकानेच सावधानता आणि संयम राखणे हेच खरे हितावह आहे.
– सौ. स्नेहा ताम्हनकर, रत्नागिरी