१. तोंडाला दुर्गंधी येण्याची कारणे
‘बर्याच वेळा दात स्वच्छ घासत असूनही काही लोकांच्या तोंडाला बोलतांना दुर्गंधी येते. २ – ३ वेळा दात घासूनही त्यांना तेवढ्यापुरताच फरक जाणवतो आणि परत थोड्या वेळाने तोंडाला दुर्गंधी यायला लागते. त्याची महत्त्वाची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
अ. दातांमध्ये जंतूसंसर्ग होणे
आ. पोट नियमित साफ न होणे
इ. पित्तप्रकोप होणे (याची ‘छातीत जळजळ होणे, भूक न लागणे, शौचाला चिकट होणे, मळमळ होणे, जेवल्यानंतर पोट डब्ब किंवा फुगल्यासारखे वाटणे, प्रतिदिन पोट साफ न होणे’, ही लक्षणे आहेत.)

२. उपाय
२ अ. दातांमध्ये जंतूसंसर्ग होणे
१. कडूनिंबाच्या कोवळ्या काडीने सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी दात घासावेत. ही काडी ४ ते ५ इंच लांब आणि १ सें.मी. जाड असावी. कडूनिंबाची कोवळी काडी सहज उपलब्ध न झाल्यास बाजारात मिळणारे कडूनिंबाचे चूर्ण वापरावे.
२. चहाचे २ चमचे कोणतेही दंतमजन घ्यावे. (बाजारात ‘सनातन दंतमजन’ उपलब्ध आहे. तेही घेऊ शकतो.) त्यात ‘चहाचा १ चमचा कडूनिंबाचे चूर्ण, चहाचा अर्धा चमचा लवंग पूड, चहाचा पाव चमचा तुरटी पूड आणि चहाचा पाव चमचा भीमसेनी कापराची पूड’, हे सर्व एकत्र करून मिश्रण सिद्ध करावे. त्यातील थोडेसे मिश्रण घेऊन त्याने सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी दात अन् जीभ यांवर हलक्या हाताने मालिश करावे. आरंभी १ – २ वेळा ते थुंकून टाकावे. नंतर पुन्हा एकदा दात अन् हिरड्या यांना ते मिश्रण लावावे. साधारणतः २ – ३ मिनिटे तोंडात थुंकी धरून ठेवावी आणि नंतर थुंकून टाकावी. त्यानंतर २ – ३ मिनिटांनी एकदा चूळ भरावी. त्यामुळे दातांची कीड आणि तोंडाची दुर्गंधी लगेच न्यून होते.
३. एक चिमूट भीमसेनी कापराची पूड कीड लागलेल्या दातांमध्ये धरावी. हा उपाय दिवसातून २ वेळा करावा.
२ आ. नियमित पोट साफ न होणे : पोट साफ होण्यासाठी प्रतिदिन रात्री झोपण्यापूर्वी खाण्याचा एक चमचा (सुमारे १५ ग्रॅम) त्रिफळा चूर्ण आणि तेवढ्याच आकाराचा एक चमचा गायीचे तूप कोमट पाण्यासह घ्यावे. हा उपाय पुढीलप्रमाणे करावा.
१. पहिल्या मासात प्रतिदिन एक चमचा त्रिफळा चूर्ण घ्यावे.
२. दुसर्या मासात प्रतिदिन पाऊण चमचा त्रिफळा चूर्ण घ्यावे.
३. तिसर्या मासात पहिले १५ दिवस प्रतिदिन अर्धा चमचा आणि नंतरचे १५ दिवस प्रतिदिन पाव चमचा त्रिफळा चूर्ण घ्यावे.
४. असे करून चूर्णाचे प्रमाण न्यून करत जावे. (तिसर्या मासापर्यंत १ चमचा तूप घेत रहावे.)
५. नंतर प्रत्येक आठवड्याला एक दिवस एक चमचा त्रिफळा चूर्ण आणि एक चमचा गायीचे तूप कोमट पाण्यासह घ्यावे.
२ इ. पित्तप्रकोप होणे
१. प्रतिदिन सकाळी एक मोरावळा उपाशीपोटी चावून चावून खावा. त्यानंतर १५ मिनिटे पाणी पिऊ नये.
२. जेवणाची वेळ एकच ठेवावी.
३. पूर्ण झोप घ्यावी. त्यासाठी रात्री ११ वाजण्यापूर्वी झोपावे. ७ ते ८ तास गाढ झोप होणे आवश्यक आहे. आपण रात्री उशिरा, म्हणजे१ वाजता झोपलो आणि पुढे ८ घंटे झोपून सकाळी ९ वाजता उठलो, तरी आपली झोप पूर्ण होत नाही अन् उशिरा झोपल्याने जे दुष्परिणाम व्हायचे ते होतातच !
४. तुरीची डाळ, हरभर्याची डाळ, हिरवी मिरची यांसारखे पित्तकारक पदार्थ खाणे टाळावे. बाहेरचे चाट (पाणीपुरी, भेळ इत्यादी) शक्यतो खाऊ नये. त्यामुळे पित्त अधिक वाढते.’
– डॉ. दीपक जोशी, निसर्गाेपचार तज्ञ (बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स), देवद, पनवेल. (१८.२.२०२५)