राजापूर – ७ महिन्यांपूर्वी देशी दारू दुकानाला ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्याविषयीचा सर्वानुमते फेटाळण्यात आलेला प्रस्ताव नुकताच तालुक्यातील पाचल येथील ग्रामसभेत बहुमतांनी संमत करण्यात आला.
१. २२ ऑगस्ट २०२४ या दिवशी झालेल्या ग्रामसभेत हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्या वेळी अगदी नगण्य ग्रामस्थांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता, तर बहुसंख्य ग्रामस्थांनी याला विरोध केला होता. परिणामी हा प्रस्ताव सर्वानुमते फेटाळण्यात आला.
२. ‘ग्रामसभेने फेटाळलेला प्रस्ताव पुन्हा ६ महिन्यांनी विचारार्थ घेतला जाऊ शकतो’, या नियमानुसार हा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत मांडण्यात आला.
३. या प्रस्तावावरील चर्चेच्या वेळी प्रस्तावाच्या समर्थनार्थ बाजू मांडतांना काही ग्रामस्थांनी गावात सरकारमान्य बिअर बार, बिअर शॉपी, तसेच गावठी दारूधंदे मोठ्या प्रमाणात आहेत, मग आणखी १ देशी दारू दुकान झाले, तर काय फरक पडणार आहे ?, असा युक्तीवाद केला. (गावात दारू पिणारे आणखी २ वाढले, तर काय फरक पडतो ?, असेच म्हणण्यासारखे हे नाही का ? खरेतर दारूबंदी आणि व्यसनमुक्ती यांसाठी प्रयत्न करण्याचे सोडून जनतेला देशोधडीला लावणारे निर्णय घेणारे समाजद्रोहीच म्हणायला हवेत ! – संपादक)
४. काही ग्रामस्थांनी सरकारमान्य दारू दुकानांमुळे सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो, असाही युक्तीवाद केला. (महसूल वाढवण्यासाठी दारू हाच केवळ पर्याय आहे का ? गोपालन, कृषी आदी क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी केल्यास महसूल वाढीसाठी केव्हाही साहाय्यच होईल ! – संपादक)
५. या वेळी प्रस्तावाच्या विरोधात मत मांडतांना नगण्य ग्रामस्थांनी आधी चालू असलेली दारूची दुकाने तांत्रिक गोष्टींमुळे बंद करता येत नसतील तर नको करूया; परंतु नवीन दुकानाला ना हरकत प्रमाणपत्र नको देऊया, अशी भूमिका मांडली.
शेवटी प्रस्तावाच्या समर्थनार्थ बहुसंख्य ग्रामस्थांचा कल पाहून प्रस्ताव संमत झाल्याचे घोषित करण्यात आले.
पहिल्या ग्रामसभेच्या वेळी या प्रस्तावाला नगण्य ग्रामस्थांनी पाठिंबा, तर बहुसंख्य ग्रामस्थांनी विरोध केला होता; परंतु या ग्रामसभेच्या वेळी विरोधाभासी चित्र दिसले. त्यामुळे हा संशोधनाचा विषय होऊ शकतो, असे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे.
संपादकीय भूमिका
|