भारताने बांगलादेशाला रेल्वे प्रकल्पासाठी देण्यात येणारा ५ सहस्र कोटी रुपयांचा निधी थांबवला

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महंमद युनूस

नवी देहली – भारताने बांगलादेशातील रेल्वे प्रकल्पासाठी ५ सहस्र कोटी रुपयांचा निधी थांबवला आहे. हा प्रकल्प भारतातील ईशान्येकडील राज्यांना उर्वरित भारताशी जोडण्यासाठी चालवला जात होता. बांगलादेशलाही या प्रकल्पाचा लाभ झाला असता. बांगलादेशातील अखौरा-अगरतळा क्रॉस बॉर्डर रेल्वे लिंक, खुलना-मोंगला पोर्ट रेल्वे लाईन आणि ढाका-टोंगी-जॉयदेबपूर रेल्वे प्रकल्पासाठी भारत निधी देत होता. याखेरीज  आणखी ५ रेल्वे प्रकल्पांसाठी योजना आखण्यात आल्या होत्या. त्या आणि त्यांचे सर्वेक्षणही आता थांबवण्यात आले आहे.

बांगलादेशच्या सततच्या भारतविरोधी वृत्तीमुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. असे सांगितले जात आहे की, भारत आता बांगलादेशाऐवजी नेपाळ आणि भूतान यादेशांद्वारे ईशान्येला जोडण्याचा पर्याय विचारात घेईल. निधी थांबवण्यापूर्वी भारताने अलीकडेच बांगलादेशाला दिलेली भूमीच्या माध्यमांतून निर्यात करण्याची सुविधाही थांबवली होती. बांगलादेश पूर्वी भारतीय भूमार्गाने नेपाळ आणि भूतान या देशांना माल पाठवत असे.

संपादकीय भूमिका

हा निर्णय घेण्यासाठी भारताला इतका वेळ का लागला ? असे आणखी किती प्रकल्प आणि योजना बांगलादेशासमवेत आहेत ज्या भारताने रहित करणे आवश्यक आहेत ?