Pahalgam Hindu Tourists Attacked : काश्मीरमध्ये हिंदु पर्यटकांवर जिहादी आतंकवाद्यांचे आक्रमण

  • २७ जण ठार झाल्याची शक्यता

  • पर्यटकांची नावे विचारून करण्यात आला गोळीबार

पहलगाम (जम्मू-काश्मीर) – येथील बैसरण या पर्यटनस्थळ असणार्‍या भागात २२ एप्रिलला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास जिहादी आतंकवाद्यांनी हिंदु पर्यटकांवर केलेल्या गोळीबारात अनेकजण ठार, तर १२ जण घायाळ झाले. अशी अधिकृत माहिती देण्यात आली असली, तरी मृतांची संख्या २७ हून अधिक असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे पर्यटक येथे घोडेस्वारी करत असतांना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात स्थानिक ३ जण, तसेच त्यांचे घोडेही घायाळ झाले आहेत. काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

‘आतंकवाद्यांनी पर्यटकांचे नाव विचारून ते हिंदु असल्याचे समजल्यानंतरच त्यांच्यावर गोळीबार केला’, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पोलीस आणि सैन्यदल यांनी येथे आतंकवाद्यांचा शोध चालू केला आहे. या आतंकवादी आक्रमणाचे दायित्व ‘द रेझिस्टन्स फोर्स’ (टीआरएफ) या आतंकवादी संघटनेने स्वाकारले आहे.

या आक्रमणाचा परिणाम अमरनाथ यात्रेवर होऊ शकतो, अशी भीती जम्मू-काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक एस्.पी. वैद्य यांनी व्यक्त केली आहे.

आतंकवादी आक्रमणामागे पाकिस्तान !

अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स सध्या ४ दिवसांच्या भारत दौर्‍यावर आहेत, तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ एप्रिलपासून सौदी अरेबियाच्या दौर्‍यावर गेले आहेत. या पार्श्वभूमीवर जाणीवपूर्वक काश्मीरकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी पाकिस्तानने हे आक्रमण घडवून आणल्याचे म्हटले जात आहे. एरव्ही आतंकवादी पर्यटकांवर कधी आक्रमण करत नाहीत; कारण स्थानिक व्यापार्‍यांना यातून रोजगार मिळत असतो. असे असतांना हे आक्रमण जाणीवपूर्वक करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

या घृणास्पद कृत्यामागील लोकांना सोडणार नाही ! – पंतप्रधान मोदी  

सौदी अरेबियांच्या दौर्‍यावर असणारे पंतप्रधान मोदी यांनी या आक्रमणावर ‘एक्स’वर प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले की, या आतंकवादी आक्रमणाचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्याविषयी माझी सहानुभूती आहे. या घृणास्पद कृत्यामागील लोकांना सोडले जाणार नाही. त्यांचे वाईट हेतू कधीही यशस्वी होणार नाहीत. आतंकवादाविरुद्ध लढण्याचा आपला निर्धार अढळ आहे आणि तो आणखी भक्कम होईल.

अमित शहा श्रीनगरला पोचले !

पतंप्रधान मोदी यांनी सौदी अरेबियावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दूरभाषवरून संपर्क साधून त्यांच्याकडून घटनेविषयी माहिती घेतली, तसेच त्यांना सूचना दिल्या.

यानंतर अमित शहा यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांची तातडीची बैठक घेतली आणि ते श्रीनगरकडे मार्गस्थ झाले.

६ आतंकवाद्यांचा समावेश असल्याची माहिती

या आतंकवादी आक्रमणात ६ आतंकवादी सहभागी असल्याची प्राथमिक माहिती आहे. हे आतंकवादी काश्मिरी नसून ते विदेशी असल्याचीही माहिती मिळत आहे. आतंकवाद्यांनी स्वयंचलित रायफलमधून अनुमाने १० ते १५ मिनिटे गोळीबार केला. यात शेकडो गोळ्या झाडण्यात आल्याने मृतांची संख्या मोठी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गोळीबारानंतर २ सहस्रांहून अधिक पर्यटकांची भीतीमुळे पळापळ !

ज्या ठिकाणी आतंकवादी आक्रमण झाले, त्या वेळी तेथे २ सहस्रांहून अधिक पर्यटक उपस्थित होते. आतंकवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केल्यावर सर्वांची पळापळ झाली. यात काही जण घायाळ झाले. तसेच एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटकाही आला. येथील सुरक्षादलांनी या सर्व घायाळांना संरक्षणामध्ये रुग्णालयात भरती केले.

संपादकीय भूमिका

  • पाकिस्तान आणि काश्मीरमधील जिहादी मानसिकतेचे धर्मांध मुसलमान यांना धडा शिकवल्याविना काश्मीरमधील जिहादी आतंकवाद कधीच संपुष्टात येणार नाही, ही वस्तूस्थिती आहे. याकडे जोपर्यंत दुर्लक्ष केले जात राहील, तोपर्यंत अशा घटना घडतच रहातील !
  • जिहादी आतंकवादी आक्रमणाचा मुसलमान, काँग्रेसवाले, समावादी, पुरोगामी कधी निषेध करत नाहीत, हे लक्षात घ्या !