भोम (गोवा) येथील प्रस्तावित उड्डाणपुलाला ग्रामस्थांचा विरोध असल्याचे प्रकरण

पणजी, २१ एप्रिल (वार्ता.) – भोम उड्डाणपूल बांधकामामध्ये केवळ ४ घरे जाणार आहेत. या घरमालकांना सरकार भूखंड आणि नवीन घर बांधण्यासाठी आर्थिक साहाय्य करणार आहे. मंदिराला हात लावला जाणार नाही. गाडेवाल्यांचे (गाडे म्हणजे छोटी दुकाने (टपर्या)) पुनर्वसन मंदिराजवळ केले जाणार आहे. यासंबंधी लेखी हमी देण्याचीही सरकारची सिद्धता आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २१ एप्रिल या दिवशी दिले. २२ एप्रिल या दिवशी अभियंते भोम येथे आखणी करणार आहेत आणि त्यांना लोकांनी सहकार्य करावे. अभियंत्यांनी आखणी केल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. यानंतर भोम येथील ग्रामस्थांनी पत्रकारांशी बोलतांना ‘सरकारने उड्डाणपूल बांधण्याऐवजी बगलमार्ग बांधावा’, अशी मागणी सरकारकडे केल्याचे सांगितले आणि ‘या प्रकरणी केंद्राकडून माहिती मिळाली पाहिजे’, असे सांगितले.
भोम येथील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या बांधकामास विरोध करणार्या भोम येथील ग्रामस्थांसमोर पर्वरी येथील मंत्रालयामध्ये उड्डाणपुलाच्या बांधकामाविषयी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सादरीकरण करण्यात आले. याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘वर्ष २००७ पासून विस्तारीकरणासाठी प्रयत्न चालू आहेत. काही जण विनाकारण लोकांची दिशाभूल करत आहेत. ‘उड्डाणपूल बांधकामामध्ये ४० घरे जाणार, मंदिर आणि तळे नष्ट होणार’, असा अपप्रचार करण्यात आला; मात्र मंदिर आणि तळे पूर्णपणे सुरक्षित रहाणार आहे आणि केवळ ४ घरे जाणार आहेत. याउलट तळ्याच्या सौंदर्यीकरणासाठी सरकार ३० लाख रुपये देण्यास सिद्ध आहे. रस्ता ६० मीटर नव्हे, तर २५ मीटर रुंदीचा बांधला जाणार आहे. ग्रामस्थांना या गोष्टी पटवून दिल्यानंतर त्यांचे समाधानही झाले आहे.’’ केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ७ एप्रिल २०२५ या दिवशी भोम ते जुने गोवे या रस्त्याच्या चौपदरीकरणाला १ सहस्र ६० कोटी २१ लाख रुपये संमत केले आहेत.