ललित लेखनातून मिळणार्‍या मायावी आनंदामुळे होणार्‍या आध्यात्मिक घसरणीपासून वाचवून साधनेतून मिळणार्‍या शाश्वत आनंदाकडे घेऊन जाणारी दयाघन गुरुमाऊली !

‘२१.२.२०२५ च्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे मायावी आनंदापासून मुक्त होऊन शाश्वत आनंदाकडे वाटचाल करणारी कु. निधी देशमुख !’ हा लेख माझ्या वाचनात आला. ‘कृपाळू गुरुमाऊलींचे सर्वत्रच्या साधकांकडे आणि त्यांच्या मनातील सूक्ष्म विचारांकडे कसे लक्ष असते ? साधकांना प्रवाहपतीत होण्यापासून वाचवण्यासाठी गुरुमाऊली कशी धावून येते ?’, याची मला अनुभूती आली. अगदी माझ्याही बाबतीत दयाघन गुरुमाऊलीने अशाच प्रकारे माझे विचार परिवर्तन करून मला स्वत:च्या पंखाखाली घेतले आहे आणि मला शाश्वत आनंदाच्या पथावर आणले आहे.

श्री. किरण कुलकर्णी

१. लेखनाची प्रथमपासूनच आवड असल्यामुळे लेखक होणे, हेच आपल्या जीवनाचे इतिकर्तव्य असल्याची मनात सतत रहाणारी जाणीव ! 

मला वाचन आणि लेखन यांची आवड अगदी साधनेत येण्यापूर्वीपासूनच होती. माझ्या कथा मुंबई, पुणे इत्यादी शहरांतून प्रकाशित होणार्‍या विविध दिवाळी अंकांमधूनही छापून येत होत्या. आकाशवाणीवरूनही माझी कथा प्रसारित झाली होती. विविध नियतकालिकांतून घेतल्या जाणार्‍या राज्यस्तरीय कथा स्पर्धांमधून माझ्या कथांना पारितोषिके मिळत होती. त्यामुळे माझे मित्र, नातेवाईक, तसेच अगदी अनोळखी व्यक्तींकडूनही माझे प्रत्यक्ष आणि पत्राद्वारे कौतुक होत असे. यामुळे कु. निधीताईंनी त्यांच्या लेखात व्यक्त केल्याप्रमाणे मायावी आणि राजसिक आनंद मला या लेखनातून मिळत होता. ‘याचसाठी आपला जन्म झाला असेल’, असे मला वाटत होते. मी साधनेत येण्यापूर्वी आणि साधनेत आल्यानंतरही काही दिवस हा मायावी आनंदाचा खेळ चालूच होता.

२. साधनेत आल्यानंतर हा आनंद ‘मायावी’ असल्याची जाणीव गुरुमाऊलीने सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांच्या माध्यमातून करून देणे ! 

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

साधनेत आल्यानंतर वर्ष २००४ मध्ये एक दिवस सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका मिरज येथे आमच्या घरी आले. (त्या वेळी ते सद्गुरुपदावर नव्हते. मिरजमध्ये धर्मप्रचाराची सेवा करायचे.) ‘साधकाच्या उद्धारासाठी गुरुमाऊली कुठेही धावून येते’, याची प्रचीती मला त्या वेळी आली. मी त्या वेळी माझी नुकतीच प्रसिद्ध झालेली कथा आणि इतर लेखन सद्गुरु काकांना दाखवले. काकांनी प्रथम माझे कौतुक केले आणि नंतर म्हणाले, ‘‘हे ठीक आहे; पण हा आनंद मायेतील आहे. साधनेवर याचा परिणाम होऊन साधक साधनेपासून दूर जाऊ शकतो.’’ सद्गुरु काकांचे ते वाक्य रामबाणासारखे माझ्या हृदयात शिरले. आता माझ्या मनात या मायावी आनंदाचा आणि शाश्वत आनंदापासून दूर जाण्याच्या भीतीच्या विचारांचा संघर्ष चालू झाला; कारण साधनेत आल्यापासून नामस्मरण, लहान-मोठ्या सेवा यांतून मिळणार्‍या आनंदाची माझ्या मनाला सवय होऊ लागली होती. त्यामुळे ‘लेखनातील आनंद हा मायावी असेल आणि त्यामुळे आपण जर शाश्वत आनंदाला मुकणार असू, तर हा आनंद काय कामाचा ?’, अशी विचारप्रक्रिया होऊन गुरुमाऊलींच्या संकल्पाने हे मायावी लेखन माझ्याकडून बंद झाले. मी ‘साधनाच करायची’, असे उद्दिष्ट ठेवले.

३. कथासंग्रह प्रकाशनच्या माध्यमातून अनिष्ट शक्तींनी परत आक्रमण करणे ! 

मी आता लेखन बंद केले असले, तरी माझ्यातील सुप्त संस्कार डोके वर काढत होते. त्या वेळी परत माझ्या मनाचा संघर्ष होऊन त्या उर्मीच्या लहरी लेखनात रूपांतरीत होण्या आधीच गुरुमाऊलींच्या कृपेने नष्ट व्हायच्या. माझ्या मनात याविषयी संघर्ष सतत असला, तरी ‘साधनेतून मिळणारा आनंद हेच आपले सर्वस्व’, अशी माझ्या मनाची ठाम भूमिका झाली होती. गुरुमाऊलींच्या कृपेने वर्ष २०१७ मध्ये माझी आध्यात्मिक पातळी ६० टक्के असल्याचे घोषित झाले. त्यामुळे गुरुमाऊलींच्या अनुसंधानात राहून मिळणार्‍या माझ्या आनंदात कित्येक पटींनी वाढ झाली होती. याच वेळी अनिष्ट शक्तींनी परत एकदा माझ्यावर आक्रमण केले. ‘आता नवीन कथा राहू दे, निदान आतापर्यंतच्या प्रसिद्ध झालेल्या कथांचा संग्रह तरी करावा’, अशा प्रकारचे विचार माझ्या मनात येऊ लागले. त्यांचा जोर इतका होता की, ‘हा मायावी आनंद आहे’, याचा विसर पडून कथासंग्रह प्रकाशनाच्या विचाराने माझे मन व्यापून गेले. माझ्या नित्य सेवा चालू होत्या; पण माझे मन मात्र प्रकाशनाच्या या विचारांमध्ये पूर्ण गुरफटले होते. माझ्या कथांचे टंकलेखन, मुद्रितशोधन, मुद्रणालयात पाठवणे, बांधणी, मुखपृष्ठ इत्यादींमध्ये माझे पुष्कळ दिवस गेले. २६.१.२०१८ या दिवशी माझ्या कथासंग्रहाचे प्रकाशन झाले. माझ्या कथासंग्रहाला एका प्रथितयश साहित्यिकांची प्रस्तावनाही मिळाली. माझ्या कथासंग्रहाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेकडून पारितोषिकही मिळाले. यामुळे या मायावी आनंदाचा पगडा माझ्या मनावर बसला. त्यामुळे माझ्याकडून सेवा होत असूनही मायेच्या विचारांच्या प्राबल्यामुळे साधनेत माझी अधोगती होत असल्याचेही मला जाणवत होते.

४. सद्गुरु डॉ. पिंगळे काकांच्या माध्यमातून गुरुमाऊलींनी परत एकदा या चक्रव्युहातून सोडवणे ! 

या कालावधीत वर्ष २०२३ मध्ये मिरज येथे सद्गुरु डॉ. पिंगळे काका हे त्यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी आले होते. सांगली जिल्ह्यातील आधुनिक वैद्यांना त्यांचे साधनेसंदर्भात मार्गदर्शन आयोजित केले होते. त्या वेळी मला परत एकदा सद्गुरु काकांचा जवळून सहवास लाभला. अगदी पाच मिनिटेच मी त्यांच्याजवळ होतो. त्या वेळी त्यांनी एकच वाक्य उच्चारले, ‘‘कथासंग्रह प्रकाशित झाला ना ? फेसबुक वर पाहिले. सत्कारही झाला ना ?’’ मला त्या वेळी त्यांच्या वाक्यातील शब्दांचा अर्थ उलगडला नाही; परंतु आपण पुष्कळ मोठी चूक केल्याची भावना माझ्या मनामध्ये निर्माण झाली. त्यांच्या या पाच मिनिटांच्या सहवासाने आणि त्यांच्याकडून प्रक्षेपित झालेल्या चैतन्यामुळे, तसेच दयाळू गुरुमाऊलींच्या संकल्पामुळे माझ्या मनाचे विचारचक्र परत उलटे फिरले. माझ्या मनात या मायावी आनंदाविषयी पूर्ण वैराग्य निर्माण झाले. ‘आता यापुढे लेखनाचा विचारसुद्धा करायचा नाही’, अशी खूणगाठ मी मनाशी बांधली. ‘अजूनही काही वेळा परत मी या मायावी आनंदात फसेन कि काय ?’, अशी मला शंका वाटते; पण गुरुमाऊलींच्या अभेद्य कवचाची जाणीव असल्यामुळे मी निश्चिंत आहे. मी ‘गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनानुसार साधना करणे आणि शाश्वत आनंदाच्या प्रवासाकडे वाटचाल करत रहाणे’, हेच माझ्या जीवनाचे उद्दिष्ट ठरवले आहे.

दयाघन गुरुमाऊलींनी माझ्यावर कृपा करून माझ्याकडून वरील कृतज्ञतापुष्प लिहून घेतले आहे. त्याविषयी मी गुरुमाऊलींच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे.’

– श्री. किरण कुलकर्णी (वय ६४ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), मिरज, जिल्हा सांगली. (२५.०२.२०२५)

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.