गरजूंना घरकुल आवास योजनेचा लाभ मिळण्यासाठीचे शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपोषण मागे

प्रकरणाची चौकशी करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

दोडामार्ग – तालुक्यात पंतप्रधान घरकुल आवास योजनेत घोटाळा झाला आहे. या घोटाळ्याची चौकशी करावी, तसेच गरजूंना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा, या मागणीसाठी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या महिला उपजिल्हाप्रमुख विनिता घाडी यांच्या नेतृत्वाखाली २१ एप्रिलला पंचायत समितीच्या कार्यालयाच्या बाहेर उपोषण चालू केले होते. त्यानंतर गटविकास अधिकार्‍यांनी ‘या प्रकरणाची चौकशी केली जाईल, तसेच वंचित लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सर्वे चालू केला जाईल’, असे आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.

दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावांत आजही अनेक कुटुंबे मातीच्या घरात रहातात. काही जण मोलमजुरी करून स्वत:चा उदरनिर्वाह करतात. अशा लोकांना राज्य सरकार, केंद्र सरकार यांच्या घरकुल आवास योजनेचा लाभ मिळवून देणे सरपंच, सचिव आणि सदस्य यांचे दायित्व आहे; परंतु अनेक गावांत घरकुल योजनेचा लाभ सरकारी सेवेत असलेले, उद्योग, व्यवसाय करणारे यांना देण्यात आला आहे. खर्‍या गरजवंतांना डावलण्यात आले आहे, असा आरोप या वेळी करण्यात आला.

शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, तालुका प्रमुख संजय गवस यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांनी उपोषणस्थळी भेट दिली.

संपादकीय भूमिका

अशा मागणीसाठी उपोषण करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !