सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी वर्ष १९९० पासून अध्यात्मप्रचाराच्या कार्याला आरंभ केला. त्या वेळी त्यांनी ‘आनंदप्राप्तीसाठी साधना’, या विषयावर अभ्यासवर्ग घेणे, विविध ग्रंथांचे संकलन करणे, सार्वजनिक प्रवचने करणे’, असे अनेक मार्ग अवलंबले. आरंभापासूनच ‘शंकानिरसन आणि चांगला साधक कसे व्हायचे ?’, हे सांगणे’, हा त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे. ‘साधकांच्या साधनेबद्दलच्या अडचणी समजून घेऊन त्या दूर होण्यासाठी उपाय सांगणे’, हा त्यांचा स्थायीभाव आहे. या लेखात विविध प्रसंगी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनातील काही उपयुक्त सूत्रे २१ एप्रिल या दिवशी पाहिली. आज पुढील सूत्रे येथे दिली आहेत.
(भाग २)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/905208.html

४. मोक्षप्राप्तीची इच्छा मनात न ठेवता सतत साधना करून आनंद अनुभवा !

कु. प्रतीक्षा हडकर : इतर साधक ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्याचे किंवा संत होण्याचे ध्येय ठेवतात. परम पूज्य, तुम्ही ‘मोक्षगुरु’ आहात. तुम्ही सर्व साधकांना मोक्षापर्यंत घेऊन जाणार आहात ! माझ्या मनात ‘मला मोक्षाला जायचे आहे, संत व्हायचे आहे किंवा ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठायची आहे’, असे विचार न येता केवळ ‘देवाकडे जायचे आहे’, एवढाच विचार येतो.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : यालाच ज्ञानयोगात ‘मोक्षाला जाणे’ आणि भक्तीयोगात ‘देवाकडे जाणे’, असे म्हणतात. दोन्हींचा अर्थ एकच आहे. आले ना लक्षात ? आणि तीसुद्धा इच्छा नको. साधना व्हायला पाहिजे. साधनेतून मिळणारा आनंद महत्त्वाचा असतो. हा आनंद आपण अनुभवू शकतो ना ? त्यामुळे त्यातूनच आपण पुढे पुढे जातो. देव, मोक्ष आणि १०० टक्के आध्यात्मिक पातळी, सगळे एकदम ! कळलं ? तू साधनेत पुढे जाणार आहेस. काळजी करू नकोस.
५. ‘देवाकडे जायचे आहे’, असे वाटणे’, ही तळमळ आहे आणि तोच साधनेचा पाया आहे !
कु. प्रतीक्षा हडकर : कधी कधी मी देवाला शोधत असते. साधकांना पाहिले की, माझ्या मनात विचार येतो, ‘साधकांना सेवेची किती तळमळ आहे ! आणि आपण अनावश्यक विचारांत वहावत जात आहोत.’ त्यानंतर स्वयंसूचना दिल्यावर माझे मन पुन्हा स्थिर होते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : त्याचा विचार करायला नको. ‘आपल्याला देवाकडे जायचंय, जायचयं, जायचंय’, असा विचार मनात असतो ना ? त्याला ‘तळमळ’ म्हणतात. त्या तळमळीचा प्रत्यय आज येईल, पुढच्या वर्षी येईल, दोन वर्षांनी येईल; पण ‘तळमळ’ हा त्याचा पाया आहे.
६. भ्रमणभाषवर चलचित्र पहाण्यासारखी सवय सुटण्यासाठी स्वयंसूचनेद्वारे शिक्षा आणि प्रायश्चित्ताचे महत्त्व अंतर्मनाला समजावून सांगा !

श्री. कुणाल चेऊलकर : मला भ्रमणभाषवर व्हिडिओ (चलचित्रे) पहाण्याची सवय आहे. ही सवय जाण्यासाठी मी स्वयंसूचना दिल्या; पण मला त्यातून बाहेर पडता येत नाही. मग मी स्वतःला शिक्षा म्हणून माझा भ्रमणभाष दुसर्या साधकाकडे तात्पुरता दिला. त्यामुळे त्या संस्काराची तीव्रता न्यून झाली; पण तो संस्कार अजून गेला नाही. हा संस्कार जाण्यासाठी आमच्या आढावासेविकेने सुचवले, ‘यावर कठोरपणे प्रायश्चित्त घेऊ शकता’; पण मला स्वतःशी कठोरतेने वागता येत नाही अन् प्रायश्चित्तही घेता येत नाही. त्यासाठी मी काय प्रयत्न करू ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘मायेतील ही आवड दूर केली नाही, तर साधनेत कधीच पुढे जाणार नाही, म्हणजे माझे सगळे जीवन कुत्र्या-मांजरासारखेच होईल’, अशा आशयाची स्वयंसूचना द्या. संस्कृतमध्ये सुभाषित आहे, ‘हे जग त्यातल्या त्यात शिक्षेच्या भीतीने नीट चालले आहे !’ लहान मूल नीट वागले नाही, तर आई-वडील त्याला ओरडतात. ओरडून मुलात सुधारणा झाली नाही, तर ते त्याला शिक्षाही करतात. शिक्षेचा परिणाम एवढा होतो की, पुढच्या वेळी ती अयोग्य कृती करायला भीती वाटते.
तुम्ही सकाळी भ्रमणभाषवर व्हिडिओ (चलचित्रे) पाहिला, तर लगेच दुपारी स्वतःला काहीतरी शिक्षा करू शकता. असे २ – ३ दिवस केले की, अंतर्मन बाह्यमनाकडे लक्ष ठेवील. बुद्धीने स्वयंसूचना देऊन शिक्षेचे महत्त्व अंतर्मनाला समजावून सांगा. शिक्षा सातत्याने चालू ठेवा. कधी शिक्षा घेतली आणि कधी नाही घेतली, असे केले, तर शिक्षेचा परिणाम होत नाही. अंतर्मन म्हणतं, ‘पुढच्या वेळीही आपण हीच चूक करूया. शिक्षा एखाद्या वेळी होणार नाही.’ तुम्ही प्रयत्न केले की, ३ – ४ आठवड्यांत, १ – २ मासांतही तुमची भ्रमणभाषवर व्हिडिओ पहाण्याची सवय जाईल. सोपं असते ते !
श्री. कुणाल चेऊलकर : शिक्षा घेण्याचे ठरवले, तर बुद्धी विचार करते, ‘जर आपण शिक्षा म्हणून एक वेळ जेवलो नाही, तर आपल्याला सेवा करता येणार नाही किंवा सेवेत अडथळे येणार’ आणि त्या वेळी मनही फसवते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : मनाचे दोन भाग असतात – बाह्यमन आणि अंतर्मन. बाह्यमन हे एक दशांश आणि अंतर्मन ९ दशांश आहे. अंतर्मनात जन्मोजन्मीचे सुखाचे विचार आलेले असतात आणि बुद्धीला जरी कळले की, हे चुकीचे आहे, तरी अंतर्मनात पुष्कळ विचार असल्यामुळे ते बाह्यमनात येतात. मग आपल्याकडून तशी कृती चालू होते; म्हणून बुद्धीने अंतर्मनाला स्वयंसूचना दिली की, अंतर्मनातील विचार न्यून होऊ लागतात. ते न्यून झाले की, बाह्यमनात ते विचार येत नाहीत. आलं लक्षात ? काळजी करू नका.
७. स्वभावदोष असतांना कितीही नामजप केला, तरी तो अंतर्मनात पोचू शकत नाही; म्हणून प्रथम स्वभावदोष-निर्मूलनाचे महत्त्व सांगणारी स्वयंसूचना द्या !
एक साधक : माझ्या वडिलांना राग येतो. नंतर विचार केला, तेव्हा माझ्या लक्षात आले की, वयाच्या तिसर्या वर्षापासून ते घराच्या बाहेर आहेत. ते दुसर्यांच्या घरी रहात होते. त्यांनी पुष्कळ हालअपेष्टा सोसल्या. त्यांना आई-वडिलांचे प्रेम मिळाले नाही आणि समाजात त्यांना फसवणारेच लोक अधिक होते. इतके असूनही पुष्कळ हलाखीच्या जीवनातून ते वर आले; पण त्यामुळे त्यांचा स्वभाव रागीट बनला.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : मग तुझ्या आईने केवढे भोगले असेल ना ?
एक साधक : हो.
साधकाची आई : तुम्ही शक्ती दिलीत ना; म्हणून आता आम्ही या (चांगल्या) स्थितीला आलो आहोत.
एक साधक : पण वडिलांच्या मनावरील रागाचा संस्कार तर गेला पाहिजे. त्यांनी स्वभावदोष-निर्मूलनासाठी सारणी लिखाण करायला पाहिजे ना ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हो हो !
एक साधक : बाबांना सारणी लिखाण करायला सांगितल्यावर ते फारसे गांभीर्याने घेत नाहीत. ते पहाटे लवकर उठून आणि दिवसभर नामजप करतात. तर मग काय केले पाहिजे ?
साधकाचे वडील : माझे नामस्मरण चालूच असते. मला नातेवाइकांकडे जायला नको वाटते. कुणाशी बोलावेसे वाटत नाही. केवळ नामस्मरण, नामस्मरण, नामस्मरण ! त्यातून मला एक वेगळा आनंद मिळतो.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (साधकाच्या वडिलांना उद्देशून) : स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेला पुष्कळ महत्त्व आहे. स्वभावदोष असतांना कितीही नामजप केला, तरी नामजप अंतर्मनात पोचूच शकत नाही. आपले सगळे आयुष्य फुकट जाते. आपल्यातील स्वभावदोष अधूनमधून उफाळून येतात. आपण नामजप अखंड करत असलो, तर स्वभावदोष उफाळून आले नाहीत, तरी ते अंतर्मनात असतात. एखाद्या भिंतीच्या बांधकामाच्या वेळी तिच्यातील विटा नीट नसतील आणि आपण त्या भिंतीला रंग लावला, तर काय उपयोग ? आधी त्या विटा काढून नीट लावल्या पाहिजेत. मग रंग द्यायला हवा. तसे ‘केवळ नामजप करणे’, हे वर वर दिलेल्या रंगासारखे आहे. एक लक्षात घ्या, प्रथम आपल्याला आपले मन खंबीर करायचे आहे. स्वभावदोष दूर झाल्यावर ते खंबीर होते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (साधकाला उद्देशून) : स्वभावदोष-निर्मूलनाचे महत्त्व सांगणारी पुढील स्वयंसूचना वडिलांना लिहून दे. त्यांना ती देता येत नसेल, तर दिवसातून १०० – २०० वेळा वाचायला सांग.
स्वभावदोष-निर्मूलनाचे महत्त्व सांगणारी स्वयंसूचना : ‘स्वभावदोष-निर्मूलनाची प्रक्रिया नियमितपणे राबवल्याने माझ्या अंतर्मनातील जन्मोजन्मीचे संस्कार नष्ट होऊन माझी साधना परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित अशी होणार आहे’, हे लक्षात घेऊन मी नियमितपणे सारणी लेखन आणि स्वयंसूचनांची सत्रे करणे’ इत्यादी प्रयत्न करीन.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (साधकाच्या वडिलांना उद्देशून) : स्वभावदोष-निर्मूलनाचे महत्त्व बाह्यमनातून अंतर्मनात गेले की, लगेच फरक पडायला लागतो. आधी ५ – ६ मास स्वभावदोष-निर्मूलनासाठी प्रयत्न करा. एकवेळ नामजप झाला नाही तरी चालेल; पण आधी हे व्हायला पाहिजे. तुम्हाला काही मासांत हे जमेल. तो साधनेचा पाया आहे. स्वभावदोष दूर झाले की, मग उरलेल्या आयुष्यात नामजप करायचाच आहे. मग नामाच्या पुढे ध्यानावस्था, अखंड भावजागृती हे सगळे तुम्हाला अनुभवता येईल. आलं लक्षात ?
(क्रमश:)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/905911.html