सांखळी येथील कीर्तन शिबिराचा समारोप

सांखळी – गोमंतक संत मंडळ कीर्तन विद्यालय फोंडा आणि सम्राट क्लब सांखळी यांच्या वतीने आयोजित ३ दिवसांचे कीर्तन शिबिर नुकतेच पार पडले. कीर्तन क्षेत्रात सर्व समाजातील विशेषता मुलींचा सहभाग अधिक आहे. त्यामुळे आपल्या घरात संस्कारांची वाढ होणार, असे उद्गार समारोप समारंभात सौ. सुलक्षणा प्रमोद सावंत यांनी काढले.

या कार्यक्रमाला पद्मश्री विनायक खेडेकर, समाजसेविका सौ. सुलक्षणा प्रमोद सावंत, चित्रकार शिवानंद खेडेकर, सौ. तनुजा शिरोडकर, शिबिराच्या संयोजिका सौ. शुभदा सावईकर, गोमंतक संत मंडळाचे अध्यक्ष ह.भ प. सुहास वझेबुवा आदी उपस्थित होते. या वेळी ह.भ प. सुहास वझेबुवा म्हणाले, ‘‘हिंदूंच्या संघटनाकरता साधना संस्कार प्रबोधन महत्त्वाचे आहे. प्रत्येक मंदिरात असे उपक्रम राबवले जावेत.
’’ पद्मश्री विनायक खेडेकर म्हणाले, ‘‘कीर्तनातून संतपरंपरेचे जतन होते; म्हणून पालकांनी त्यांच्या मुलांना कीर्तन शिबिराला पाठवावे.’’ या वेळी सौ. साधना जोशी यांनी धर्मशिक्षणाचे महत्त्व सांगितले. श्री. राजेंद्र सावईकर यांचे पर्यावरण विषयावर आणि डॉ. शांभवी बेहेरे यांचे आरोग्य आहार यावर मार्गदर्शन झाले. त्याचप्रमाणे संस्कृत, अभिनय, संगीत आदी विषयांवरही मार्गदर्शन झाले.
या शिबिराचे उद्घाटन १९ एप्रिल या दिवशी दैनिक तरुण भारतचे निवासी संपादक सागर जावडेकर यांच्या हस्ते झाले होते. त्यांनी त्यांच्या भाषणात ‘सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारे माध्यम म्हणजे कीर्तन होय ! संस्कारांच्या प्रबोधनातून समाजमन घडते’, असे सांगितले होते.