संपादकीय : हिंदुविरोधी आणि भ्रष्टाचारी जगन रेड्डी ! 

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी

अंमलबजावणी संचालनालयाच्या (‘ईडी’च्या) भाग्यनगर  पथकाने २ दिवसांपूर्वी आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या ३ आस्थापनांतील २७ कोटी ५० लाख रुपयांचे समभाग (शेअर्स) तात्पुरते जप्त केले आहेत. यासमवेतच ‘ईडी’ने त्याच प्रकरणात दालमिया सिमेंट्स (भारत) लिमिटेडच्या (डी.सी.बी.एल्.च्या) मालकीची ३७७ कोटी २० लाख रुपयांची भूमीही जप्त केली आहे. विशेष म्हणजे गुन्हा नोंद झाल्यानंतर १४ वर्षांनी ही मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. खरेतर १४ वर्षे अन्वेषण यंत्रणा काय करत होत्या ? हाही एक प्रश्न आहे. जुन्या ‘मनी लॉड्रिंग’ प्रकरणात ‘ईडी’ने ही कारवाई केली आहे. अन्वेषणात असे निदर्शनास आले की, डी.सी.बी.एल्.’ने यापूर्वी जगन मोहन रेड्डी यांच्याशी संबंधित आस्थापनात रघुराम सिमेंट्स लिमिटेडमध्ये ९५ कोटी रुपये गुंतवले होते. त्या बदल्यात त्यांना कडप्पा जिल्ह्यात ४०७ हेक्टर खाण भाडेपट्टा रेड्डी सरकारने मिळवून दिल्याचा आरोप करण्यात आला होता. अन्वेषण यंत्रणांचे म्हणणे आहे की, जगन रेड्डी, त्यांचे जवळचे सहकारी व्ही. विजया साई रेड्डी आणि ‘डी.सी.बी.एल्.’चे पुनित दालमिया यांनी रघुराम सिमेंट्स लिमिटेडमधील त्यांचे समभाग ‘परफिसीम’ या फ्रेंच आस्थापनाला विकण्याचा करार केला होता. हा सौदा १३५ कोटी रुपयांना झाला होता. यातील ५५ कोटी रुपये जगन रेड्डी यांना हवालाद्वारे रोख स्वरूपात देण्यात आले होते. या प्रकरणी वर्ष २०१३ मध्ये ‘सीबीआय’ने जगन रेड्डी, डी.सी.बी.एल्. आणि इतर यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंद केला होता.

जगन रेड्डी यांची संपत्ती ५ वर्षांत २४ कोटींवरून ४७० कोटी रुपये! 

जगन मोहन रेड्डी यांची संपत्ती ५ वर्षांत २४ कोटी रुपयांवरून ४७० कोटी रुपये पर्यंत पोचल्याचे अन्वेषण यंत्रणांच्या निदर्शनास आले. मुळात जगन मोहन रेड्डी यांनी पूर्वीपासून जी पापे केली आहेत, ती आता बाहेर पडत आहेत. ते हिंदु असल्याचे दाखवतात; मात्र ते ख्रिस्ती पंथाचे पालन करण्याला प्राधान्य देतात. ते जर हिंदु असते, तर त्यांनी हिंदूंची मंदिरे आणि हिंदूंच्या विरोधात कठोर कारवाईची भूमिका घेतली नसती. म्हणजे ‘दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे’, असा त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्या कारकीर्दीत उत्तर आंध्रप्रदेश आणि ओडिशा राज्यांतील हिंदूंचे महत्त्वाचे श्रद्धास्थान असलेले नीलमणी दुर्गादेवीचे मंदिर रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली उद्ध्वस्त करण्यात आले. हा प्रकार अहिंदु जगन मोहन रेड्डी सरकारने जाणीवपूर्वक केला असून याद्वारे राज्यातील हिंदूंचा अवमान करण्याचा हेतू आहे, असा घणाघात भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि आंध्रप्रदेश सहप्रभारी सुनील देवधर यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये केला होता. रेड्डी सरकारने त्यांचा हिंदुविरोधी अजेंडा स्पष्ट केल्याचेही देवधर यांनी या वेळी म्हटले होते. आंध्रप्रदेश विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयानंतर जगन रेड्डी यांनी माध्यमांना एका प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले की, मी प्रार्थना करतो आणि बायबल वाचतो. यात देवाला निर्णय घ्यावा लागेल. जगन मोहन रेड्डीची आई वाय.एस्. विजयम्मा विजयवाडा येथील शपथविधी समारंभात नेहमीप्रमाणे बायबल ठेवतांना दिसली. वास्तविक जगन मोहन रेड्डी ख्रिस्ती पंथ मानतात. जेव्हा जेव्हा जगन रेड्डी तिरुमला मंदिरात गेले, तेव्हा त्यांच्यावर कठोर टीका झाली आहे; कारण ते ख्रिस्ती आहेत. ‘ख्रिस्ती पंथावर विश्वास असलेल्या मुख्यमंत्र्यांना हिंदु मंदिरात प्रार्थना करण्याची अनुमती द्यायला नको’, असे तिरुमला देवस्थानासह सर्व हिंदूंचे मत होते. जुन्या परंपरेनुसार हिंदु नसलेल्या अभ्यागतांनी भगवान व्यंकटेश्वरावर त्यांचा विश्वास व्यक्त करणार्‍या जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली पाहिजे. तथापि जगन रेड्डी यांनी हे कधीच केले नाही.

हिंदूंना भ्रष्ट करण्याचा डाव !  

आंध्रप्रदेशाचे माजी मुख्‍यमंत्री वाय.एस्. जगन मोहन रेड्डी

२ वर्षांपूर्वी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी असा आरोप केला होता की, माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या सरकारच्या वेळी तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडवांमध्ये गोमांस, डुक्कर आणि मासे यांच्या चरबीचे तेल मिसळले जात आहे. हे ठाऊक असतांनाही रेड्डी यांनी काहीच केले नाही. यावरून ते हिंदुविरोधी असल्याची तीव्र भावना हिंदूंमध्ये निर्माण झाली. ‘जगन रेड्डी यांना हिंदु चालीरिती आणि परंपरा यांचे ज्ञान नाही’, असा आरोप केला होता, तेव्हापासून लोकांच्या मनात हे प्रश्न उद्भवतात की, जगन रेड्डी यांचा धर्म कोणता आहे ? ‘चंद्राबाबू नायडू यांनी केलेले आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित आहेत’, असे मानले जात होते; परंतु सरकारनेच लाडवात प्राण्यांची चरबी वापरल्याच्या संबंधीची कागदपत्रे अधिकृतपणे उघड केली आहेत. ही कागदपत्रे पाहून प्रत्येक हिंदूचे रक्त सळसळते, तसेच यामुळे हिंदु भाविक आणि बालाजीचे भक्त यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. तिरुमला तिरुपती मंदिर ट्रस्ट हे जगातील सर्वांत श्रीमंत हिंदु मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरातून मिळणारा लाडवाचा प्रसाद पुष्कळ प्रसिद्ध आहे. प्रतिवर्षी कोट्यवधी भाविक या देवतेचे दर्शन घेण्यासाठी येतात आणि प्रसाद म्हणून लाडू घेऊन जातात. जगन रेड्डी यांनी भक्तांना गोमांस खायला देऊन पाप केले. बालाजीचा ‘व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा’, असा जयजयकार सर्वत्र प्रचलित आहे. त्यात गोविंदा म्हणजे गायींचा रक्षण करणारा. ‘गोविंदाच्या भक्तांना गायीचे मांस खाऊ घालून तत्कालीन मुख्यमंत्री जगन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एवढे मोठे पाप केल्यामुळेच आता त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळत आहे का ?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कठोर शिक्षा हवीच ! 

‘गायीमध्ये ३३ कोटी देव आहेत’, असे मानणार्‍या हिंदूंची याद्वारे मोठी फसवणूक करणार्‍यांना एक ना एक दिवस शिक्षेला सामोरे जावेच लागेल. हिंदूंच्या मंदिरासाठी लाडू बनवण्याचे कंत्राट हिंदु भक्ताला का देण्यात आले नाही ? यामागे काही षड्यंत्र होते का ? याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. अजूनही या चौकशीला प्रारंभ झालेला नाही. मंदिर सरकारीकरणाचा हाही एक दुष्परिणाम या निमित्ताने समोर आला आहे. वर्ष २०१९ पूर्वी लाडू बनवण्यासाठी कर्नाटक येथील प्रसिद्ध सरकारी आस्थापन ‘कर्नाटक सहकारी दूध महासंघा’कडून शुद्ध तूप खरेदी केले जात होते; मात्र जगन रेड्डी यांच्या सरकारने हे तूप थांबवले आणि अन्य आस्थापनाला तूप खरेदीचे कंत्राट दिले. तत्कालीन सरकारकडून याद्वारे हिंदूंना गोमांस खाऊ घालायचा डाव होता का ? किंवा अन्य काही षड्यंत्र वा आर्थिक घोटाळा करण्याचा डाव होता का ? हे सर्व चौकशीत समोर येऊ शकते. या सर्व गोष्टींवरून जगन रेड्डी यांनी छुप्या पद्धतीने हिंदु धर्माच्या परंपरा, चालीरिती आणि हिंदूंची श्रद्धास्थाने यांवर आघात पोचवण्याचे मोठे दुष्कर्म केले आहे. त्यामुळे ‘अशा हिंदुविरोधकांना कठोर शिक्षा व्हायला हवी’, अशी सर्व भक्तांची मागणी आहे.

जगन रेड्डी यांच्यासारख्या हिंदुविरोधी आणि भ्रष्टाचारी राजकारण्यांना जनतेने कायमचे लक्षात ठेवून त्यांना त्यांची जागा दाखवावी !