ज्योतिषांनी सांगितलेले ‘म्हातारपणी दुय्यम दर्जाचा राजयोग उपभोगायला मिळणार’, हे भविष्य सत्यात अनुभवणार्‍या फोंडा (गोवा) येथील सौ. सविता सत्यनारायण तिवारी !

१. विवाहानंतर सतत संघर्षाला तोंड द्यावे लागणे

सौ. सविता तिवारी

‘माझा विवाह झाल्यानंतर माझ्या आयुष्यात केवळ संघर्षच संघर्ष होता. आमच्या घरात सतत वाद आणि भांडणे होत असत. आमच्या घरात नेहमीच आर्थिक टंचाई असे. मला सरकारी नोकरी असल्यामुळे काही वेळा आर्थिक ताण थोडा अल्प होत असे. मला नोकरीच्या ठिकाणी प्रामाणिकपणे कामे करतांना संघर्षाला सामोरे जावे लागत असे. माझी घर आणि कार्यालय अशा दोन्ही ठिकाणी कष्टप्रद स्थिती होती.

२. निवृत्तीनंतरही संघर्ष चालूच राहिल्यामुळे भविष्याविषयी संशय वाटणे

मी वयाच्या ४५ व्या वर्षी एका ज्योतिषांना माझी जन्मपत्रिका दाखवली होती. तेव्हा त्यांनी माझ्या पत्रिकेचा अभ्यास करून मला ‘तुम्हाला म्हातारपणी दुय्यम दर्जाचा राजयोग उपभोगायला मिळेल’, असे सांगितले होते. ज्योतिषांनी सांगितलेले सूत्र ऐकून मला वाटले, ‘माझ्या म्हातारपणी संघर्ष असणार नाही किंवा अल्प असेल.’ मी ३० वर्षे नोकरी करून वयाच्या ५८ व्या वर्षी निवृत्त झाले. तेव्हा नोकरीतील संघर्ष संपला; मात्र माझा घरी संघर्ष चालूच होता. आमच्या जीवनात कठीण प्रसंग येतच होते. त्यामुळे ‘हा कसला राजयोग ? असा असतो का राजयोग ?’, असे प्रश्न मला पडत असत.

३. एका नातेवाईक ज्योतिषांनी साधिकेला तिच्या जीवनात घडलेल्या चांगल्या गोष्टी लक्षात आणून देणे, तरीही तिचे मन साशंक असणे

त्यानंतर २ – ३ वर्षांनी माझी व्यवसायाने ज्योतिषी असलेल्या आमच्या एका नातेवाइकांची भेट झाली. त्यांना मी अन्य ज्योतिषांनी पूर्वी सांगितलेले राजयोगाविषयीचे सूत्र सांगून विचारले, ‘‘मानसिक त्रास, कष्ट आणि संघर्ष अजूनही होत आहेत. हा कसला राजयोग ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुमचा मुलगा आणि मुलगी यांचे विवाह झाले आहेत. तुमच्यावर ऋण नाही. तुमचा नोकरीत संघर्ष होता, तरी तुम्हाला निवृत्त होतांना काही अडचणी आल्या नाहीत. तुमची प्रकृती चांगली आहे. तुम्हाला तुमच्या कर्मांचे समाधान आहे आणि गुरुकृपेने तुम्हाला साधनेची आवडही आहे. यालाच ‘राजयोग’ म्हणतात.’’ हे मला अंशतः पटले होते; पण समाधान झाले नव्हते.

४. आता मी साधनेत आल्यानंतर आणि मी सेवानिवृत्त होऊन अनुमाने १५ – १६ वर्षे झाल्यानंतर विशेषत: या काही वर्र्षांत मला प्रकर्षाने वाटत आहे की, ‘मी दुय्यम दर्जाचा नव्हे, तर उत्तम राजयोग उपभोगत आहे.’

४ अ. मुलीने पूर्णवेळ साधना करणे आणि कुटुंबातील अन्य सदस्य साधना करू लागणे : वर्ष २००० मध्ये माझी मुलगी होमिओपॅथी वैद्या (सुश्री) आरती तिवारी पूर्णवेळ साधना करू लागली. तेव्हापासून माझी अल्प-अधिक प्रमाणात साधना चालू झाली. आमच्या घरातील व्यक्तींना असलेले आध्यात्मिक त्रास उणावत जाऊन कुटुंबातील सर्वच जण त्यांच्या त्यांच्या स्थितीनुसार साधना करत आहेत.

४ आ. २ वर्षांपूर्वी माझे यजमान पू. सत्यनारायण तिवारी (सनातनचे १२४ वे (व्यष्टी) संत) संत म्हणून घोषित झाले.

४ इ. संतसेवा करण्याची संधी मिळणे आणि ‘साधना हेच जीवन’, असे वाटणे : सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने मला यजमानांची सेवा ‘संतसेवा’ म्हणून करण्याची संधी मिळाली आहे. मी घरी राहून १ ते दीड घंटा मराठी लिखाणाचे हिंदीत भाषांतर करण्याची सेवा करत आहे. माझा नामजप आणि प्रार्थना नियमित होत आहेत. मला साधनेची आवड आहे आणि ती गुरुदेवांच्या कृपेने वाढत जाऊन आता ‘साधना हेच जीवन’, असे मला वाटत आहे. मला स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू लक्षात येत आहेत. ते काही प्रमाणात उणावलेही आहेत. माझी नामावरची श्रद्धा वाढली असून संघर्षही अल्प होत आहे.

४ ई. ‘गुरुदेव सूक्ष्मातून सदैव समवेत आहेत’, असे वाटत असल्याने समाधानी असणे आणि आनंद जाणवणे : आता संघर्षाचा प्रसंग आला, तरी ‘गुरुमाऊली समवेत आहेत’, याची मला शाश्वती आहे. माझा ताण पुष्कळ प्रमाणात नष्ट झाल्यामुळे जीवनात एक प्रकारचा उत्साह आणि आनंद वाटत आहे. ‘गुरुदेव सूक्ष्मातून सदैव आमच्या समवेत आहेत’, असे मला वाटते. अशा प्रकारे ‘मन आनंदी आणि समाधानी रहाणे’, म्हणजेच ‘मी राजयोग उपभोगत आहे’, याची अनुभूती आहे’, असे मला वाटते आणि ज्योतिषाने सांगितलेले ‘तुम्ही म्हातारपणी दुय्यम दर्जाचा राजयोग अनुभवणार !’, हे भविष्य सत्य झाल्याची निश्चिती झाली.

हे गुरुराया, मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. सविता सत्यनारायण तिवारी (वय ७४ वर्षे), नागेशी, फोंडा, गोवा. (८.३.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक