उसगाव, फोंडा येथे गोवा सरकारचा ‘गोवा मांस प्रकल्प’ आहे. या ठिकाणी सर्व काही सरकारी नियमानुसार सुरळीत चालू आहे, असे सर्व गोमंतकियांची पूर्वी भावना होती; मात्र या ठिकाणी सर्व सरकारी नियम धाब्यावर बसवून वासरे, धष्टपुष्ट गोवंश आदींची सर्रास हत्या केली जात असल्याचे ‘गोवंश रक्षा अभियान’चे अध्यक्ष श्री. हनुमंत परब यांच्या वर्ष २०१३ मध्ये लक्षात आले. यानंतर त्यांनी फोंडा पोलीस ठाण्यात याविरोधात तक्रार प्रविष्ट आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात ‘गोवा मांस प्रकल्पा’तील अवैध गोवंशियांची हत्या रोखण्याची मागणी करणारी जनहित याचिका प्रविष्ट (दाखल) केली. उच्च न्यायालयाने एका आदेशान्वये ‘गोवा मांस प्रकल्पा’तील अवैध गोवंशियांच्या हत्येवर बंधने आणली. उच्च न्यायालयाने ‘गोवा मांस प्रकल्पा’ला सर्व नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले. यानंतर उच्च न्यायालयाच्या सर्व अटींचे पालन करण्यासाठी हा प्रकल्प अनेक वर्षे बंद स्थितीतच होता. ‘गोवा मांस प्रकल्पा’च्या आकडेवारीनुसार त्या प्रकल्पात प्रतिदिन सुमारे २०० ते २५० गोवंशियांची अवैध हत्या केली जात होती. हा अपप्रकार तेथे गेली अनेक वर्षे अनिर्बंधपणे चालू होता. कर्नाटक, महाराष्ट्र आदी शेजारच्या राज्यांमधून येथे गोवंश हत्या करण्यासाठी आणला जात होता.
वर्ष २०१३ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर देवभूमी गोव्यात गोवंशियांचा रक्तपात थांबला. यामुळे गेल्या सुमारे १० वर्षांच्या काळात प्रतिदिन २०० गोवंश म्हणजे प्रतिमास ६ सहस्र आणि प्रती वर्ष ७२ सहस्र अशी संख्या धरल्यास आतापर्यंत ७ लाख गोवंशियांना जीवनदान मिळाले आहे. याचे श्रेय ‘गोवंश रक्षा अभियान’चे अध्यक्ष श्री. हनुमंत परब आणि त्यांचे इतर पदाधिकारी यांना जाते. गोवंश रक्षणाच्या कार्यात गोव्यातील एक सक्रीय गोरक्षक म्हणून श्री. हनुमंत परब गोवाभर प्रचलित आहेत. नाणूस, वाळपई येथे ‘अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्र’ या नावाने गोशाळा श्री. हनुमंत परब आणि त्यांच्या ट्रस्टचे इतर सदस्य चालवत असतात. गोवंश रक्षणाच्या कार्यातील त्यांचा अनुभव, या कार्यात येणार अडथळे आणि हे कार्य वृद्धींगत होण्यासाठीचे प्रयत्न यांविषयी त्यांच्याच शब्दांत जाणून घेऊया.

विशेष सदर
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक
१. अशी झाली ‘अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्र’ या गोव्यातील पहिल्या गोशाळेची स्थापना !
वर्ष २००८ मध्ये वाळपई येथे अवैधरित्या गोवंशियांची हत्या केली जात असल्याची माहिती आम्हाला मिळाली. आम्ही गोप्रेमी त्या ठिकाणी गेलो. तेथे एका गायीला मारण्यात आले होते; मात्र दुसर्या गायीला वाचवण्यात आम्हाला यश आले. या घटनेनंतर वाळपई येथे प्रथमच गोवंशियांच्या अवैध हत्येच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. यानंतर डिचोली येथेही असा प्रकार घडत असल्याचे तेथील गोप्रेमींनी आम्हाला कळवले. यानंतर मी, डिचोली येथील गोप्रेमी तथा डिचोली नगरपालिकेचे तत्कालीन नगरसेवक श्री. भगवान हरमलकर आणि डिचोली पोलीस असे गोवंशियांची अवैध हत्या होत असलेल्या ठिकाणी गेलो. तेथे ३ गोवंशियांना मारलेले होते आणि १४ गोवंशियांना वाचवण्यात आम्हाला यश आले. वाचलेले गोवंश प्रथम डिचोली नगरपालिकेकडे देण्यात आले आणि नंतर जागेअभावी त्यांना सांतीनेझ, पणजी येथे नेण्यात आले. यानंतर ‘गायत्री परिवारा’चे आणि नाणूस, वाळपई येथील श्री. रामचंद्र जोशी अन् मी सांतीनेझ, पणजी येथे ठेवलेल्या १४ गोवंशियांची स्थिती पहाण्यासाठी गेलो. तेथील गोवंशियांची स्थिती पुष्कळ बिकट होती आणि त्यांना चारापाणी व्यवस्थित दिले जात नव्हते. मे मास होता आणि लवकरच पाऊस चालू होणार होता. या वेळी आमची अधिवक्ता माणिक थळी यांच्याशी भेट झाली. मी, श्री. रामचंद्र जोशी आणि अधिवक्ता माणिकराव थळी असे तिघांनी या गोवंशियांना अन्यत्र नेऊन तेथे गोशाळा चालू करण्याचा निर्णय घेतला. श्री. रामचंद्र जोशी यांच्या कुटुंबियांनी नाणूस, वाळपई येथे गोशाळा चालवण्यासाठी ९९ वर्षांच्या भाडेकरारावर (‘लिज’वर) भूमी दिली. यानंतर आम्ही सर्व गोप्रेमींनी एकत्र येऊन अधिकृतरित्या एक ट्रस्ट स्थापन करून नाणूस, वाळपई येथे २५ मे २००८ या दिवशी ‘अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्र’ या गोव्यातील पहिल्या गोशाळेची स्थापना केली.

२. ‘गोवा मांस प्रकल्पा’तील अवैध गोवंश हत्येला असा बसला आळा !
मी आणि श्री. रामचंद्र जोशी यांनी वर्ष २००८ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात राज्यातील सर्व अनधिकृत पशूवधगृहे बंद करण्याची मागणी करणारी याचिका प्रविष्ट केली. यानंतर वर्ष २०१३ मध्ये गोवा सरकार चालवत असलेल्या ‘गोवा मांस प्रकल्पा’त अवैधरित्या गोवंशियांची हत्या केली जात असल्याचे लक्षात आल्यावर ती रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात जनहित याचिका प्रविष्ट केली. न्यायालयाच्या आदेशानंतर ‘गोवा मांस प्रकल्पा’तील अवैध गोवंशियांची हत्या रोखली गेली. या वेळी ‘गोवंश रक्षा अभियाना’च्या हस्तक्षेपामुळे ११३ गोवंशियांना जीवदान मिळाले. या प्रकरणी ‘गोवा मांस प्रकल्पा’तील ३० खाटिकांना न्यायालयात आरोपी बनवण्यात आले. उच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर गोवंशियांच्या अवैध हत्येच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर जागृती झाली आणि अवैध गोवंश हत्या बंद झाली. वाचवलेला गोवंश पुढे ‘अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्रा’त नेण्यात आला. वर्ष २००८ ते २०१३ या कालावधीपर्यंत १२१ गोवंश होते. अपघातग्रस्त किंवा पशूवधगृहातून वाचलेला गोवंश ‘अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्रा’त आणला जात असे.
३. राजकीय दडपणाविना गोवंश रक्षणाचे कार्य करण्यासाठी भाजपला दिली सोडचिठ्ठी !
मी वर्ष १९९७ पासून गोव्यातील पर्ये मतदारसंघात भाजपचे कार्य करत होतो. सुमारे १६ ते १७ वर्षे मी हे कार्य केले. या काळात मी उत्तर गोव्याच्या भाजपचे प्रवक्ते, तसेच पक्षाच्या केंद्रीय समितीचाही सदस्य होतो. मला कोणत्याही राजकीय दडपणाविना गोवंश रक्षणाचे कार्य करता यावे, यासाठी वर्ष २०१३ मध्ये मी भाजपला सोडचिठ्ठी दिली. गोवंश रक्षणाचे कार्य हे धर्माचे, पुण्यदायी आणि मनाला समाधान देणारे असल्याने पुढे मी माझा सर्व वेळ या कार्यासाठी दिला.
‘गोवंश रक्षा अभियान’ संस्थेची स्थापना आणि तिचे कार्य
गोव्यात अनेक ठिकाणी गोवंशियांची हत्या होत आहे आणि ‘ती रोखण्यासाठी मोठ्या स्वरूपात अन् संघटितपणे कार्य करण्याची आवश्यकता आहे’, असे आमच्या लक्षात आले. यामुळे वर्ष २०१२ मध्ये श्रीक्षेत्र, तपोभूमी येथील पिठाधीश पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांचा आशीर्वाद आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे ‘पद्मनाभ संप्रदाय’, ‘गायत्री परिवार’, ‘भारत स्वाभिमान’, ‘विश्व हिंदु परिषद’, ‘राजस्थानी समाज-गोवा’, ‘हिंदु जनजागृती समिती’ आणि इतर संघटना यांनी ‘गोवंश रक्षा अभियान’ या संस्थेची स्थापना केली. श्री. हनुमंत परब हे ‘गोवंश रक्षा अभियान’चे अध्यक्ष आहेत. ‘गोवंश रक्षा अभियान’चे कार्य चालू झाल्यानंतर तालुकास्तरावर मेळावे घेण्यात आले आणि ‘गोवंश रक्षण’ या विषयावर जागृती करून लोकांचे एकत्रीकरण करण्यात आले. यानंतर वर्ष २०१३ मध्ये गोव्यात पणजी येथे सर्वांत मोठा मेळावा घेण्यात आला. यामध्ये गोव्यातील साडेचार सहस्र गोप्रेमी सहभागी झाले होते. या मेळाव्याला (कै.) आचार्य धमेंद्रजी आणि पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
४. सूड उगवण्यासाठी २ वेळा खाटिकांनी केले जीवघेणे आक्रमण !
गोवंशियांच्या रक्षणाचे कार्य चालू झाल्यानंतर माझ्यावर वर्ष २०१३ आणि वर्ष २०१४ मध्ये असे २ वेळा खाटिकांचे आक्रमण झाले. नाणूस, वाळपई येथे एकदा आणि बेळगाव येथून गोव्यात येतांना चोर्लाघाट येथे मी अन् ‘अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्रा’चे कर्मचारी यांच्यावर जीवघेणे आक्रमण करण्यात आले. सूड उगवण्यासाठी ही आक्रमणे करण्यात आली. दुर्दैव म्हणजे ही आक्रमणे कुणी केली ?, याचा छडा गोवा पोलीस अजूनपर्यंत लावू शकलेले नाहीत. असे होणे, हा आम्हा गोरक्षकांवर झालेला अन्याय आहे. विशेष म्हणजे नाणूस येथे पोलिसांच्या समक्ष आमच्यावर आक्रमण करण्यात येऊनही पोलीस या प्रकरणी सत्य उजेडात आणू शकलेले नाही. गोवंशियांच्या हत्या रोखण्याचे पवित्र कार्य करत असूनही आम्हाला या प्रकरणी न्यायालयात आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्यात आले. यानंतर नाणूस येथील आमच्या विरोधात प्रविष्ट झालेले प्रकरण मागे घेण्यात आले.

५. अखिल भारतीय हिंदु अधिवेशनातून करण्यात आली मागणी ‘देशस्तरावर गोवंश हत्या बंदी कायदा करा !’
गोव्यातील हिंदु समाज अजूनही झोपलेला आहे. गोव्यातील प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ पक्ष आणि संघटना यांची ध्येयधोरणे निरनिराळी असल्याने गोरक्षणाच्या कार्याकडे आज दुर्लक्ष झालेले आहे. ‘सर्वांनी गोवंश रक्षणासाठी संघटित होणे आणि देशस्तरावर गोवंश हत्या बंदी कायदा होणे’, ही काळाची आवश्यकता आहे. हिंदु जनजागृती समितीने वर्ष २०१३ मध्ये रामनाथी, फोंडा, गोवा येथे आयोजित केलेल्या ‘अखिल भारतीय हिंदु अधिवेशना’त गोवंश रक्षणासाठी स्वतःचे जीवन समर्पित करणारे संत गोपाळगिरी महाराज यांची वंदनीय उपस्थिती होती. या वेळी अधिवेशनात गोवंश हत्या बंदीसाठी राष्ट्रीय स्तरावर कायदा करण्याची मागणी करण्यात आली. या वेळी मागणीला अनुसरून देहली येथे आंदोलन करण्यात आले. देहली येथील या आंदोलनात गोव्यातील ९६ गोप्रेमी सहभागी झाले होते; परंतु अद्यापही असा कायदा झालेला नाही. गोवंश रक्षणासाठी महाराष्ट्र, राजस्थान, उत्तरप्रदेश आदी ठिकाणी चांगले कायदे आहेत आणि अशाच स्वरूपाचा कायदा गोव्यातही झाला पाहिजे. गोवंशियांची हत्या करणार्याला आज ५० रुपये दंड आहे. हा कायदा कठोर करून हा दंड ५ लाख रुपये करावा आणि आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावावी.
६. गोरक्षक हनुमंत परब यांच्या प्रयत्नांमुळे गोवा सरकारने चालू केली गोशाळांना आर्थिक साहाय्य देणारी योजना !
यापूर्वी सांगितल्यानुसार वर्ष २०१३ मध्ये ‘गोवा मांस प्रकल्पा’तून वाचलेले ११३ गोवंश नंतर ‘अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्रा’त आणण्यात आले. या वेळी उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाच्या न्यायाधिशांनी मला ‘तुम्ही ११३ बैलांचे दायित्व स्वीकारता का ?’, असे विचारले. या वेळी बैलांच्या चारापाण्याच्या खर्चाची चर्चा झाली. ‘गोवा मांस प्रकल्पा’त बैलांना आणणार्या खाटिकांनी प्रति बैल प्रतिदिन १०० रुपये द्यावे’, असे न्यायालयाने सुचवले; मात्र खाटीक हा व्यय उचलण्यास सिद्ध नव्हते. यानंतर फोंडा येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने ‘बैलांच्या चारापाण्याचा व्यय गोवा सरकारने उचलावा’, असा आदेश दिला. या आदेशानंतर २ वर्षे पैसे मिळाले नाहीत. यामुळे गोशाळेला बैलांच्या चारापाण्यासाठी कर्ज काढावे लागले आणि हे कर्ज कालांतराने पुढे वाढत गेले.
वर्ष २०१६ मध्ये गोशाळांमधील गोवंशियांचे पालनपोषण करणे, गोशाळेचा इतर व्यय पुरवणे आणि गोव्यात आणखीन नवीन गोशाळा निर्माण व्हाव्यात, यासाठी गोशाळेला आर्थिक साहाय्य करणारी एक योजना सिद्ध करण्याचा प्रस्ताव मी सरकारमधील तत्कालीन पशूसंवर्धन मंत्री तथा गोवा विधानसभेचे विद्यमान सभापती रमेश तवडकर यांच्याकडे मांडला. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आणि याविषयी अनेक बैठका झाल्यानंतर वर्ष २०१८ मध्ये प्रत्येक गोवंशियाला प्रतिदिन ७५ रुपये खावडीचा खर्च (चारापाणी व्यय), अशी आर्थिक साहाय्य योजना सरकारने चालू केली. पुढे ‘अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्रा’त आयोजित एका कार्यक्रमात राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या हस्ते मंत्री रमेश तवडकर यांचा सत्कार करण्यात आला. वर्ष २०१९ मध्ये डॉ. प्रमोद सावंत यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर त्यांच्याकडे आर्थिक साहाय्य योजनेच्या अंतर्गत मिळणारा निधी वाढवण्याची मागणी करण्यात आली. यानंतर वर्ष २०२२ मध्ये आर्थिक साहाय्य वाढवून सर्व गोशाळांना प्रती गोवंश खावडीसाठी १५० रुपये व्यय सरकार देत आहे.
७. सरकारने चारा पुरवठा करणारे धोरण लागू करावे !
गोवा सरकारने गोशाळांसाठी चारा पुरवठा करणारे धोरण लागू केले पाहिजे. आज गोव्यात कर्नाटक आदी शेजारील राज्यांतून चारा आणावा लागतो. गोव्यात चारा पुरवठा धोरण लागू केल्यास शेतकरी चार्याचे उत्पादन करतील आणि त्यांनाही रोजगार मिळेल. परिणामी गोशाळांना चारा मिळेल.

८. ‘अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्र’ चालवते विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम
‘अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्रा’त मासिक अमावास्या कार्यक्रम होत असतो. यामध्ये गायत्री महायत्र, गायत्री चालीसा, गोपूजन, गोपालकृष्ण पूजन आणि नंतर प्रवचन, कीर्तन असे उपक्रम होत असतात. केंद्रात प्रतिवर्षी कृष्णजन्माष्टमी, गोपाळकाला, सप्त गोमाता मंदिर आणि ‘अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्र’ यांचे वर्धापनदिन कार्यक्रम आदी उपक्रम होत असतात, तसेच प्रतिमास कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील वैद्य सुविनिय दामले यांचे आयुर्वेदिक चिकीत्सा या ठिकाणी होत असते.
‘अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्रा’त गीर, श्वेतकपिला, खिल्लारी बैल आदी गोवंश, तसेच पंढरपुरी म्हशी आहेत. केंद्राच्या वतीने वाळपई, होंडा, साखळी आदी गोशाळेच्या आसपासच्या परिसरात दुधाचा पुरवठा केला जातो. केंद्रासाठी गोप्रेमी गोदान, केंद्राची दत्तक योजना किंवा अन्य उपक्रम यांद्वारे आर्थिक साहाय्य करून गोशाळेला साहाय्य करू शकतात.
९. गोसंवर्धन केंद्रात घायाळ झालेल्या गोवंशांसाठी चालवण्यात येते ‘हेल्पलाईन’ योजना !
‘अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्रा’मध्ये घायाळ झालेल्या गोवंशांना वैद्यकीय उपचार पुरवण्यासाठी ‘हेल्पलाईन’ योजना सत्तरी तालुक्यापुरती मर्यादित चालवली जाते. यासाठी इच्छुकांनी ७०८३६८४७५५ किंवा ८३०८५०४७५५ या भ्रमणभाष क्रमांकावर संपर्क करावा. आवश्यक साधनसुविधा आणि मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास ही योजना प्रारंभी उत्तर गोवा आणि नंतर राज्यभर चालू करण्याचा केंद्राचा विचार आहे.

१२. ‘अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्रा’त अनेक संत आणि मान्यवर यांनी दिल्या भेटी !
‘अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्रा’त गोसेवेच्या कार्यात सक्रीय सहभाग असलेले पू. गोपाळ मणी महाराज, राजस्थान येथील गोऋषि दत्त शरणानंदजी महाराज, शिवकृपानंद स्वामी, गोव्यातील श्रीक्षेत्र तपोभूमी येथील पिठाधीश पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी आदी संतांचा चरणस्पर्श झालेला आहे. यासह गोव्याच्या तत्कालीन राज्यपाल मृदूला सिन्हा यांनी २ वेळा गोशाळेला भेट दिली आहे. योगऋषी रामदेवबाबा यांच्या हस्ते गोशाळेतील गायी मयेत येथील शेतकर्यांना सुपुर्द करण्यात आल्या आहेत. उत्तर गोव्याचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोव्यातील पशूसंवर्धनवर्धन खात्याचे मंत्री नीलकंठ हळर्णकर आदी मान्यवरांनी गोशाळेला भेटी दिल्या आहेत.
मी गेले १८ वर्षे गोसेवेत अविरतपणे कार्यरत आहे. ‘अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्र’ या ट्रस्टचा अध्यक्ष या नात्याने मी वर्ष २००८ पासून हे कार्य पहात आहे. भगवान श्रीकृष्ण आणि प्रभु श्रीराम यांच्या कृपेनेच हे कार्य चालू आहे आणि कर्ताकरविता तोच आहे. ही गोशाळा चालवतांना अनेक अडीअडचणी आल्या; मात्र त्यावर भगवंतानेच वेळोवेळी मात केली.
– श्री. हनुमंत परब, वाळपई, गोवा.
गायीच्या समाधीवर भगवान श्रीकृष्णाची मूर्ती विराजमान असलेले ‘सप्त गोमाता मंदिर’ हे देशातील पहिले मंदिर !
वर्ष २००८ मध्ये वाळपई येथे अवैधरित्या गोवंशियांची हत्या करण्यात येत होती. तेथे गेल्यावर एका गायीला मारण्यात आले, तर एका गायीला वाचवण्यात आम्हाला यश आले होते. या वेळी ज्या गायीची हत्या झाली, तिच्यावर धनगर समाजातील साखरू शेळके यांचा उदरनिर्वाह चालत होता. यामुळे तिची स्थिती बिकट झाली. या वेळी सर्व गोप्रेमींनी ७ सहस्र रुपये गोळा करून साखरू शेळके यांना मोबादला म्हणून दिले, तर जी वाचलेली गाय होती, तिला साक्ष म्हणून वारंवार न्यायालयाच्या दारी न्यावे लागत होते. यामुळे या गायीच्या मालकाला आम्ही गोप्रेमींनी मोबदला म्हणून पैसे दिले. ही गाय कालांतराने वर्ष २०१७ मध्ये मृत पावली. यानंतर गायीची ‘अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्रा’त समाधी बांधण्यात येऊन त्यावर भगवान श्रीकृष्णाची मूर्ती असलेले ‘सप्त गोमाता मंदिर’ उभारण्यात आले. वर्ष २०१९ मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आणि गोव्याच्या तत्कालीन राज्यपाल (दिवंगत) मृदुला सिन्हा यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री तथा गोवा विधानसभेचे तत्कालीन सभापती डॉ. प्रमोद सावंत यांची उपस्थिती होती. या वेळी तत्कालीन राज्यपाल मृदुला सिन्हा म्हणाल्या, ‘‘पशूवधगृहातून सोडवलेल्या गायीच्या समाधीवर भगवान श्रीकृष्णाची मूर्ती विराजमान असलेले ‘सप्त गोमाता मंदिर’ हे देशातील पहिले मंदिर होय.’’ ‘कामधेनु’, ‘नंदिनी’, ‘सुरभि’, ‘सुशीला’, ‘सुमन’, ‘नंदा’ आणि ‘धेनु’ या सप्त गोमातांसाठी या ठिकाणी जागा नेमलेली आहे. या मंदिरात सध्या ७ गायींचे पालनपोषण केले जाते. या ७ मधील एका गायीच्या पालनपोषणाचा व्यय गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे वडील श्री. पांडुरंग सावंत हे त्यांच्या पत्नीच्या नावाने करत आहेत. अशाच प्रकारे स्थानिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी येथील सप्तगायींच्या पालनपोषणाचा व्यय करत आहेत.