Toxic Soil Crisis : भूमीत विषारी धातूंमुळे जगभरातील १४० कोटी लोकांचे आरोग्य धोक्यात !

जगातील अनुमाने १४ ते १७ टक्के शेतीयोग्य भूमी अधिक प्रदूषित झाल्याची माहिती

वॉशिंग्टन – आर्सेनिक, कॅडमियम, कोबाल्ट, क्रोमियम, कॉपर, निकेल, शिसे आदी विषारी धातूंनी प्रदूषित झालेल्या भूमीत जगभरात अनुमाने १४० कोटी लोक वास्तव्य करत आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, अशी माहिती ‘सायन्स’ मासिकात प्रकाशित झालेल्या एका अहवालात दिली आहे. या अभ्यासगटाचे नेतृत्व डेयी हो यांनी केले असून ते आणि त्यांचे सहकारी यांनी जगभरातील अनुमाने ८ लाख मातीच्या नमुन्यांचे विश्लेशण केले आहे. या अभ्यासानुसार, जगातील अनुमाने १४ ते १७ टक्के शेतीयोग्य भूमी, म्हणजेच अंदाजे २४२ दशलक्ष हेक्टर भूमी एका विशिष्ट विषारी धातूमुळे सुरक्षिततेच्या मर्यादेपेक्षा अधिक प्रदूषित असल्याचे दिसून आले आहे.

१. या भूमीतील प्रदूषणामुळे अन्नसुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्य धोक्यात येते. पीक उत्पादनात घट होते आणि अन्न साखळीत विषारी धातूंचा समावेश होतो. यामुळे मूत्रपिंडाचे विकार, कर्करोग, मज्जासंस्थेच्या वाढीच्या संदर्भातील समस्या उद्भवण्याचा धोका असतो.

२. कॅडमियम हा सर्वाधिक आढळणारा आणि धोकादायक असलेला धातू दक्षिण आणि पूर्व आशिया, मध्यपूर्व अन् आफ्रिकेतील भागांत मोठ्या प्रमाणात आढळतो.

३. तंत्रज्ञानासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या धातूंना वाढती मागणी असल्यामुळे मातीतील प्रदूषण भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे.

४. या अहवालानंतर अभ्यासकांनी पर्यावरणरक्षणाविषयी कठोर नियमावली, शाश्वत शेती पद्धत आणि जनजागृती मोहीम राबवण्याची मागणी केली आहे.

संपादकीय भूमिका

कुठे वर्षानुवर्षे पृथ्वी प्रदूषणमुक्त ठेवणारी हिंदु संस्कृती, तर कुठे अवघ्या १०० वर्षांत ती प्रदूषित करणारे आधुनिक विज्ञान !