परात्पर गुरुदेवांनी एका संतांना ‘साधनेत आलेली मरगळ आणि एकाच टप्प्याला रहाणे’, यांविषयी मार्गदर्शन केल्यावर त्यांचे झालेले चिंतन

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ब्रह्मोत्सवाच्या वेळी झालेल्या भेटीत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधनेच्या संदर्भात मार्गदर्शन करणे 

‘सप्तर्षींच्या आज्ञेनुसार वर्ष २०२३ च्या मे मासात परात्पर गुरु आठवले यांचा ‘ब्रह्मोत्सव’ साजरा झाला. त्या कालावधीत मी रामनाथी आश्रमात होते. त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांनी सर्व संतांची भेट घेतली. त्या वेळी मीही उपस्थित होते. साधनेसंदर्भात मार्गदर्शन करतांना त्यांनी मला गेल्या ६ वर्षांत माझ्या साधनेत आलेली मरगळ (सुस्तपणा) आणि पर्यायाने माझी साधनेत झालेली घसरण यांची स्पष्टपणे जाणीव करून दिली. त्यांचे शब्द रामबाणाप्रमाणे माझ्याभोवती असलेल्या दाट आवरणाला भेदून गेले. त्यांनी मला आत्मपरीक्षण करण्यासमवेत इतर समष्टी संतांकडून शिकण्यास सांगितले.

२. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘नेहमी शिकण्याच्या स्थितीत रहायला हवे’, असे सुचवून सावध करणे 

त्यानंतर परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्या डोळ्यांतील अश्रू पाहून ‘ते भावामुळे आले आहेत कि दुःखामुळे?’, असे विचारले. यातून त्यांनी मला ‘नेहमी शिकण्याच्या स्थितीत रहायला हवे’, असे सुचवून सावध केले. ‘भावजागृती झाल्यामुळे आलेले अश्रू थंड आणि हलके असतात आणि इतर वेळी ते उबदार असतात’ हे मला ठाऊक होते. आता आलेले अश्रू दुःख आणि पश्चात्ताप यांमुळे आले असल्याने ते उबदार होते.

३. साधनेकडे दुर्लक्ष होण्याच्या संदर्भात केलेले आत्मपरीक्षण

३ अ. सांसारिक कर्तव्यांत अधिक व्यस्त रहाणे : गेली काही वर्षे मी ‘नातेवाइकांच्या आरोग्यविषयक समस्या आणि माझ्या मुलींच्या प्रसूतींच्या कालावधीत त्यांची काळजी घेणे’ या सांसारिक कर्तव्यांत अधिक व्यस्त होते. त्यामुळे माझे साधनेकडे दुर्लक्ष झाले. आता केवळ गुरुमाऊलींच्या कृपेमुळे मी आत्मपरीक्षण करून माझ्या साधनेच्या अधोगतीला कारणीभूत असलेल्या सूत्रांचे लिखाण करून देऊ शकले.

३ आ. साधनेवर लक्ष केंद्रित केल्यानेच ‘देव साधना आणि संसार या दोन्हींची काळजी घेतो’ हे लक्षात न येणे : मी देव आणि गुरु यांच्याप्रती असलेल्या माझ्या कर्तव्यांवर अधिक लक्ष केंद्रित करायचे. तेव्हा माझी सांसारिक कर्तव्येही अतिशय चांगल्या प्रकारे आणि सुरळीतपणे पार पडली; परंतु जेव्हा मी माझ्या सांसारिक कर्तव्यांवर अधिक लक्ष केंद्रित करू लागले, तेव्हा या दोन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे घडत नाहीत, विशेषतः ‘माझी साधना चांगली होत नाही’, असे माझ्या लक्षात आले.

३ इ. सत्सेवा न केल्याने त्यातून मिळणार्‍या आनंदाला मुकणे : पूर्वी मी संपर्कासाठी बाहेर गेल्यावर पुष्कळ आनंद अनुभवत असे आणि त्या सेवेत मला पुष्कळ शिकायलाही मिळत असे. अलीकडे मी धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांना वैयक्तिकरित्या भेटण्याचा प्रयत्न न केल्यामुळे माझा शिकण्याचा भाग झाला नाही आणि त्यामुळे मी आनंदाला मुकले.

३ ई. शरणागतीच्या अभावामुळे चेहर्‍यावर तणाव दिसणे : मला यजमानांच्या आरोग्याची काळजी वाटायची. त्यामुळे माझ्या चेहर्‍यावर तणाव होता. या कालावधीत मी माझी शरणागती आणि आध्यात्मिक उपाय यांचे प्रमाण वाढवून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला नाही.

३ उ. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया व्यवस्थित न राबवल्याने स्वभावदोष उफाळून येणे : माझ्यातील ‘अपेक्षा करणे’ या दोषामुळे काही वेळा मला मुलींविषयी तीव्र प्रतिक्रिया आल्या. माझी साधना योग्यरित्या होत नाही, हे माझ्या मुलीने  लक्षात आणून दिल्यावर मला ते स्वीकारता आले नाही आणि राग आला. अंतर्मुख होऊन विचार केल्यावर माझी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया व्यवस्थित होत नसल्याची मला जाणीव झाली.

३ ऊ. मायेतील विचारांमुळे नामजप एकाग्रतेने न होणे : माझे मन मायेतील अनेक विचारांनी भरलेले असल्याने माझा नामजपही नीट होत नव्हता. परिणामी मन अशांत असायचे. झोपेत कधीकधी मला निरर्थक स्वप्ने पडायची. त्यामुळे जाग आल्यावर उत्साह वाटत नसे.

३ ए. मी सत्संगांना नियमितपणे उपस्थित राहू न शकल्याने त्यांतून मिळणार्‍या चैतन्याला मुकले.

३ ऐ. प्रसारातील अडथळ्यांविषयी मार्गदर्शन न घेतल्याने साधनेच्या एकाच टप्प्यावर अडकून रहाणे : मी वेळोवेळी प्रसाराचा आढावा दिला नाही किंवा प्रसार, अडथळे इत्यादींविषयी आश्रमातून मार्गदर्शनही घेतले नाही. त्यामुळे मला कोणत्याही उपाययोजना मिळू शकल्या नाहीत आणि मी माझ्या साधनेच्या एकाच टप्प्यावर अडकून राहिले. (पठारावस्था  आली.) त्यातून मला बाहेर पडता आले नाही.

३ ओ. पूर्वी सत्सेवा करतांना मला पुष्कळ आध्यात्मिक ऊर्जा मिळायची; परंतु आता माझी सत्सेवा एकाग्रतेने होत नसल्याने मला त्वरित थकवा येऊन झोप येते. 

३ औ. आश्रमात राहून सेवा केल्याने शुद्धी होऊन नवीन ऊर्जा मिळणे, याउलट घरी राहून सेवा केल्यावर तसे न होणे : पूर्वी मी सेवा चालू असतांना आठवडाभर आश्रमात रहायचे. त्या काळात मी बर्‍याच अंशी माझी आध्यात्मिकदृष्टया शुद्धी झाल्याचे अनुभवून नवीन ऊर्जेसह घरी परतत असे; परंतु कोरोना महामारीमुळे आणि अन्य काही कारणांमुळे मी घरीच ही सेवा ऑनलाईन संगणकप्रणालीच्या माध्यमातून करत आहे.

४. गुरुदेवांच्या कृपेने श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा लेख दृष्टीस  पडणे आणि त्यातील लिखाण वाचून ‘हा लेख केवळ माझ्याचसाठी लिहिला आहे’, असे वाटणे 

धर्माभिमानींना वाचायला देण्यासा‌ठी इंग्रजी संकेतस्थळावरचे काही लेख स्थानिक भाषेत अनुवादित करावे लागतात. त्यासाठी मी लेख शोधत होते. त्या वेळी प.पू. गुरुदेवांच्या कृपेने मला श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा सर्व आध्यात्मिक स्तरावरील साधकांना मार्गदर्शन करणारा लेख दृष्टीस पडला. या लेखात त्यांनी विशेषतः ६०‌‌ टक्क्यांच्या पुढील आध्यात्मिक स्तरावरील साधकांना त्यांच्याही नकळत साधनेमध्ये येणार्‍या अडचणींविषयी सावधगिरी बाळगण्याची सूचना केली होती. ‘हा लेख केवळ माझ्याचसाठी लिहिला आहे’, असे मला वाटले. ‘आम्हा सर्व साधकांसाठी हे मार्गदर्शन किती आवश्यक आहे !’, हे मला जाणवले; म्हणून मी सर्वांना उपयोग होईल म्हणून त्याचे भाषांतर केले.

५. प्रार्थना 

ही सूत्रे लिहिल्यानंतर मला हलके आणि ताजेतवाने वाटत आहे. ‘माझ्या डोक्यावरून मोठे ओझे उतरले आहे’, असे मला वाटते. ‘हे परमेश्वरा, मी केलेल्या सर्व चुकांसाठी तू ‌क्षमा करावीस, यासाठी मी तुझ्यापुढे नतमस्तक होत आहे. तुझे रूप आणि तुझे शब्द सदैव माझ्या स्मरणात राहू दे आणि तुला अपेक्षित अशी व्यष्टी आणि समष्टी साधना करण्याचा माझा प्रयत्न वाढवण्यासाठी मला शक्ती आणि चैतन्य मिळू दे.’

– एक संत (१९.५.२०२३)