राज्यात ८००, तर पुण्यात ५१ शाळा अनधिकृत !

पुणे – राज्यातील ८०० शाळा बोगस (विनाअनुमती) असल्याचे उघड झाले आहे. त्यांतील १०० शाळांना कायमचे टाळे लावण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील शिक्षण विभागाने पुणे महानगरपालिका आणि जिल्हा कार्यक्षेत्रातील ५१ शाळांवर बंदीची कारवाई केली आहे; परंतु पुणे जिल्ह्यात १०० हून अधिक बोगस शाळा असाव्यात, असे शिक्षण क्षेत्रांतील जाणकारांचे अनुमान आहे. यामुळे पालकांनी स्वत:च्या पाल्यांना शाळेत प्रवेश घेतांना विचार करायला हवा. शाळा संस्थाचालकांच्या विज्ञापनांना भुलून नये. शासनमान्य शाळांमध्येच प्रवेश घ्यावा, असे शिक्षण विभागाने म्हटले आहे.

राज्यात अनधिकृतपणे चालू असणार्‍या १ सहस्र ३०० शाळांची पडताळणी शिक्षण विभागाने चालू केली. प्रारंभी ८०० हून अधिक शाळांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. पुणे जिल्ह्यात ५१ शाळा आढळल्या आहेत. आणखी काही अनधिकृत शाळा जिल्ह्यात असण्याची शक्यता आहे. पालकांनी शाळेमध्ये प्रवेश घेतांना ‘यू.आय.डी. पोर्टल’वर (युनिक आयडेंटिफायर) जाऊन शाळेचा नोंदणी क्रमांक पडताळून पहावा. त्यामुळे शाळा शासनमान्य आहे किंवा नाही ?, याची माहिती मिळते, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. शालेय शिक्षण आयुक्तांनी राज्यात चालू असलेल्या सर्व अनधिकृत शाळा बंद करून त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश यापूर्वीच दिला आहे.

संपादकीय भूमिका

हे प्रशासनाला लज्जास्पद ! अशाने विद्यार्थ्यांची होणारी शैक्षणिक हानी कोण भरून काढणार ? या गुन्ह्यासाठी सरकारने संबंधित दोषींना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे, तरच असे कृत्य पुन्हा कुणी धजावणार नाही !