साधकांनो, आध्यात्मिक त्रासांची तीव्रता वाढल्यामुळे आध्यात्मिक उपाय नियमित करण्यासह व्यष्टी साधनाही वाढवा !

‘सध्या सर्वत्र आध्यात्मिक त्रासाची तीव्रता पुष्कळ वाढली असून साधकांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक अडचणींतही वाढ झाली आहे. काही साधकांच्या मनात नकारात्मक विचार येत असून व्यष्टी साधनेविषयी उदासीनता वाढत आहे. एकमेकांविषयी पूर्वग्रह, संशयीपणा, मनाची असंवेदनशीलता आणि नकारात्मकता वाढल्यामुळे साधकांना निराशा येऊन ‘साधना करायला नको, व्यवहारातील गोष्टीच, म्हणजे शिक्षण, नोकरी, व्यवसाय करूया’, असे टोकाचे विचारही येत आहेत. त्यामुळे साधना करतांना छोट्या छोट्या चुका स्वीकारता न येणे, चुकांचा परिणाम मनावर अधिक काळ टिकून रहाणे आणि या सर्वांचा साधनेवर परिणाम होणे, अशी स्थिती काही साधकांची होत आहे. आध्यात्मिक त्रास नसणार्‍या काही साधकांच्या मनातही असे नकारात्मक विचार येत आहेत. 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा काळ समीप आल्याने त्याला विरोध करण्यासाठी वाईट शक्तींच्या आक्रमणांचे प्रमाण वाढणे

‘सध्याचा काळ अत्यंत प्रतिकूल आहे. असे असले, तरी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा काळ समीप आला आहे, तसेच मे मासात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ही होत आहे. या महोत्सवातून सनातन राष्ट्राच्या (हिंदु राष्ट्राच्या) स्थापनेचा शंखनादही होणार आहे. त्यामुळे या कार्याला विरोध करण्यासाठी वातावरणातील वाईट शक्तींच्या सूक्ष्मातील आक्रमणांचे प्रमाणही वाढले आहे.

वाईट शक्तींचे साधकांना त्रास देण्याचे नियोजन लक्षात घेऊन सर्व साधकांनी स्वत:ची साधना वाढवणे आवश्यक आहे. साधकांनी नामजपादी उपाय सांगणारे साधक किंवा संत यांना वेळोवेळी आध्यात्मिक उपाय विचारून करणे, उत्तरदायी साधकांकडून मार्गदर्शन घेत आपल्यासंदर्भात घडलेला एखादा प्रसंग त्यांना मोकळेपणाने सांगणे, देवाला आत्मनिवेदन करणे आदी प्रयत्न केले पाहिजेत. सध्या साधकांना होणारे बहुतांश त्रास हे वाईट शक्तींच्या त्रासांमुळे होत असले, तरी साधकांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया प्रामाणिकपणे नीट राबवणे आवश्यक आहे.

हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावर सर्वांचेच त्रास न्यून होणार असणे !

आताचा आपत्काळ आपल्याला अतिशय कठीण वाटतो; पण हा काळ संधीकाळही आहे. ‘या काळात साधनेचे थोडे जरी प्रयत्न केले, तरी त्याचे फळ अधिक प्रमाणात मिळते’, हे या संधीकाळाचे महत्त्व आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावर सगळ्यांचे त्रास न्यून होणार आहेत आणि त्यामुळे सगळे आनंदी होतील. त्या वेळी सगळ्यांची आध्यात्मिक प्रगती लवकर होईल. त्यामुळे साधकांनी निराश न होता साधनेचे प्रयत्न तळमळीने करणे आवश्यक आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.