Bangladesh Hindu Leader Kidnapped N Murdered : बांगलादेशात हिंदु नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या

बांगलादेशात भाबेश चंद्र यांची अपहरण करून त्यांची हत्या

ढाका (बांगलादेश) : बांगलादेशातील दिनाजपूरमध्ये भाबेश चंद्र या हिंदु नेत्याचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. भाबेश चंद्र बिरल उपजिल्ह्यातील हिंदूंचे एक प्रमुख नेते होते आणि त्यांनी बांगलादेश पूजा उत्सव परिषदेच्या बिरल शाखेचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केले होते.

१. चंद्रा यांच्या पत्नी शांतना रॉय म्हणाल्या की, १७ एप्रिल या दिवशी २ मोटारसायकलींवर ४ जण आले आणि त्यांनी भाबेश यांचे घरातून अपहरण केले. त्यांनी भाबेश यांना नाराबारी गावात नेले आणि तेथे त्यांना अमानुष मारहाण करून बेशुद्धावस्थेत  पुन्हा घरी आणून सोडले. भाबेश यांना तात्काळ रुग्णालयात भरती करण्यात आल्यावर त्यांना तेथे मृत घोषित करण्यात आले.

२. बिरल पोलीस ठाण्याचे प्रमुख अधिकारी म्हणाले की, पोलीस या घटनेत सहभागी असलेल्या संशयितांची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचे काम करत आहेत आणि गुन्हा नोंदवण्याची सिद्धता चालू आहे.

मागील मासात बांगलादेशात हिंदूंची घरे आणि मंदिरे यांवरील आक्रमणाच्या १४७ घटना

ढाका येथील मानवाधिकार संघटना ‘ऐन ओ सलीश केंद्र’च्या गेल्या मासातील एका अहवालात असे म्हटले होते की, बांगलादेशात हिंदूंची घरे, मंदिरे आणि व्यावसायिक प्रतिष्ठान यांची तोडफोड करण्याच्या एकूण १४७ घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये अनुमाने ४०८ घरांची तोडफोड करण्यात आली, ज्यात ३६ जाळपोळीच्या घटनांचा समावेश आहे. याखेरीज अल्पसंख्यांकांच्या मालकीच्या व्यावसायिक प्रतिष्ठानांची तोडफोड करण्याच्या ११३ घटना, तसेच अहमदिया पंथाच्या मशिदींवरील आक्रमणांच्या ३२ घटना घडल्याचे वृत्त आहे.

बांगलादेशाने अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित करावे ! – भारत

हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांविषयी भारताने आधीच बांगलादेशाला सुनावले होते. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, इतरांवर टीका करण्याऐवजी बांगलादेशाने स्वतःच्या देशातील अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित करावे. बांगलादेशात अल्पसंख्यांकांवर अत्याचार करणारे लोक मुक्तपणे फिरत आहेत, ही अत्यंत चिंतेची गोष्ट आहे. (असे सांगून बांगलादेशावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. भारताने बांगलादेशाला समजेल अशा भाषेत सांगितले पाहिजे आणि हिंदूंचे रक्षण केले पाहिजे ! भारताच्या जागी इस्रायल असता, तर तसे केव्हाच झाले असते, याचा विचार करायला हवा ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • बांगलादेशात हिंदूंचा वंशसंहार होणारच असल्याने अशा घटना नेहमीच्याच असणार आहेत आणि त्यावर जगभरातील हिंदु,  त्यांच्या संघटना, सरकारी यंत्रणाही अशाच निष्क्रीय रहाणार आहेत !
  • भारतातील अल्पसंख्यांकांवरील कथित अन्यायाविरुद्ध हिंदूंना सदैव दोषी ठरवणारा आंतरतराष्ट्रीय मानवाधिकार आयोग बांगलादेशातील हिंदूंचा होणारा वंशविच्छेद न दिसायला आंधळा आहे का ? भारताने याविषयी मानवाधिकार आयोगालाही खडसावयला हवे !