रासायनिक खते टाळा आणि नैसर्गिक शेतीचा अवलंब करा ! – कृषी विभागाचे आवाहन


सावंतवाडी
– शेती उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे भूमीची सुपीकता नष्ट होते, तसेच आरोग्याच्या दृष्टीने अनेक आजारांना निमंत्रण देण्यासारखेच आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करून मातीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी रासायनिक खते, कीटकनाशके यांचा होणारा अमर्याद वापर अल्प करावा. नैसर्गिक शेती लाभदायक असून शेतकर्‍यांनी तिचा स्वीकार करावा, असे आवाहन बांदा मंडळ कृषी अधिकारी वाय.जे. भुईंबर यांनी केले.
राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाच्या अंतर्गत कोनशी येथे आयोजित कार्यक्रमात भुईंबर बोलत होते. या वेळी कोनशी सरपंच साधना शेटये, तालुका तंत्र अधिकारी प्रकाश पाटील, कृषी पर्यवेक्षक मनाली परब, कृषी साहाय्यक पूनम देसाई यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

आरोग्याच्या दृष्टीने नैसर्गिक शेती हे वरदान असून सर्वांना सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळावे, यासाठी नैसर्गिक शेती पद्धतीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यत आल्याचे या वेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन मनाली परब, तर आभार पूनम देसाई यांनी मानले.

संपादकीय भूमिका

भारत कृषीप्रधान देश असल्यामुळे हानीकारक रासायनिक खते टाळून शेतकर्‍यांना पारंपरिक नैसर्गिक शेती करण्याकडे वळवण्यासाठी सरकारी यंत्रणेने  युद्धस्तरावर प्रयत्न करणे आवश्यक आहे !