थोडक्यात महत्त्वाचे (१९.०४.२०२५)

चिमुकलीचा जीव घेणारा बिबट्या जेरबंद

जळगाव – येथील डांभुर्णी शिवारातील शेतात वास्तव्य करणार्‍या मेंढपाळ कुटुंबातील २ वर्षीय रत्नाचा बिबट्याच्या आक्रमणात मृत्यू झाला होता. माहिती मिळाल्यानंतर २४ घंट्यांच्या आत वनविभागाने नरभक्षक बिबट्याला पिंजरे लावून जेरबंद केले.


२० सहस्र रुपयांची लाच मागणारा हवालदार कह्यात !

प्रतिकात्मक छायाचित्र

ठाणे – येथील शीळ डायघर पोलीस ठाण्यात आलेले प्रकरण मिटवण्यासाठी २० सहस्र रुपयांची लाच मागणार्‍या पोलीस हवालदार गणेश राठोड यांना त्याच्या सहकार्‍यासह ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कह्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका : लाचखोरांचा भरणा असलेला पोलीस विभाग !


भिवंडीत ४ दिवसांत ६ अल्पवयीनांचे अपहरण

भिवंडी – येथे गेल्या ४ दिवसांत ५ अल्पवयीन मुलींसह एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करण्यात आले. यामुळे पालक भयभीत आणि चिंताग्रस्त आहेत. अपहरण प्रकरणी भिवंडी येथील पोलीस ठाण्यांत तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. ‘बेपत्ता मुलांना लवकरात लवकर शोधून सुखरूप परत आणावे आणि अपहरणांच्या घटनांवर नियंत्रण आणावे’, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (अशी मागणी करण्याची वेळ येणे दुर्दैवी ! – संपादक)

संपादकीय भूमिका : असुरक्षित भिवंडी शहर !


अधिवक्ता सदावर्ते यांची राज ठाकरे यांच्या विरोधात तक्रार

मुंबई – अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात १८ एप्रिल या दिवशी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. राज्यात इयत्ता १ लीपासून हिंदी भाषा विषय अनिवार्य केल्याप्रकरणी कार्यकर्त्यांना भडकावले; म्हणून अधिवक्ता सदावर्ते यांनी ही तक्रार केली आहे. ‘राज ठाकरे यांना अटक करावी’, अशी मागणी अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांनी  केली  आहे .