गोविज्ञान आणि गोसंवर्धन संस्थेचे विशेष पोलीस महानिरीक्षकांना निवेदन

सांगली – सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर येथील सचिन निवास साळुंखे याच्यावर गोतस्करी आणि चोरीचे ३० हून अधिक गुन्हे नोंद असल्याने त्याला ‘मकोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) लावावा, अशा मागणीचे निवेदन गोविज्ञान आणि गोसंवर्धन संस्थेने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांना दिले आहे. हेच निवेदन सांगलीतील पोलीस अधीक्षकांनाही देण्यात आले आहे.
या संदर्भात पत्रकारांना माहिती देतांना संस्थेचे अध्यक्ष मानद प्राणीकल्याण अधिकारी अंकुश गोडसे म्हणाले, ‘‘सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या ४ जिल्ह्यांतील अनेक गोरक्षकांनी संबंधित व्यक्तीविरोधात गोतस्करी प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंद केले आहेत. या व्यक्तीची अनेक वर्षांपासून गोतस्करांची मोठी टोळी कराड, ईश्वरपूर, शिराळा, पेठवडगाव भागात कार्यरत आहे. महाराष्ट्र शासनाने देशी गायीला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वारंवार प्राणी कायद्याचे उल्लंघन करणार्यांवर मकोका लावणार, तसेच प्राणी संरक्षण कायद्याची काटेकोर कार्यवाही करण्यात येईल, असे घोषित केले आहे. त्यादृष्टीने पश्चिम महाराष्ट्रातील गोरक्षक संघटनेने सर्व गुन्हे एकत्र करून त्यांचा संच करून तो विशेष पोलीस महानिरीक्षकांना दिला आहे.
या मागणीला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी, ‘पीपल फॉर ॲनिमल’, बजरंग दल, अखिल भारत कृषी गोसेवा संघ, दक्षिण भारत जैन सभा, जैनाचार्य विद्यासागर जीवदया संस्था, पांजरपोळ सांगली, पंचगव्य चिकित्सक संस्था, गोरक्षा सामाजिक संस्था पुणे, गोरक्षा दल महाराष्ट्र यांसह अनेक संघटना, विविध गोप्रेमी यांनी समर्थन दिले आहे.
संपादकीय भूमिकाअसे निवेदन का द्यावे लागते ? पोलीस स्वतःहून कृती का करत नाहीत ! |