Dr.Dabholkar’s Anti Hindu Agenda : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा अंधश्रद्धेविरुद्धचा लढा केवळ हिंदूंच्या विरोधात होता ! – रणजित सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

सातारा येथे निरपराध हिंदूंवरील अन्यायाला वाचा फोडणार्‍या ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला !

‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचे प्रकाशन करतांना (डावीकडून) श्री. रणजित सावरकर, अधिवक्ता संजीव पुनाळेकर, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, श्री. सुनील घनवट आणि श्री. विक्रम भावे

सातारा, १८ एप्रिल (वार्ता.) – आज ‘सभ्य’ हा शब्द ‘षंढ’ बनला आहे. बंगाल, कर्नाटक येथे हिंदु असणे गुन्हा ठरत आहे. भारतात न्यायव्यवस्था आणि प्रशासनवर्ग ब्रिटिशांनी स्थापन केला आहे. डॉ. दाभोलकर यांचा अंधश्रद्धेविरुद्धचा लढा केवळ हिंदूंच्या विरोधात होता. हिंदु समाज षंढ झाला आहे. भारतात आज प्रत्येक शहरात ‘मिनी पाकिस्तान’ निर्माण झाले आहेत. बांगलादेशींनी घुसखोरी केली आहे. बंगालमध्ये याच लोकांनी हिंदूंंच्या हत्या केल्या आहेत. हिंदूंनी आज संघटित होणे आवश्यक आहे. हिंदूंनी मुसलमानांच्या ऐवजी हिंदु विक्रेत्यांकडूनच माल खरेदी करावा. अधिवक्ता संजीव पुनाळेकर हे डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा खटला लढत असतांनाच त्यांनाच अटक केली जाते. याविषयी न्यायालयातून कधीही उत्तर मिळणार नाही.

डॉ. दाभोलकर प्रकरणात १० वर्षे कारागृहात ठेवल्यानंतर आरोपींची निर्दाेष मुक्तता होते. यामध्ये आरोपींचे आयुष्य वाया जाते, यावर कुणीच काही बोलत नाही, असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांनी केले. एका निरपराध हिंदूवरील अन्यायाला वाचा फोडणारे, तसेच सत्य, संघर्ष आणि सत्तेची खेळी यामागील काळे वास्तव उलगडणार्‍या ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सातारा येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात १८ एप्रिल या दिवशी पार पडला. त्या वेळी मनोगत व्यक्त करतांना ते बोलत होते. सातारा येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी हा सोहळा आयोजित केला होता.

श्री. रणजित सावरकर

श्री. रणजित सावरकर, ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचे लेखक श्री. विक्रम भावे, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर, तसेच हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला ३००हून अधिक राष्ट्र आणि धर्मप्रेमी उपस्थित होते.

‘सीबीआय’च्या अधिकार्‍यांनी माझे आणि अधिवक्ता पुनाळेकर यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला ! – विक्रम भावे, ‘दाभोलकर हत्या आणि मी’ पुस्तकाचे लेखक

श्री. विक्रम भावे

अंनिसचे तत्कालीन कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) मला आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अन् अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना विनाकारण गोवून आम्हा दोघांचा तीव्र मानसिक छळ आणि खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. मी १०-११ दिवस ‘सीबीआय’च्या कोठडीत असतांना मला त्या कालावधीत मारहाणीची आणि कधी माझी बायको अन् मुलगी यांच्यावर बलात्कार करण्याची धमकीही देण्यात आली, तसेच माझ्या गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) शिव्या देण्यात आल्या. असे अनेक प्रकार ‘सीबीआय’चे तत्कालीन अन्वेषण अधिकारी सुभाष रामरूप सिंह यांनी करून पाहिले; पण ‘मी त्यांच्या मताशी सहमत होत नाही’, ‘अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या विरोधात साक्ष देत नाही’, हे त्यांच्या लक्षात आले. मग त्यांच्याकडून धडधडीत खोटे पुरावे बनवण्याचे प्रकार चालू झाले. या खटल्याच्या अनुषंगाने तथाकथित पुराव्यांच्या नावाखाली ‘सीबीआय’ने आरोपपत्रात स्वतःच्या अब्रूच्या ज्या काही चिंध्या जोडल्या, त्या पहाता जर मृत व्यक्ती कुणी सामान्य असती, तर हा खटला उभाच राहू शकला नसता, हे लक्षात येईल. खटला चालणे ही लांबची गोष्ट झाली; पण मृत झालेले डॉ. दाभोलकर होते; म्हणून पोलिसांनी कुणालाही पकडले असले, तरी त्याला शिक्षा देणे भागच आहे, अशी कचखाऊ मानसिकता या व्यवस्थेची दिसते, असा घणाघात श्री. विक्रम भावे यांनी केला.

हिंदुविरोधी षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी कुणावरही विसंबून राहून चालणार नाही ! – श्री. विक्रम भावे

‘‘माझ्या अटकेपासून ते सुटकेपर्यंत मी अनेक अनुभव घेतले आहेत. या अनुभवांचे हे पुस्तक आहे. माझी वाचकांना विनंती आहे की, या पुस्तकाकडे ‘विक्रम भावे’, यांचे व्यक्तीगत अनुभव म्हणून पाहू नका, तर एका हिंदुत्वनिष्ठाचे प्रातिनिधिक अनुभव म्हणून पहा; कारण आम्ही ‘जात्यात’ होतो, त्या वेळी अजून कुणीतरी ‘सुपात’ असणारे आहेत. ते सुपातील जात्यात येतील, तेव्हा सुपात एक दिवस काहीच शिल्लक रहाणार नाही. ‘या देशात हिंदुत्वनिष्ठ असणे म्हणजे अपराध आहे कि काय ?’, असे वाटण्यासारखे असे माझे हे अनुभव आहेत. माझी वाचकांना विनंती आहे की, हे पुस्तक वाचून अवश्य जागृती करावी. हिंदुविरोधी षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी कुणावरही विसंबून राहून चालणार नाही, तर आपल्यालाच कष्ट घ्यावे लागणार आहेत.’’

सत्कार…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संपर्क प्रमुख श्री. अजित देशपांडे यांनी अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांचा सत्कार केला, तर हिंदुत्वनिष्ठ श्री. रमेश हलदीकर यांनी श्री. सुनील घनवट यांचा सत्कार केला. पुरोहित श्री. संकेत पुराणिक यांनी श्री. विक्रम भावे यांचा सत्कार केला. श्री. रणजित सावरकर यांचा सत्कार श्री. विक्रम भावे यांनी केला.

हिंदु महासभेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार

अधिवक्ता श्री. संजीवर पुनाळेकर यांचा सत्कार हिंदु महासभेचे अधिवक्ता श्री. सतीश खानविलकर यांनी, तर श्री. रणजित सावरकर यांचा सत्कार हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. दत्तात्रय सणस यांनी केला. हिंदु महासभेचे श्री. उमेश गांधी यांनी श्री. सुनील घनवट यांचा सत्कार केला. अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा सत्कार सत्कार पू. सोमनाथगिरी उपाख्य दादा महाराज कुंभार यांनी सत्कार केला.

हिंदुत्वासाठी तडजोड करणार्‍यांशी कोणतेही संबंध ठेवू नका ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर

अधिवक्ता संजीव पुनाळेकर

जेव्हा सत्तेला धक्के बसतात, तेव्हा प्रस्थापितांना त्रास होतो. महाराष्ट्रातील साखर, शिक्षण आणि सहकार सम्राटांनी बारामतीमधील सहस्रो कोटी रुपयांचे प्लॉट कवडीमोल भावाने सरकारकडून मिळवले आहेत; मात्र हिंदु विधीज्ञ परिषदेमुळे आज या सर्व जागांच्या बाहेर ही जागा शासनाकडून घेतल्याचे फलक लावावे लागले आहेत. आम्ही प्रामाणिकपणे हिंदुत्वासाठी लढत आहोत. त्यामुळे आम्हाला त्रास झाला; मात्र मालेगाव बॉंबस्फोटातील मुसलमानांच्या बाजूने लढलेले अधिवक्ता हे खासदार झाले. मला साहाय्यक म्हणून विक्रम भावे काम करत होते. त्यामुळेच त्यांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागले. आतंकवाद्यांच्या बाजूने लढणार्‍या अधिवक्त्यांना कधीही त्रास होत नाही; मात्र हिंदुत्वाच्या बाजूने लढणार्‍या अधिवक्तांना त्रास होतो. ईश्वर आमच्या पाठीशी आहे, शेवटी आमचाच विजय नक्की आहे. हिंदुत्वासाठी तडजोड करणार्‍यांशी कोणतेही संबंध ठेवू नका.

हिंदूंनो, संघटितपणे लढणार असाल, तर आम्ही तुमच्यासमवेत आहोत ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

आज हिंदुत्वासाठी सर्वांमध्ये अस्वस्थता आहे. श्री. रणजित सावरकर ‘ओम सर्टिफिकेशन’साठी प्रयत्न करत आहेत. जो हिंदु धर्माविषयी शांत आहे, तो षंढ आहे. कुठलाही दर्गा आणि मशीद येथे पोलीस जात नाहीत; मात्र या कार्यक्रमाला येथील पोलीस उपस्थित असतील. पोलीस आझाद मैदानामध्ये मार खातात. बंगालमध्ये पोलीस मार खात आहेत; मात्र त्यांना हिंदु आतंकवादी वाटत आहेत. विक्रम भावे यांच्या पायात सुख लोळण घेत आहे; मात्र त्यांनी हिंदुत्वासाठी जीवन वाहून घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रचंड त्रास होऊनही त्यांनी हिंदुत्वाचे कार्य नेटाने चालू ठेवले आहे. सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथे दंगल झाली. तेथील बरेचशा हिंदुत्वनिष्ठांना त्रास झाला. याचे शल्य मनात आहे. हिंदूंनो, तुम्ही जर संघटितपणे लढणार असाल, तर आम्ही तुमच्यासमवेत आहोत. अंनिसचे आर्थिक घोटाळे आम्ही बाहेर काढले. आज जर डॉ. नरेंद्र दाभोलकर जिवंत असते, तर आज ते नक्कीच कारागृहात खडी फोडायला गेले असते.

सर्व अन्वेषण यंत्रणांतील काही दुष्ट अधिकार्‍यांनी विक्रम भावे यांना मनस्ताप, आणि शारीरिक यातना दिल्या ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

श्री. सुनील घनवट म्हणाले की, श्री. विक्रम भावे यांचे हे पुस्तक एखादी कादंबरी किंवा कथा नसून एका भयाण वास्तवाचे वस्तूनिष्ठ दर्शन आहे. श्री. भावे हे वर्ष २००८ पासून वर्ष २०२२ पर्यंत किती विपरित आणि अन्यायकारक स्थितीला सामोरे गेले, याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. हे पुस्तक वाचल्यावर आपल्या लक्षात येईल की, आतंकवादविरोधी पथक (ए.टी.एस्.) असो, सीबीआय असो किंवा पुणे येथील विशेष अन्वेषण पथक (एस्.आय.टी) असो, सर्व अन्वेषण यंत्रणांतील काही दुष्ट अधिकार्‍यांनी निरपराध श्री. भावे यांना नाहक या प्रकरणात गुंतवून प्रचंड मनस्ताप आणि शारीरिक यातना दिल्या आहेत. हा इतिहास केवळ श्री. विक्रम भावे यांचा नसून ते ‘हिंदु आतंकवाद’ नावाच्या एका बागुलबुवाच्या बळी पडलेल्या निरपराध तरुणांचे प्रातिनिधिक आत्मचरित्र आहे. सनातन संस्थेच्या एक-दोन नव्हे, तर १० सहस्र निरपराध साधकांना चौकशांना सामोरे जावे लागले. अनेक महिलांना रात्री-अपरात्री चौकशीला बोलावण्यात आले. या कालावधीत मानवाधिकारांचे कशा प्रकारे हनन झाले, याची आपण कल्पनाही करू शकणार नाही.

क्षणचित्रे…

सोहळ्यास उपस्थित धर्मप्रेमी

१. सोहळा झाल्यानंतर अनेक धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांनी मान्यवरांना प्रश्न विचारून  त्यांचे शंकानिरसन करून घेतले.

२. हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनी विक्रम भावे यांच्या पाठीशी सर्व जण उभे रहाणार का ? असे आवाहन केल्यावर सर्वांनी हात उंच करून पाठीशी रहाणार असल्याचे सांगितले. ‘जयतु जयतु हिंदु राष्ट्र’ अशा घोषणा या वेळ देण्यात आल्या.

 लोकसभेची निवडणुकीनंतर विक्रम भावे आणि अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना लगेच अटक !

श्री. विक्रम भावे म्हणाले, ‘‘‘सीबीआय’च्या कार्यालयात मला २५ मे २०१९ या दिवशी बोलावण्यात आले. तेथे गेल्यावर हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर असल्याचे दिसून आले. साधारण दुपारी ४ वाजेपर्यंत आम्हाला कार्यालयात बसवून ठेवले. त्यानंतर मला दुपारी ४ वाजता ‘सीबीआय’चे तत्कालीन अन्वेषण अधिकारी सुभाष रामरूप सिंह म्हणाले, ‘आम्ही अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना अगोदरच अटक केली आहे. त्यांच्या विरोधात मी सांगत असलेला जबाब तू दिलास, तर मी तुला सोडतो. अन्यथा तुलाही अटक करतो’, असे म्हणून त्यांनी माझ्यासमोर २ कागद ठेवले. एका कागदावर त्यांना हवा असलेला जबाब होता आणि दुसरा कागद अटकेचा पंचनाम्याचा होता. त्यात लिहिले होते की, आमच्या हिंदु विधीज्ञ परिषदेच्या कार्यालयात २ जून २०१८ या दिवशी डॉ. दाभोलकर प्रकरणातील संशयित आरोपी शरद कळसकर आला होता. अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी त्याला शस्त्रे नष्ट करण्याचा समुपदेश दिला. तथापि हे धडधडीत खोटे होते, कारण शरद कळसकर यांना अटक झाल्यानंतर त्यांचा आणि अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचा संबंध आला होता, त्यापूर्वी संबंध आला नव्हता. त्यांनी कळसकर यांचे वकीलपत्र घेतले होते. त्यामुळे मी खोटी साक्ष द्यायला नकार दिला. त्यानंतर सुभाष रामरूप सिंह यांनी अटकेची प्रक्रिया चालू करून मला अटक केली. त्यामुळेच या प्रकरणात मी आरोपी बनलो ! ज्या जबाबाच्या आधारे मला आणि अधिवक्ता पुनाळेकर यांना अटक केली, तो जबाब २५ मे २०१९ या दिवशी आमच्या अटकेच्या साडेआठ महिन्यांच्या आधीचा आहे. या साडेआठ महिन्यांत सुभाष रामरूप सिंह हे मला आणि अधिवक्ता पुनाळेकर यांना न्यायालयात २५ वेळा भेटलेले आहेत. या साडेआठ महिन्यांत अधिवक्ता पुनाळेकर यांनी डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात संशयित आरोपी सचिन  अंदुरे आणि शरद कळसकर यांचे वकीलपत्र घेतले होते. ते त्यांच्यासाठी अधिवक्ता म्हणून न्यायालयात उभे राहिले होते. हे सुभाष रामरूप सिंह यांच्या समोर झाले होते. तेव्हा त्यांनी वकीलपत्राला आक्षेप घेतला नाही. साडेआठ महिन्यांत असे काय नेमके घडले की, आम्हाला अटक झाली ? २३ मे २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्याच्या दुसर्‍या दिवशी समन्स कसे काय निघते ? याच्या पाठीशी कोण आहे ? सुभाष रामरूप सिंह मला सांगतात की, तुझ्या पुनाळेकर यांना आयुष्यभर मी कारागृहात सडवीन. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असतांना ‘सीबीआय’च्या अधिकार्‍यांना हे धैर्य कोण देत होते ? हे सर्व आजपर्यंत अनुत्तरित प्रश्न आहेत आणि आम्ही याची उत्तरे शोधणार आहोत. ‘मला कोणत्या आधारे अटक केली आहे ?’, हे मी विचारले, तर सुभाष रामरूप सिंह म्हणाले की, शरद कळसकर याचा कबुलीजबाब आहे. त्याच्या आधारे तुला अटक केली आहे. हा कबुलीजबाब कर्नाटक राज्यातील दुसर्‍या खटल्यातील आहे. त्याच्या आधारे आम्ही तुला आणि अधिवक्ता पुनाळेकर यांना अटक करत आहे. मी म्हणालो की, तो आमच्या विरोधात पुरावा नाही, असे कायदा सांगतो. ज्याचा कबुलीजबाब आहे, तो त्याच्याच विरोधात वापरता येतो. शरद कळसकर यांनी न्यायालयाकडे तक्रार करून ‘हा कबुलीजबाब खोटा असून कोर्‍या कागदावर माझी स्वाक्षरी घेऊन सिद्ध केला आहे’, अशी तक्रार अगोदरच केलेली होती. मग साडेआठ महिने मला अटक करण्यास का लावले ? त्याच्यावर सुभाष रामरूप सिंह  म्हणाले की, तू कोण मला विचारणारा ? तुझ्या प्रश्नाला उत्तर देण्यास मी बांधील नाही. मी म्हणालो ठीक आहे. माझ्या प्रश्नाला उत्तर देण्यास बांधील नाही, तर मीही बांधील नाही. न्यायालयापुढे उपस्थित केल्यानंतर न्यायालय मला विचारेल, तेव्हा सुभाष रामरूप सिंह याचे उत्तर होते की, मला प्रश्न विचारणारे न्यायालय या देशात अजून जन्माला आलेले नाही. मी म्हणालो की, न्यायालय विचारेल तेव्हा हा काय वल्गना करतो ते पाहू. भारतातील सर्व न्यायालयांचा अधिक मान राखून मी विधान करतो की, दुर्दैवाने सुभाष रामरूप सिंह यांच्या वल्गना खर्‍या ठरल्या. माझ्या अटकेपासून ते निकालापर्यंत आणि निकालापासून आजच्या दिवसांपर्यंत खटला चालवणारे न्यायालय आणि ‘मॉनिटरिंग’ (नियंत्रण ठेवणारे) करणारे उच्च न्यायालय यांच्यापैकी कुणीही सुभाष रामरूप सिंह यांना हा प्रश्न आजपर्यंत विचारलेला नाही. १७० पानांच्या जबाबात एका अक्षरानेही न्यायालयाने याविषयी विचारणा केलेली नाही. ताशेरे ओढणे दूरची गोष्ट झाली.’’

संपादकीय भूमिका

बहुसंख्य हिंदूंच्या भारतात निरपराध हिंदूंना पोलिसांची छळवणूक आणि खोटे गुन्हे यांना सामोरे जावे लागणे दुर्दैवी !