संयुक्त पाकिस्तान असतांना बांगलादेशाच्या वाट्याचे ३६ सहस्र कोटी रुपयेही मागितले

ढाका (बांगलादेश) – पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये बांगलादेशातील नागरिकांवर केलेल्या अत्याचारांसाठी क्षमा मागावी, असे आवाहन बांगलादेशाने पाकिस्तानला केले आहे. यासह ‘आम्हाला आमच्या वाट्याचे पैसे द्यावेत’, अशीही मागणी बांगलादेशाने केली आहे.
१. १५ वर्षांनंतर १७ एप्रिल या दिवशी बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात ढाका येथे परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा झाली. या वेळी बांगलादेशाने म्हटले की, पाकिस्तानने वर्ष १९७१ च्या संयुक्त मालमत्तेतून बांगलादेशाला त्याचा वाटा, म्हणजे ४.३ अब्ज डॉलर्स (३६ सहस्र कोटी रुपये) द्यावेत. याच समवेत वर्ष १९७० मध्ये बांगलादेशाला (तत्कालीन पूर्व पाकिस्तान) चक्रीवादळात साहाय्य केल्याविषयी मिळालेले अनुमाने २ सहस्र ४०० कोटी टका (बांगलादेशी चलन) देखील द्यावे लागतील.
२. या वेळी बांगलादेशाने ढाका येथील छावण्यांमध्ये रहाणार्या ३ लाखांहून अधिक पाकिस्तानी नागरिकांना परत नेण्याचेविषयीचे सूत्र उपस्थित केले. बांगलादेशात त्यांना ‘बिहारी’ म्हणतात. ते मूळचे उर्दू भाषिक मुसलमान स्थलांतरित आहेत, जे वर्ष १९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर बिहार आणि उत्तरप्रदेश राज्यांतून पूर्व पाकिस्तान (बांगलादेश) मध्ये स्थायिक झाले. वर्ष १९७१ मधील बांगलादेश मुक्ती युद्धानंतर या लोकांनी पश्चिम पाकिस्तानशी निष्ठा दाखवली, ज्यामुळे त्यांना बांगलादेशामध्ये ‘पाकिस्तान समर्थक’ मानले गेले. त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आणि त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. बांगलादेशाच्या स्वातंत्र्यापासून लाखो मुसलमान छावण्यांमध्ये रहात आहेत आणि त्यांना पाकिस्तानने घेतलेले नाही किंवा बांगलादेशाने त्यांना पूर्ण नागरिकत्व दिलेले नाही.