‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने…
१८ एप्रिल या दिवशी सातारा येथे ‘मालेगाव स्फोटामागील अदृश्य हात’ या पुस्तकाचे लेखक, तसेच अंनिसचे डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणात निर्दाेष सुटलेले श्री. विक्रम भावे यांच्या ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. या पुस्तकातील ‘पुस्तक लेखनामागील माझी भूमिका’, याविषयीचे लिखाण आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.
१. पुणे येथील जिल्हा न्यायालयाने जामीन नाकारणे; पण मुंबई उच्च न्यायालयाने अटींसह जामीन देणे
२५ मे २०१९ या दिवशी सीबीआयचे अधिकारी सुभाष रामरूप सिंग यांनी नरेंद्र दाभोलकर हत्येच्या प्रकरणात मला अटक केली. त्यानंतर माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या आयुष्याने वेगळेच वळण घेतले. कुटुंबातील सर्वच सदस्य आतून हादरले होते. वरून मात्र ते एकमेकांना धीर देत होते. या प्रकरणात मला २ वर्षे कारावासात रहावे लागले. या काळात २ वेळा पुण्याच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने माझा जामिनाचा अर्ज फेटाळला. एकदा तर माझा जामीन अर्ज फेटाळतांना धडधडीत खोटे कारण दिले गेले. पुणे सत्र न्यायालयाच्या त्या निर्णयाविरोधात मी अधिवक्त्यांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात अपील केले. उच्च न्यायालयाने माझे अपील मान्य करून ५ मे २०२१ या दिवशी मला जामीन संमत केला आणि १३ मे २०२१ या दिवशी माझी कारागृहातून मुक्तता झाली. उच्च न्यायालयाने मला जामीन संमत करतांना अनेक अटी घातल्या होत्या. त्यांपैकी एक अट होती, ‘पुणे येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयातील दाभोलकर हत्येचा खटला संपेपर्यंत मी पुणे जिल्ह्याच्या बाहेर जाऊ नये.’ या अटीमुळे खटला संपेपर्यंत, म्हणजे पुढे ३ वर्षे मला पुण्यातच रहावे लागले.

२. जामिनाच्या अटींमुळे वडिलांच्या पार्थिवाला अग्नी देण्यास जाऊ न शकणे
मी कारागृहातून सुटल्यानंतर जेमतेम सव्वा महिना झाला असेल, तोच माझ्या वडिलांचे ‘कोविड’ महामारीमुळे निधन झाले. मृत्यूसमयी ते रत्नागिरी येथे होते. त्यामुळे पुढील विधी करण्यासाठी मला रत्नागिरी येथे जावे लागणार होते. त्यासाठी पुणे जिल्ह्याची सीमा ओलांडावी लागणार होती आणि त्यासाठी उच्च न्यायालयाची अनुमती घेणे आवश्यक होते. तशी ती मिळावी, यासाठी माझ्या अधिवक्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता; पण तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांची जामिनाची याचिका पुढे आल्याने आणि माननीय न्यायालयास ती अतीमहत्त्वाची वाटल्याने माझी याचिका मागे पडली. मी एकुलता एक मुलगा असूनही माझ्या वडिलांच्या पार्थिवाला अग्नी देऊ शकलो नाही. वडिलांचे शेवटचे प्रत्यक्ष दर्शनही मी घेऊ शकलो नाही. ‘व्हिडिओ कॉलद्वारे’ मी ते दर्शन घेऊ शकलो. त्यासाठी मी रत्नागिरी येथील माझे मित्र (कै.) संतोष आंग्रे यांचा नेहमीच ऋणी राहीन. ‘कोविड’ महामारीमुळे माझ्या वडिलांचा मृत्यू झाल्याने वडिलांचा मृतदेह नातेवाइकांच्या कह्यात देण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळे रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयातून वडिलांचे पार्थिव थेट स्मशानात नेण्यात आले. माझे मित्र (कै.) संतोष आंग्रे यांनी माझ्यासाठी स्मशानात जाऊन तेथील कर्मचार्यांच्या हाता-पाया पडून त्यांना विनंती केली आणि ‘बॉडी बॅग’ची ‘झीप’ थोडीशी उघडून (मृतदेह ठेवलेल्या पिशवीची चेन उघडून) मला माझ्या वडिलांचा चेहरा व्हिडिओ कॉलद्वारे दाखवला अन् अशा प्रकारे मी वडिलांचे शेवटचे दर्शन घेऊ शकलो.
त्या वेळी स्मशानात इतरही १०-१२ मृतदेह होते. त्यांच्यापैकी कुणाचेही कुटुंबीय तेथे नव्हते. अशा त्या १०-१२ बेवारस मृतदेहांपैकी एक माझ्या वडिलांचा मृतदेह आहे, हे मी व्हिडिओ कॉलद्वारे पहात होतो; पण मी काहीही करू शकत नव्हतो, याचे मला फार वैषम्य वाटत होते. वडिलांच्या पार्थिवाला बेवारस मृतदेहाप्रमाणे अग्नीही मिळू नये, यासाठी मी माझ्या वडिलांचे मित्र (कै.) हरिभाऊ दिवेकर यांना विनंती केली, ‘तेथील कर्मचार्यांना विनंती करून त्यांनी (कै. हरिभाऊ यांनीच) माझ्या वडिलांच्या पार्थिवाला अग्नी देता आला, तर पहावे.’ (कै.) हरिभाऊ यांनीही स्मशानातील कर्मचार्यांच्या हाता-पाया पडून तशी विनंती केली. स्मशानातील कर्मचार्यांनी (कै.) हरिभाऊ दिवेकर यांना ‘पीपीई कीट घालून अग्नी देऊ शकता’, असे सांगितले. त्याप्रमाणे (कै.) हरिभाऊ यांनी ‘पीपीई कीट’ घालून माझ्या वडिलांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. त्या परिस्थितीतही मला थोडेसे समाधान वाटले, ‘वडिलांच्या पार्थिवाला भडाग्नी तर भडाग्नी; पण आपल्या माणसाच्या हातून दिला गेला, हेही नसे थोडके.’ माझी आई त्या काळात आजारी होती. थोडाही प्रवास करणे तिला शक्य नव्हते. त्यामुळे वडिलांना रुग्णालयात नेतांना तिने त्यांना पाहिले तेच शेवटचे. (कै.) हरिभाऊ दिवेकर हे दिवसभर माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतरच्या कागदोपत्री आणि स्मशानातील सोपस्कारांत व्यग्र राहिल्यामुळे माझी आई घरी एकटीच होती. तिचे सांत्वन करणे किंवा तिला धीर देणे यांसाठी जवळचे किंवा घरातील असे कुणी तिच्या जवळ नव्हतेच; पण त्या दिवशी एक वेळचा आमटी-भात करून द्यायलाही तिच्या जवळ कुणीही नव्हते. पूर्ण दिवस आजारपणातही तिचा उपवास घडला. रात्री उशिरा घरी आल्यानंतर (कै.) हरिभाऊ दिवेकर यांनी थोडासा आमटी-भात केला आणि दोघे जेवले.
३. कुटुंबाची झालेली वाताहत आणि निर्दाेष मुक्तता
वडिलांच्या मृत्यूनंतरचे पुढील विधी करण्यासाठी न्यायालयाकडून अनुमती मिळण्यासाठी ३ आठवडे लागले. न्यायालयाची अनुमती मिळाल्यानंतर मी रत्नागिरी येथील माझ्या घरी गेलो आणि पुढील विधी पूर्ण करून पुन्हा पुण्यात आलो. पुढे खटला संपेपर्यंत माझी वृद्ध आई रत्नागिरी येथील घरी होती, पत्नी आणि मुलगी गोव्यात मुलीच्या शिक्षणासाठी होत्या अन् मी पुण्यात अडकून पडलो होतो. कुटुंबाची वाताहत झाली होती. आर्थिक गाडी रुळावरून घसरली होती. जे काही हातात होते; ते पुरवून पुरवून गुजराण करण्याविना पर्याय नव्हता. अशी ३ वर्षे गेली. शेवटी १० मे २०२४ या दिवशी खटल्याचा ‘निकाल’ लागला आणि न्यायालयाने माझी निर्दाेष मुक्तता केली.
‘हिंदु आणि हिंदुत्वनिष्ठ असणे, हा या देशात फार मोठा अपराध ठरत आहे का ?’, असा प्रश्न पडावा, असे हे सगळे होते. तसे असेल, तर माझा आणि माझ्या कुटुंबाचा हाच मोठा अपराध आहे की, आम्ही हिंदुत्वनिष्ठ आहोत. हिंदुत्वनिष्ठ असण्याची या देशात एवढी मोठी किंमत मोजावी लागते, याची मला आणि माझे कुटुंबीय यांना कल्पना नव्हती; पण अर्थातच त्यामुळे घाबरून जाणार्यातील आम्ही नव्हतो अन् नाही.
४. अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि अधिवक्ते यांच्याकडून निषेध अन् निदर्शने
याच काळात एक भयंकर वास्तवही मला प्रकर्षाने जाणवले. मला आणि अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना केलेल्या अन्याय्य अटकेच्या विरोधात समाजमाध्यमांत तीव्र प्रतिक्रिया उमटली. ‘महाभारत’ या हिंदी मालिकेत ‘भीष्म’ यांची भूमिका करणारे अभिनेते मुकेश खन्ना, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, मालेगाव बाँबस्फोटात गोवले गेलेले हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते श्री. समीर कुळकर्णी, बेकायदा मशिदी पाडण्यासाठी आणि भोंग्यांचा उपद्रव बंद करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात यशस्वी लढा दिलेले सामाजिक कार्यकर्ते श्री. शैलेंद्र दीक्षित, तसेच अनेक लोकप्रतिनिधी आणि काही पत्रकार / संपादक यांनी या अत्याचारी अटकेबद्दल यंत्रणांचा थेट निषेध केला. महाराष्ट्र, राजस्थान, देहली येथे अधिवक्त्यांनीही आंदोलने केली. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक येथे निदर्शने झाली; मात्र हिंदुत्वाच्या नावाने तोंडपूजेपणा करणार्या काही धुरिणांनी कचखाऊ भूमिका घेतली अन् या अटकेचा निषेधच काय; पण साधा उल्लेखही करणे कटाक्षाने टाळले. व्यवस्थेकडून काहीतरी पदरात पाडून घेण्याची अभिलाषा असलेल्या व्यक्ती व्यवस्थेला कोणत्याही प्रकारे दुखावू इच्छित नाहीत, हे त्यातून दिसून आले. ‘लोभी नोकर मालकालाच नव्हे, तर मालकाच्या कुत्र्यालाही सलाम करतो’, असेच वर्तन बर्याच नेत्यांचे आणि विचारवंतांचे झाले. त्यामुळे त्यांच्याविषयीचा माझ्या मनातील आदर नष्ट झाला.
५. लेखन करण्यामागील उद्देश
या एकंदर प्रकरणात ज्या पद्धतीने अन्वेषण केले आणि अनेक आरोपपत्रांतून अनेक विरोधाभासी कथा पेरण्यात आल्या, ‘शूटर्स’ची (बंदूक चालवणार्यांची) अनेक ‘व्हर्जन’ (नवनवीन नावे) त्यात देण्यात आली, हे सगळे जर एखाद्या सामान्य माणसाच्या हत्येच्या अन्वेषणाविषयी घडले असते, तर तो खटला उभाच राहू शकला नसता; मात्र केवळ ‘हत्या झालेला माणूस नरेंद्र दाभोलकर आहे’, म्हणून सीबीआयने कितीही घोळ घातले आणि कितीही ‘शूटर्स’ पकडून आणले, तरीही ‘कुणाला ना कुणाला तरी शिक्षा द्यावीच लागणार ना..’, अशी व्यवस्थेची कचखाऊ मानसिकता या सगळ्या प्रकरणात दिसून आली. हे सगळे प्रत्यक्ष पाहिल्यावर आणि भोगल्यानंतर ‘न्यायव्यवस्था १०० टक्के नि:पक्षपाती आहे, या गोष्टीवर यापुढे १०० टक्के विश्वास ठेवता येणार नाही’, असेच कुणीही म्हणेल असे वाटते. ‘दाभोलकरांच्या हत्येनंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उघड विधाने करून अन्वेषणाची दिशा ठरवणे इथपासून १० मे २०२४ या दिवशी पुण्याच्या न्यायालयाने या प्रकरणाचा ‘निकाल’ लावणे’, या २ घटनांमध्ये बर्याच गोष्टी घडल्या. त्यातील कित्येक गोष्टी समाजापर्यंत आल्याच नाहीत. त्या आपण आणल्या पाहिजेत, असे प्रकर्षाने वाटत होते. मी हिंदुत्वनिष्ठ आहे. त्यामुळे मी प्रकरणाच्या मुळाशी जाणार आणि सत्य समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करणार. अन्यथा मी स्वत:ला हिंदुत्वनिष्ठ म्हणवून घेऊ शकत नाही. याच भावनेतून जोपर्यंत मी त्या प्रकरणात आरोपी होतो, तोपर्यंत मला ते शक्य नव्हते. त्यामुळे आता या प्रकरणातून निर्दाेष सुटल्यावर मी हे लेखनाचे कार्य हाती घेतले आणि त्यातूनच हे पुस्तक वाचकांसमोर येत आहे.
६. समस्त हिंदू आणि हिंदुत्वनिष्ठ यांना नम्र विनंती !
हे पुस्तक वाचकांच्या हातात देतांना मी एक नम्र विनंती करू इच्छितो. हे पुस्तक लिहितांना माझ्या मनात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याविषयी काहीही व्यक्तीगत आकस नाही; पण दाभोलकरांना मारून मुटकून संत बनवू पहाणार्या सर्वपक्षीय राजकीय नेते आणि व्यवस्था यांपासून समस्त हिंदू अन् हिंदुत्वनिष्ठ यांनी कायम सावध रहावे, असे मी आवर्जून सांगीन. राजकारण आणि राजकारणी यांना विचारसरणी नसते. सत्ता मिळवणे, ही एकच लालसा आणि वासना त्यांना असते. त्यामुळे सत्तेसाठी काय काय होऊ शकते, हे आपण गेली काही वर्षे पहात आहोत. ‘हिंदुत्वनिष्ठ असणे, हा अपराध वाटावा’, अशा परिस्थितीतून आम्ही गेलो. आम्ही जात्यात होतो; पण कुणीतरी सुपात असणार आहे, हे समस्त हिंदू आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी लक्षात ठेवायला हवे. यावर उपाय शोधायला हवेत.
– श्री. विक्रम भावे, वरसई, तालुका पेण, जिल्हा रायगड.
राष्ट्र आणि धर्म प्रेमी, जिज्ञासू, वाचक, विज्ञापनदाते यांना सूचना‘दाभोलकर हत्या आणि मी’ हे पुस्तक खरेदी करून त्याचा आर्वजून अभ्यास करा आणि याप्रमाणे जे निर्दोष असतील, त्यांना त्यांच्या अनुभवाच्या आधारे पुस्तके लिहिण्यास साहाय्य करा. त्यामुळे खरे गुन्हेगार आणि त्यांना साहाय्य करणारे पोलीस असल्यास ते उघडकीस येतील. – संपादक |
![]() हे पुस्तक लवकरच ‘ॲमेझॉन किंडल’वर उपलब्ध होणार आहे, याची नोंद वाचक आणि जिज्ञासू यांनी घ्यावी. |